
महायुती सरकार सत्तेवर आलं आहे. त्यांनतर शिवसेना उद्धव ठाकरे गट पुन्हा एकदा भाजप जवळ येत आहे. यावर अमृता फडणवीस यांनी भाष्य केलं आहे.
विधानसभा निवडणुकीनंतर देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री झाले आहेत. त्यानंतर शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे सूर बदलले आहेत. नागपुरात उद्धव ठाकरे फडणवीस यांना भेटले. त्यानंतर आमदार आदित्य ठाकरे यांनी मुंबईत मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. शिवसेना आणि भाजप एकत्र येण्यावरून चर्चाही सुरू झाली. यासंदर्भात आता मुख्यमंत्र्यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी भाष्य केलं आहे. सामनातून देवेंद्र फडणवीस यांची स्तुती करण्यात आली. आदित्य ठाकरेही दोन ते तीन वेळा देवेंद्र फडणवीस यांना भेटले. याबाबत अमृता यांनी आपलं मत व्यक्त केलं.
देवेंद्र फडणवीस किंवा पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सगळे प्रगतीचं राजकारण करतात. जातीचं राजकारण आपण आणतो. आपण असं नको करायला. ही बाब लोकांच्या हातात आहे. माध्यमांच्या हातात आहे. नेत्यांमध्ये काही मतभेद असू शकतात. हे मतभेद विचारधारांचे आहेत. व्यक्तीगत मतभेद नाहीत. वैचारिक मतभेद असल्याने एकेकाळचा शत्रू हा मित्र होतो. राजकारणात कोणीही कोणाचा कधीही शत्रू नसतो. मित्रही नसतो. शत्रू कधीही मित्र होतात. मित्र कधीही शत्रू होतात. त्यामुळं राजकारणात सदासर्वदा काळ कोणीही मित्र किंवा शत्रू नसतो, असं अमृता फडणवीस म्हणाल्या.

टोकाची टीका
विधानसभा निवडणूक काळात शिवसेनेकडून भाजपवर प्रचंड टीका करण्यात आली. संजय राऊत आणि उद्धव ठाकरे यांनी टीका करताना कोणतीही कसर सोडली नाही. एकमेकाला संपविण्यापर्यंतची भाषा करण्यात आली. परंतु देवेंद्र फडणवीस यांनी आपली पातळी सोडली नाही. कोणाला संपवायचं आणि कोणाला ठेवायचं याचा निर्णय जनता करेल असं फडणवीस म्हणाले होते. विधानसभा निवडणुकीत निकाल लागल्यानंतर मात्र महाविकास आघाडीमधील हवा निघून गेली. आता शिवसेना महापालिका स्वबळावर निवडणूक लढविण्याची भाषा करीत आहे. काँग्रेसकडून आघाडी वाचविण्याचे प्रयत्न होत आहे. मात्र शिवसेना आघाडीत लढेल याबाबत शाश्वती नाही.
महायुती सरकारच्या दुसऱ्या टर्ममध्ये फडणवीस मुख्यमंत्री झाल्यानं अनेकांना आता चिंता लागली आहे. निवडणुकीपूर्वी मोदी-शाह आणि फडणवीस यांच्यावर टीका करण्यात आली. त्यामुळं आता आपली खैर नाही, अशी भीती काहींना वाटत असल्याचं सांगण्यात येत आहे. त्यामुळं अनेक नेत्यांकडून फडणवीस यांच्याशी जवळीक साधण्याचा प्रयत्न केला जात असल्याचं दिसत आहे. या सगळ्या घडामोडीत अमृता फडणवीस यांनी केलेलं भाष्य महत्वाचं मानलं जात आहे. फडणवीस आणि ठाकरे यांच्यातील राजकीय वैर संपणार का? असं आता अनेकांना वाटत आहे.