बदलापूर येथे एका शाळेत दोन चिमुकलीवर झालेल्या लैंगिक अत्याचारामुळे राज्यभरात आंदोलने पेटली होती. त्यानंतर आरोपीला अटक केली होती. आरोपीने पोलिसांजवळील बंदूक हिसकावून गोळीबार केला, असे सांगण्यात आले होते. परंतु न्यायालयीन अहवालानुसार ही बाब खोटी असल्याचे ठरले आहे. त्यावरून अनिल देशमुख यांनी भाजपला पुन्हा निशाणा केले आहे. नागपूर येथील आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
बदलापूर येथे काही महिन्यांपूर्वी एका शाळेत चिमुकलीवर अत्याचार झाला होता. त्यानंतर संबंधित आरोपी अक्षय शिंदे याला अटक करण्यात आली होती. आरोपी अक्षय शिंदे याचा एन्काऊंटर करण्यात आला होता. परंतु आता अक्षय शिंदे याचा एन्काऊंटर फेक असल्याचा न्यायालयीन अहवाल आला आहे. त्यावरून अनिल देशमुख यांनी भाजपला निशाणा करत पुन्हा आरोप केले आहेत. नागपूर येथील आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
माजी गृहमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार गटाचे नेते अनिल देशमुख यांनी बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे याचा एन्काऊंटर भाजपच्या सांगण्यावरून करण्यात आला, असा गंभीर आरोप केला आहे. आरोपी अक्षय शिंदेच्या एन्काऊंटरला पोलीस कर्मचारी जबाबदार आहे असे महानगरदंडाधिकाऱ्यांच्या चौकशी अहवालात नमुद करण्यात आले आहे. त्यावर प्रतिक्रिया देताना अनिल देशमुख यांनी भाजपवर आरोप केला आहे.
BJP नेत्यांना वाचविण्यासाठी एन्काऊंटर
बदलापूर प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेनी स्वत:वर गोळया झाडल्या नाहीत तर पोलिसांनी त्याला ठार मारले आहे. हे आपण आधीच सांगितल्याचे अनिल देशमुख म्हणाले. ज्या शाळेमध्ये एका चिमुकलीवर लैंगिक अत्याचार झाला. ती शाळा भाजपशी संबंधित मंडळीची होती. त्यामुळे भाजपशी संबंधित लोकांना त्या प्रकरणातून वाचविण्यासाठी आरोपी अक्षय शिंदे याचा एन्काऊंटर करायला लावले काय, असा प्रश्नही अनिल देशमुख यांनी उपस्थित केला आहे.
आरोपी अक्षय शिंदे याला अटक करण्यात आली. अटकेनंतर पोलिस त्याला वाहनातून घेऊन जाताच त्याने पोलिसांची बंदूक हिसकावली आणि गोळीबार सुरू केला, असे सांगण्यात आले. त्याचवेळी आपण संशय व्यक्त केल्याचे अनिल देशमुख म्हणाले. पोलिसांजवळील रिवॉल्व्हर कोणीही सहजपणे काढू शकत नाही. कारण बंदूक लॉक असते. ते लोक खोलण्यासाठी प्रशिक्षणाची गरज असते. त्यामुळे या प्रकरणाच्या चौकशीचीही मागणी केली होती, असे अनिल देशमुख म्हणाले. आपण व्यक्त केलेली शंका खरी ठरल्याचे न्यायालयीन अहवालावरून स्पष्ट दिसून येत आहे, असेही अनिल देशमुख म्हणाले.
कोणाला वाचविण्याचा प्रयत्न?
आरोपी अक्षय शिंदेनी ज्या बंदूकीने गोळीबार गेला त्या बंदुकीवर त्याच्या बोटांचे ठसे नाहीत, असा फॉरेन्सिक अहवाल आला आहे. यात पाच पोलिस दोषी असल्याने त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचा आदेश न्यायालयाने दिला आहे. त्यामुळे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. ही बनावट चकमक कोणी केली ? कोणाच्या सांगण्यावरून करण्यात आली? कोणाला वाचवण्यासाठी केली ? बंदुकीवर अक्षय शिंदेच्या बोटांचे ठसे नाहीत. जर त्याने पोलिसांवर गोळीबार केलाच नाही, तर मग पोलिसांनी त्यांच्या बचावासाठी अक्षयवर गोळीबार का केला ? असे अनेक प्रश्न उपस्थित करून या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी अनिल देशमुख यांनी केली आहे.
पीडित मुलीच्या गर्भवती आईला 13 तास पोलिस स्टेशनमध्ये तक्रार घेण्यासाठी ताटकळत ठेवले होते. नागरीकांनी तीव्र आंदोलन केल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला. नंतर शाळेच्या संचालकावर संशय आल्याने तुषार आपटे व उदय कोतवाल यांच्यावर सुध्दा गुन्हा दाखल करण्यात आला होता. यानंतर अक्षयचा एन्काऊंटर करण्यात आला. तुषार आपटे व उदय कोतवाल यांना वाचविण्यासाठी तर हा एन्काऊंटर करण्यात आला नाही ना? न्यायालयीन चौकशीच्या अहवालानंतर न्यायालयाने पाच पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी केली तर अनेक धक्कादायक खुलासे समोर येतील, असेही अनिल देशमुख म्हणाले.
