
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नागपूर दौऱ्यावर काँग्रेस प्रवक्ते अतुल लोंढे यांनी टीका करत, महाराष्ट्राला या दौऱ्यातून काय मिळालं असा सवाल उपस्थित केला. विदर्भातील महत्त्वाचे उद्योग गुजरातला गेल्याचा आरोप करत मोदींच्या आश्वासनांवर प्रश्नचिन्ह लावलं.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नागपूर दौऱ्याने संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष वेधून घेतले आहे. मोदींच्या दौऱ्यावर विरोधकांनी सुरुवातीपासूनच टीकेचा भडिमार केला आहे. काँग्रेसने एकही मुद्दा सोडलेला नाही. याच पार्श्वभूमीवर काँग्रेसचे नेते अतुल लोंढे यांनी पुन्हा एकदा मोदींवर निशाणा साधला. त्यांनी मोदींना खोटे ठरवत त्यांच्या भाषणातील दाव्यांवर सवाल उपस्थित केले आहेत. दौऱ्यादरम्यान मोदींनी अनेक मुद्द्यांवर भाष्य केले, मात्र महाराष्ट्रासाठी ठोस घोषणा न केल्याने विरोधकांनी त्यांच्यावर निशाणा साधला आहे.
मोदी यांच्या या दौऱ्यावर टीका करताना काँग्रेस प्रवक्ते अतुल लोंढे यांनी सरकारच्या उद्योग धोरणावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. ‘आम्ही त्यांचे स्वागत केले, पण त्यांनी महाराष्ट्राला दिलेली आश्वासने पूर्ण केली का?’ असा सवाल लोंढे यांनी उपस्थित केला. पंतप्रधानांनी स्वतःच दिलेले आश्वाश विसरून गेले. त्यांनी आरोप केला की, ‘शिंदे सरकारने आश्वासन दिलं होतं की गुजरातला गेलेल्या टाटा एअर बस, वेदांता, बॉक्स कॉन, इंटरनॅशनल फायनान्शिअल सेंटर यांसारख्या मोठ्या प्रकल्पांपेक्षा महाराष्ट्राला मोठा उद्योग दिला जाईल. पण प्रत्यक्षात महाराष्ट्राला काहीच मिळाले नाही.

Harish Pimple : मूर्तिजापूरचे आमदार हातात झाडू घेतात तेव्हा…
महाराष्ट्राला काय मिळालं?
विदर्भाच्या मिहान प्रकल्पातून टाटा एअर बस बाहेर गेलं, यावर मोदींनी साधं भाष्यही केलं नाही. असाही आरोप काँग्रेसकडून करण्यात आला. ‘मोदी म्हणाले की, आम्ही मोठ्या प्रमाणावर विदेशातून रेस्क्यू ऑपरेशन केले. पण अमेरिकेतून लोकांना साखळ्या आणि हातकड्या घालून परत पाठवलं गेलं. कोलंबिया, ग्रीनलँड, मेक्सिको यांसारख्या छोट्या देशांनीही आपल्या नागरिकांना सन्मानाने परत आणले, पण भारत मात्र अपयशी ठरला, मोदींचा हा दौरा केवळ भाषणबाजीपुरता सीमित होता. त्यांनी महाराष्ट्राला काहीही दिलं नाही, असा आरोप लोंढे यांनी केला आहे.
मोदींनी नागपूर दौऱ्याची सुरुवात रेशीमबाग येथे डॉक्टर हेडगेवार यांना अभिवादन करून केली आणि नंतर दीक्षाभूमीवर जाऊन डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना श्रद्धांजली वाहिली. त्यांनी अभिप्राय लिहून आपले मत व्यक्त केले, मात्र काँग्रेस नेते अतुल लोंढे यांनी यावरही आक्षेप घेतला. एक्सवर पोस्ट करत त्यांनी मोदींच्या दोन अभिप्रायांची तुलना केली आणि हस्ताक्षरातील फरकावर सवाल उठवला. ‘एकाच व्यक्तीचे दोन वेगवेगळे हस्ताक्षर कसे असू शकतात?’ असा प्रश्नही त्यांनी सुरुवातीला उपस्थित केला, यात काहीतरी गडबड असल्याचा आरोप आहे.
Devendra Fadanvis : भ्रष्टाचारात अडकलेली नागपूर जिल्हा बँक पुन्हा उभारी घेणार