
विदर्भातील शेतकऱ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी भाजप आमदार डॉ. आशिष देशमुख यांनी काही शेतकऱ्यांसह राज्यातील विविध जिल्ह्यांतील यशस्वी शेती प्रकल्पांचा अभ्यास दौरा केला.
सध्या राज्यात शेतकऱ्यांचा प्रश्न चांगलाच धगधगत आहे. कर्जमाफीपासून सुरू झालेला संघर्ष आता अधिक व्यापक झाला आहे. अमरावती येथील बच्चू कडूंचं आंदोलन तात्पुरतं स्थगित झालं असलं तरी ‘शेतकरी’ ही संज्ञा आणि त्याभोवतीचं संघर्षाचं वलय अद्यापही कायम आहे. याच पार्श्वभूमीवर सावनेर-कळमेश्वर आणि काटोल-नरखेड विधानसभा क्षेत्रातील 30 प्रगतिशील शेतकऱ्यांचं अभ्यास शिष्टमंडळ घेऊन आमदार डॉ. आशिष देशमुख 13 जून रोजी नाशिककडे रवाना झाले. सकाळी 7 वाजता सुरुवात झालेला हा दौरा दुपारी 2 वाजता नाशिकमधील सुप्रसिद्ध सह्याद्री फार्म्सच्या भेटीने रंगला.
भेटीदरम्यान संस्थेचे प्रमुख संचालक विलास यांनी सह्याद्रीच्या एक एकरातील प्रवासापासून 120 एकरातील यशापर्यंतचा प्रवास थेट दाखवून दिला.सह्याद्री फार्म्सची सुरुवात 1995 साली गरिबीतून झालेली असली तरी आज ती भारतातील क्रमांक एकची कृषी निर्यात कंपनी ठरली आहे. द्राक्ष, टोमॅटो, डाळिंब, आंबा, संत्रा, केळी, काजू यासारख्या विविध पिकांमधून शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्याचे हे मॉडेल विदर्भासाठी आदर्श ठरू शकते. आमदार डॉ. देशमुख यांच्या या दौऱ्याचा उद्देश नागपूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना हे मॉडेल प्रत्यक्ष अनुभवायला देणे आणि त्यातून परिवर्तनाची नवी दिशा दाखवणे हा आहे.

Prakash Ambedkar : काँग्रेस – भाजपची युती अन् दलालांची मौन यात्रा
बाजार समितीचा अभ्यास
शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढावे, त्यांचा सामाजिक आणि आर्थिक दर्जा उंचावावा, यासाठी कृषी व्यवसायामध्ये सामूहिक सहभाग अत्यावश्यक आहे. देश कृषीप्रधान असूनही शेतकरी अजूनही अडचणींच्या भोवऱ्यात अडकलेला आहे. त्यामुळे आशिषराव देशमुख यांच्या नेतृत्वात विदर्भात असेच एक प्रभावी मॉडेल उभारण्याचा संकल्प यावेळी समोर आला. 14 जून रोजी दौऱ्याच्या दुसऱ्या दिवशी शिष्टमंडळाने छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील माळीवाडा आणि जालना जिल्ह्यातील अंतरवाला या ठिकाणी भेटी दिल्या. माळीवाडा येथे अंजीर बागांचे निरीक्षण करताना आधुनिक बागायती तंत्रज्ञान, सिंचन व्यवस्था आणि व्यवस्थापनाचे बारकावे समजून घेण्यात आले.
स्थानिक शेतकऱ्यांनी घेतलेली पुढाकार आणि त्या आधारे निर्माण झालेली अर्थव्यवस्था याचीही माहिती मिळाली. यानंतर शिष्टमंडळाने लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीला भेट दिली. ही भारतातील सर्वात मोठ्या बाजारपेठांपैकी एक आहे. येथे शेतकरी आणि व्यापाऱ्यांशी थेट संवाद साधण्यात आला. शेतमालाचे दर, निर्यातीतील अडचणी, बाजार व्यवस्थेतील अपारदर्शकता यावर सखोल चर्चा झाली. यावेळी आमदार देशमुख यांनी विधानसभेत या विषयांवर आवाज उठवण्याचा निर्धार व्यक्त केला. या दोन दिवसांच्या अभ्यासदौऱ्याने विदर्भातील शेतकऱ्यांना एक नवी दिशा दाखवली आहे.
Nagpur : धोटे सरांनी लिहिले भ्रष्टाचाराचे यशस्वी शैक्षणिक मॉडेल
धोरणांची बीजे रोवली
शेतकऱ्यांच्या थेट सहभागातून त्यांच्या अडचणी समजून घेण्याचा, त्यावर उपाय शोधण्याचा हा एक सर्जनशील प्रयत्न होता. हा दौरा म्हणजे केवळ पर्यटन नव्हे, तर शेतकऱ्यांच्या विकासाच्या दिशेने टाकलेले ठोस पाऊल ठरले.या दौऱ्यात आमदार देशमुखांसोबत शेतकरी नेते अशोकजी धोटे, बाबा बुऱ्हाण, संजय जीवतोडे, मनोज जवंजाळ, महादेव नखाते, प्रवीण लोहे, मंगेश कोठाडे, सरपंच आशुतोष तभाने आणि अनेक कार्यकर्ते सहभागी झाले होते. शेतकरी हा अभ्यास दौऱ्याचा केंद्रबिंदू होता. त्याच्या अनुभवातूनच भविष्यातील धोरणांची बीजे रोवली जातील, असे आश्वासन देशमुख यांनी दिले.