महाराष्ट्र

Buldhana : शेतकरी संतापला; आमदाराच्या घरात पेट्रोल घेऊन घुसला 

Sanjay Kute : बळीराजाच्या आक्रोशाला आता निखाऱ्यांची भाषा 

Author

मोबदल्याच्या प्रतीक्षेत असलेल्या एका शेतकऱ्याचा संताप अखेर उफाळून आला आणि त्याने थेट आमदाराच्या घरावर पेट्रोल घेऊन हल्ल्याचा प्रयत्न केला. संग्रामपूर तालुक्यातील या थरारक घटनेने प्रशासनाची झोप उडवली आहे.

बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर तालुक्यात एका शेतकऱ्याच्या मनात साठवलेल्या संतापाचा उद्रेक थेट राजकारण्यांच्या अंगणात झाला. बावनबीर गावातील एका शेतकऱ्याने शासनाच्या दुर्लक्षामुळे नैराश्याच्या आणि क्रोधाच्या भरात थेट भाजपचे आमदार संजय कुटे यांच्या निवासस्थानी पेट्रोल घेऊन घुसण्याचा थरारक प्रकार घडवला आहे. या घटनेमुळे जिल्ह्यात आणि संपूर्ण राज्यात एकच खळबळ उडाली आहे.

13 जून रोजी रात्री 8 वाजताच्या सुमारास विशाल सुधाकर मुरुख नावाचा शेतकरी, हातात पेट्रोलची कॅन घेऊन आमदार संजय कुटे यांच्या घरात घुसला. बावनबीर आणि संग्रामपूर तालुक्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं… तरीही 2022 पासून आजपर्यंत मोबदला मिळालेला नाही. केवायसी केलं, पण तहसील कार्यालयाकडून काहीच हालचाल नाही, अशा संतप्त आरोळ्या देत त्याने थेट बंगल्यात आग लावण्याची धमकी दिली. घटनेचं गांभीर्य लक्षात घेऊन आमदार कुटे यांच्या स्वीय सहाय्यक प्रकाश राऊत यांनी तातडीने पोलिसांत तक्रार दाखल केली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन आरोपी शेतकऱ्याला अटक केली व त्याला न्यायालयात हजर करण्यात आले आहे.

थांबलेले पैसे

बावनबीर गावातील गट क्रमांक 55 मध्ये सुधाकर मुरुख यांच्या नावावर एक हेक्टर 75 आर जमीन असून त्यातील एक हेक्टर 40 आर क्षेत्र 2022 मध्ये अतिवृष्टीने बाधित झाले होते. या नुकसानीबाबत शासनाने 18 हजार 900 रुपयांची मदत मंजूर केली आहे. मात्र, आजपर्यंत ती रक्कम शेतकऱ्याच्या खात्यात जमा झालेली नाही. गावचे महसूल अधिकारी विश्वनाथ सुदेवाड यांनी देखील ही बाब स्पष्ट केली आहे. या घटनेनंतर अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. शासनाने मदत मंजूर करूनदेखील वितरण प्रक्रियेतील अकार्यक्षमता शेतकऱ्यांना वणव्यात ढकलते आहे. या ढिसाळ यंत्रणेमुळे अनेक शेतकरी नैराश्यात जात आहेत. आणि या वेळी एका शेतकऱ्याच्या मनातील आक्रोश त्याच्या कृत्यातून पेटून निघाला.

Vijay Wadettiwar : तीन तुकडे, तीन रस्ते, आघाडीत बिघाडीचा नकाशा

सामाजिक वर्तुळात खळबळ

या प्रकारामुळे राजकीय वातावरण तापले आहे. शासनाच्या अपयशावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. शेतकऱ्यांच्या समस्या केवळ घोषणा आणि कागदांपुरत्याच मर्यादित राहत असल्याचं चित्र पुन्हा समोर आलं आहे. सरकारने केवळ मदतीचे आकडे जाहीर करणे पुरेसे नाही, ती मदत शेतकऱ्याच्या खात्यात पडली पाहिजे, त्याच्या जीवनात उतरली पाहिजे. ही घटना फक्त एकतर्फी गुन्हा नाही, तर शेतकऱ्याच्या मनातील आक्रोशाचा उफाळ आहे. वेळेत मोबदला मिळाला असता, तर कदाचित ही घटना टाळली असती.

व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!