महाराष्ट्र

Anil Deshmukh : एकत्रीकरणाचा भपका; जवळ या, कानात सांगतो…

NCP Politics : अनिल देशमुख यांनी उधळलेल्या अफवांना लावला लगाम 

Author

राजकीय रंगमंचावर पुन्हा एकदा एकत्रीकरणाच्या चर्चा रंगताना दिसत आहेत. पण या धुसफुसत्या पार्श्वभूमीवर अनिल देशमुखांचा एक मिश्कील आणि ठाम संवाद खळबळ उडवतोय.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांच्या संभाव्य एकत्रीकरणावर राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाली आहे. अशात शरद पवार गटाचे ज्येष्ठ नेते आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी या चर्चेवर ठाम आणि स्पष्ट भूमिका मांडत वातावरणातील गोंधळावर एकप्रकारे पडदा टाकण्याचा प्रयत्न केला आहे.

शरद पवार यांच्या एका विधानामुळे राजकीय चर्चांना उधाण आले होते. त्यांनी म्हटले होते की, दोन्ही गट एकत्र आले तर आश्चर्य वाटू नये. या वक्तव्यानंतर राज्याच्या राजकारणात घडामोडी गतिमान झाल्या. अनेकांनी हे संकेत समजून घेतले, काहींनी संभाव्य गणिते मांडायला सुरुवात केली. पण अशा चर्चांना अटकाव घालत अनिल देशमुख यांनी पत्रकार परिषदेत अत्यंत नेमकं आणि मिश्कील उत्तर दिलं. सध्या पक्षाच्या पातळीवर एकत्रीकरणाबाबत कुठलीही चर्चा सुरू नाही. हे सगळं केवळ माध्यमांमध्ये घडत आहे, असे देशमुख म्हणाले.

चर्चांना विराम

देशमुख पुढे म्हणाले, मी स्पष्ट सांगतो, ही चर्चा फक्त मिडियात आहे. पक्षात कोणतीही औपचारिक बैठक किंवा बोलणी सुरू नाहीत. अजित पवार गटाचे म्हणणे आहे की, शरद पवार गटातून ही माहिती पेरली जात आहे. पण ती वस्तुस्थिती नाही, असं ठामपणे सांगून देशमुख यांनी अफवांना उत्तर दिलं. मात्र, त्यांचे हे स्पष्टवक्तेपण गोंधळ संपवण्याऐवजी नव्या चर्चांना सुरूवात करणारे ठरले. पत्रकारांनी विचारले, तुमच्या मनात नेमकं काय आहे? त्यावर देशमुख यांनी मिश्कील हसत उत्तर दिलं. “जवळ या, तुमच्या कानात सांगतो…” त्यांच्या या हलक्याफुलक्या शैलीने वातावरणात क्षणिक हास्याची लहर उसळली. पण त्याचवेळी राजकीय वर्तुळात अधिक गूढतेची चर्चा पुन्हा रंगू लागली.

Siddharth Kharat : तलवार हातात, ठेका पायात; आमदाराचा वरातीत धमाका

संभाव्य मंत्रिपद

यावेळी कार्यकर्त्यांमध्ये असा सूर उमटत आहे की, केंद्रात सुप्रिया सुळे यांना मंत्रिपद मिळावे आणि राज्यात अजित पवारांनी नेतृत्व करावे. यावर अनिल देशमुखांनी अगदी रोखठोक भूमिका मांडली. सुप्रिया सुळे आमच्या पक्षाच्या राष्ट्रीय कार्याध्यक्षा आहेत. त्या खासदार आहेत. त्या वरिष्ठ नेत्या आहेत, त्यामुळे त्यांच्या नेतृत्वावर कोणताही प्रश्नच नाही. तसेच, सुप्रिया सुळे यांना केंद्रात कॅबिनेट मंत्रिपद मिळण्याचीही जोरदार शक्यता वर्तवली जात आहे. अशावेळी दोन्ही गट एकत्र आले, तर त्याचा फायदा केंद्र आणि राज्य या दोन्ही पातळ्यांवर होईल, असे अजित पवार गटाचे नेते अमोल मिटकरी यांनी व्यक्त केले. एकत्रित राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अजित पवार यांचे नेतृत्व मान्य करून आम्ही पुढे जाऊ शकतो, असेही त्यांनी स्पष्ट केले.

मिश्कील नेतृत्व

अनिल देशमुख यांची ही भूमिका केवळ स्पष्टवक्तेपणाचं उदाहरण नाही, तर पक्षातील नेत्यांमध्ये असलेल्या समजुतीचा आणि संयमाचा प्रतिबिंबही आहे. माध्यमांतून उठणाऱ्या अफवांना त्यांनी मिश्कीलतेच्या धाटणीत योग्य उत्तर दिलं, पण त्याचवेळी पक्षाच्या अधिकृत भूमिकेवर स्पष्टतेची शिक्कामोर्तब केली. राजकीय हालचालींच्या या नाट्यमय पार्श्वभूमीवर, देशमुख यांची भूमिका पक्षात एक समतोल आणि विश्वासार्ह आवाज म्हणून पुढे येते आहे. आगामी काळात या चर्चांना कोणती दिशा मिळते, हे पाहणे रंजक ठरेल. पण सध्यातरी अनिल देशमुख यांनी हे सर्व मीडियामधील चर्चाच आहेत, असे सांगत चर्चांना थोडा विराम दिला आहे.

व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!