महाराष्ट्र

Bhushan Gawai : आंबेडकरांच्या नीतीत बसत नव्हते 370 कलमचे पान 

Article 370 : संविधानाच्या मूळ रेषेतले एक विसंगत वळण 

Author

कलम 370 बाबासाहेबांच्या एकसंघ भारताच्या विचारांशी सुसंगत नव्हते, असे मत सरन्यायाधीश भूषण गवई यांनी व्यक्त केले.

भारताच्या संपूर्णतेचा गाभा म्हणजे त्याचे संविधान. ते फक्त कायद्याचा दस्तऐवज नाही, तर राष्ट्रीय एकात्मतेचे प्राण आहे, असे ठाम मत भारताचे सरन्यायाधीश भूषण गवई यांनी नागपूरमध्ये व्यक्त केले. 370 कलमचे समर्थन करणे म्हणजे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या मूलभूत विचारांना छेद देणे होईल, असे सांगून त्यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या ऐतिहासिक निर्णयाचा पुनरुच्चार केला. नागपूर येथे एका कार्यक्रमादरम्यान ते बोलत होते.

सरन्यायाधीश गवई म्हणाले की, देशासाठी एकच संविधान हेच डॉ. आंबेडकरांचे स्वप्न होते. स्वतंत्र भारतात प्रत्येक राज्यासाठी वेगवेगळे कायदे किंवा घटना असाव्यात, ही संकल्पना त्यांना मान्य नव्हती. म्हणूनच जम्मू-काश्मीरसाठी असलेले विशेष कलम 370 हे त्यांच्या दृष्टीने संविधानाच्या मूलतत्त्वांशी विसंगत होते. जेव्हा संसदेनं कलम 370 हटवण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला. तेव्हा न्यायालयाने त्याला संपूर्ण घटनात्मक समर्थन दिले, कारण एकरूपता हीच राष्ट्राची खरी ओळख आहे, असे त्यांनी ठासून सांगितले.

संविधानाचा केंद्रबिंदू 

नागपूर शहर हे केवळ भौगोलिक मध्यबिंदू नाही, तर सामाजिक आणि वैचारिक परिवर्तनाचा केंद्रबिंदूही आहे. डॉ. आंबेडकरांनी इथेच धम्मदीक्षा घेऊन ऐतिहासिक क्रांती घडवली. त्यामुळे या शहरात उभारले गेलेले संविधान उद्देशिका पार्क हे केवळ स्मारक नाही. प्रत्येक भारतीयाला प्रेरणा देणारे तीर्थक्षेत्र आहे. झिरो माईल परिसरात संविधान चौक, दीक्षाभूमी आणि आता संविधान पार्क, ही सर्व ठिकाणं आपल्याला आठवण करून देतात की संविधान हा केवळ शाब्दिक दस्तऐवज नसून, तो सामाजिक समतेचा दीपस्तंभ आहे.

उद्देशिका पार्क

पार्कच्या उभारणीसाठी सामाजिक न्याय विभागाने केलेल्या योगदानाबाबत मंत्री संजय शिरसाट यांनी माहिती दिली. या वास्तूच्या निर्मितीमागील प्रेरणा, इतिहास, आणि भूमिकेबाबत संविधान उद्देशिका पार्क समितीचे अध्यक्ष गिरीश गांधी यांनी दिलखुलास माहिती दिली. कार्यक्रमात प्रास्ताविक भाषण प्रभारी कुलगुरू डॉ. माधवी खोडे यांनी, तर संविधान उद्देशिकेचे वाचन माजी कुलसचिव डॉ. पूरणचंद्र मेश्राम यांनी केले. संचालन कोमल ठाकरे यांनी तर आभार प्रदर्शन विधी महाविद्यालयाचे संचालक डॉ. रविशंकर मोर यांनी केले.

Maharashtra : स्पेशल लेन पश्चिमसाठी, टोल बोजा विदर्भासाठी 

एकसंघ भारताची मूळशक्ती 

सरन्यायाधीश गवई यांनी आपल्या भाषणाचा समारोप करताना संविधानाचे महत्त्व अधोरेखित करत म्हटले की, 75 वर्षांच्या प्रत्येक ऐतिहासिक क्षणी संविधानाने आपल्याला एकत्र बांधून ठेवले आहे. हे संविधान केंद्रीकृत असूनही संघराज्यात्मक आहे आणि हेच बाबासाहेबांचे स्वप्न होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची विचारसंपदा, त्यांचा लढा आणि त्यांनी दिलेले संविधान हे भारताला सशक्त, समतामूलक आणि एकसंघ ठेवणारे महान शस्त्र आहे. संविधान उद्देशिका पार्क हे त्या दिव्य शस्त्राची शाश्वत आठवण ठरेल, अशी आशा या कार्यक्रमाने निर्माण केली.

व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!