
खासदार अनुप धोत्रेंनी लोकसभेत नागपूर-अकोला-मुंबई अमृत भारत 2.0 ट्रेन सुरू करण्याची मागणी केली आहे. ही ट्रेन वेगवान, आधुनिक आणि सर्वसामान्यांना परवडणारी असणार आहे. त्यामुळे विदर्भाच्या विकासाला मोठी चालना मिळेल.
भारतीय रेल्वेच्या अमृत भारत योजना 2.0 अंतर्गत नागपूर-अकोला-मुंबई मार्गावर नव्या सुपरफास्ट गाडीची गरज असल्याची जोरदार मागणी करण्यात आली आहे. ही मागणी लोकसभेत खासदार अनुप धोत्रे यांनी केली असून, या रेल्वे सेवेमुळे विदर्भासह संपूर्ण महाराष्ट्राच्या आर्थिक आणि सामाजिक विकासाला मोठी चालना मिळणार आहे. ही ट्रेन सामान्य नागरिकांना परवडणाऱ्या किमतीत वंदे भारतसारखी अत्याधुनिक सुविधा देणारी असेल. त्यामुळे प्रचंड लोकसंख्येचा प्रवास अधिक सुखकर आणि वेगवान होणार आहे.
अनुप धोत्रे यांनी लोकसभेत रेल्वे मंत्री यांना सादर केलेल्या मागणीमध्ये नागपूर-अकोला-मुंबई अमृत भारत 2.0 ट्रेन त्वरित सुरू करण्यावर भर देण्यात आला आहे. त्याचबरोबर, अकोला रेल्वे स्थानकासाठी मंजूर करण्यात आलेल्या गतिशक्ती टर्मिनलबद्दल त्यांनी रेल्वे मंत्रालयाचे आभार मानले. गतिशक्ती टर्मिनलमुळे अकोला आणि विदर्भाच्या प्रगतीला गती मिळणार असून, उद्योग, व्यापार आणि पर्यटन क्षेत्रालाही मोठा फायदा होणार आहे.

सामान्य प्रवाशांसाठी उपक्रम
अमृत भारत योजना 2.0 अंतर्गत नवीन ट्रेनमध्ये वंदे भारत 2 प्रमाणे अत्याधुनिक सुविधा असतील, मात्र तिकिट दर सर्वसामान्यांना परवडणारे असतील. विशेषतः स्लीपर आणि जनरल श्रेणीतील प्रवाशांसाठी ही ट्रेन अधिक फायदेशीर ठरणार आहे. विदर्भातील नागरिक, व्यापारी, विद्यार्थी आणि नोकरीसाठी मुंबईकडे जाणाऱ्या हजारो प्रवाशांना यामुळे दिलासा मिळेल. अनुप धोत्रे यांनी आपल्या मागणीमध्ये स्पष्टपणे अधोरेखित केले की, विदर्भाच्या प्रगतीसाठी वेगवान आणि परवडणाऱ्या रेल्वे सेवांचा विस्तार गरजेचा आहे. विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रातील संपर्क अधिक बळकट करण्यासाठी नागपूर ते मुंबई दरम्यान अमृत भारत ट्रेन सुरू करणे काळाची गरज आहे. ही ट्रेन सुरू झाल्यास विदर्भ, मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्र यांच्यातील औद्योगिक आणि सामाजिक संबंध अधिक दृढ होतील.
विदर्भाच्या विकासाला गती
रेल्वे मंत्रालयाने अकोला येथे गतिशक्ती टर्मिनल मंजूर करून विदर्भाच्या प्रगतीच्या दिशेने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. या निर्णयामुळे आधुनिक रेल्वे सेवा उपलब्ध होणार असून, व्यापारी, उद्योजक आणि प्रवाशांना अधिक चांगल्या सुविधा मिळतील. गतिशक्ती टर्मिनलमुळे अकोला रेल्वे स्थानकाला राष्ट्रीय पातळीवरील दर्जा प्राप्त होणार असून, येथील वाहतूक व्यवस्थेत मोठा सुधार होईल. लॉजिस्टिक्स आणि वाहतुकीच्या सुविधा सुधारल्यामुळे व्यापाऱ्यांना अधिक चांगल्या संधी उपलब्ध होतील. विदर्भातील शेतीमाल, औद्योगिक वस्तू आणि इतर मालवाहतुकीसाठी गतिशक्ती टर्मिनल मोठ्या प्रमाणावर उपयुक्त ठरणार आहे.
Maharashtra Budget Session : रणधीर सावरकरांचा ठाम इशारा; अपघात रोखा नाहीतर जबाबदारी स्वीकारा
प्रगतीशील निर्णय
अनुप धोत्रे यांनी वेळोवेळी विदर्भाच्या प्रगतीसाठी महत्त्वपूर्ण मुद्दे लोकसभेत मांडले आहेत. त्यांनी सामान्य प्रवाशांच्या हिताचा विचार करत ही मागणी केली आहे. रेल्वे ही देशातील लाखो लोकांच्या दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग असून, ती अधिक वेगवान, सोयीस्कर आणि परवडणारी असली पाहिजे, असे धोत्रे यांनी ठामपणे सांगितले. विदर्भाच्या विकासाला वेग मिळावा, नागपूर आणि मुंबई यांच्यातील प्रवास सुलभ व्हावा आणि सर्वसामान्य प्रवाशांना परवडणाऱ्या दरात उत्तम सेवा मिळावी, या उद्देशाने ही मागणी करण्यात आली आहे. अमृत भारत 2.0 ट्रेनच्या मंजुरीसाठी त्यांनी रेल्वे मंत्रालयासोबत सतत पाठपुरावा करण्याचा निर्धार केला आहे.
विदर्भाच्या भरभराटीसाठी पाऊल
नागपूर-अकोला-मुंबई अमृत भारत ट्रेन ही विदर्भाच्या आर्थिक, औद्योगिक आणि सामाजिक विकासाला चालना देणारी महत्त्वाची योजना ठरेल. अनुप धोत्रे यांनी मांडलेली ही मागणी पूर्ण झाली, तर नागपूर ते मुंबई प्रवास अधिक वेगवान, सोयीस्कर आणि परवडणारा होईल. अनुप धोत्रे यांच्या नेतृत्वाखाली विदर्भाच्या विकासासाठी सातत्याने ठोस मागण्या करण्यात येत असून, या नव्या ट्रेनमुळे लाखो प्रवाशांचे जीवन सुलभ होईल. रेल्वे मंत्रालयाकडून लवकरच या मागणीवर सकारात्मक निर्णय होण्याची अपेक्षा आहे.