
विदर्भाच्या मातीवर अमृत भारत स्टेशन योजनेचा सुवास पसरत असून, नागपूर विभागातील अनेक स्थानकांचे कायापालट जलद गतीने सुरू आहे. लवकरच या बदलांमुळे प्रवाशांना नव्या आणि अनोख्या अनुभवाची जाणीव होणार आहे.
भारतीय रेल्वेच्या अमृत भारत स्टेशन योजनेचा सुवास आता विदर्भाच्या मातीतही दरवळू लागला आहे. नागपूर विभागातील विविध रेल्वे स्थानकांचे रूपांतर आता नव्याने, अधिक आधुनिक आणि प्रवासी-स्नेही रूपात होत आहे. नागपूरच्या भूमीत या योजनेंतर्गत स्थानकांच्या सौंदर्यकरणाचा महत्त्वपूर्ण अध्याय लिहिला जात आहे. ही योजना केवळ स्थानकांचे सुशोभीकरण नाही, तर प्रवाशांचा प्रवास अधिक सुखद, सुरक्षित आणि दर्जेदार बनविण्याचे ध्येय बाळगते. त्यामुळे नागपूर विभागातील प्रवाशांना लवकरच नव्या अनुभवाचा लाभ मिळणार आहे.
नागपूर रेल्वे विभागातील एकूण 15 रेल्वे स्थानकांचा पुनर्विकास युद्धपातळीवर सुरू आहे. यामध्ये घोडाडोंगरी, बैतूल, आमला, जुन्नारदेव, मुलताई, काटोल, नरखेड, पांढुर्णा, गोंधणी, सेवाग्राम, धामणगाव, पुलगाव, हिंगणघाट, चंद्रपूर आणि बल्लारशाह या स्थानकांचा समावेश आहे. अमृत भारत स्टेशन योजना ही भारतीय रेल्वेच्या दूरदृष्टीची आणि प्रवासी अनुकूलतेच्या दृष्टिकोनातून आखलेली योजना आहे. यामध्ये देशभरातील स्थानकांना टप्प्याटप्प्याने आधुनिकतेच्या प्रवाहात आणले जात आहे. केवळ बांधकाम नव्हे, तर प्रत्येक स्थानक प्रवाशांच्या गरजा लक्षात घेऊन नव्या रुपात साकारले जात आहे.

सांस्कृतिक ओळख
पुनर्विकासात 12 मीटर रुंद फूट ओव्हर ब्रिजेस, त्यात लिफ्ट्सची व्यवस्था, विस्तारित सर्क्युलेटिंग एरिया आणि पार्किंगची सुविधा, छतांनी सजलेले प्लॅटफॉर्म, पोर्चसह देखणे प्रवेश व निर्गम दरवाजे, स्पष्ट दिशादर्शक फलक, आधुनिक लाइटिंग आणि आरामदायक बसण्याची सोय ही सगळी आधुनिक सुविधा देण्यात येत आहे. बल्लारशाह, चंद्रपूर, धामणगाव, पुलगाव, हिंगणघाट, आमला, जुन्नारदेव आणि घोडाडोंगरी या ठिकाणी नव्या स्टेशन इमारतींचे बांधकाम सुरू आहे. विशेष म्हणजे बैतूल, चंद्रपूर आणि बल्लारशाह येथे प्रवाशांच्या सोयीसाठी एस्केलेटर बसवण्यात येत आहेत.
योजनेंतर्गत स्थानकांना स्थानिक संस्कृती, परंपरा आणि स्थापत्यशैलीशी सुसंगत असं रूप दिलं जात आहे. त्यामुळे प्रत्येक स्थानकाला त्याचं वेगळं आणि ओळखतं स्वरूप लाभणार आहे. केवळ एक ठिकाण नव्हे, तर एक सांस्कृतिक अनुभव. सुगम्य भारत अभियान अंतर्गत दिव्यांग व कमी हालचाल क्षमतेच्या प्रवाशांसाठी रॅम्प्स, सुलभ शौचालये, कमी उंचीचे तिकिट काउंटर, ब्रेल फलक, टॅक्टाईल पाथवे व लिफ्ट/रॅम्पसह एफओबी या सुविधा पुरवण्यात येत आहेत. नागपूर विभागाने समावेशकतेच्या दिशेने ठाम पावले टाकली आहेत.
सर्व स्थानकांवरील कामांचे टेंडर अंतिम झाले असून कामे जलद गतीने सुरू आहेत. जुन्नारदेव, घोडाडोंगरी आणि पुलगाव ही स्थानके जून 2025 पर्यंत नव्या स्वरूपात प्रवाशांसाठी खुली करण्यात येणार आहेत. अमृत भारत स्टेशन योजना ही केवळ पायाभूत सुविधांमधील गुंतवणूक नाही, तर ही एक मोठी सामाजिक गुंतवणूक आहे. आधुनिक, सर्वसमावेशक आणि सशक्त भारताच्या दिशेने उचललेलं हे एक भक्कम पाऊल आहे.
Nagpur : वीजपुरवठा समस्यांवर मात करण्यासाठी नवीन ‘व्हाट्सअप’ यंत्रणा