महाराष्ट्र

Bacchu Kadu : बावनकुळे यांच्या फोन कॉलने पाडली आंदोलनात वीज 

Chandrashekhar Bawankule : शब्दांनी पेटला शेतकऱ्यांचा संताप 

Author

शेतकरी, विधवा आणि वंचितांसाठी मोजारीत उपोषणाला बसलेले बच्चू कडू आता सत्तेच्या भाषेवरच भडकले आहेत. चंद्रशेखर बावनकुळे यांच्या फोनवरील ‘बेताल बोलणं’ आंदोलनाच्या पेटलेल्या अंगारात तेल ओतणारे ठरले आहे.

शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी, त्यांच्या मुलांना शिष्यवृत्ती, विधवा आणि दिव्यांग महिलांना मानधन देण्यासाठी बच्चू कडू यांनी सुरू केलेल्या अन्नत्याग आंदोलनाचा आज चौथा दिवस आहे. अमरावती जिल्ह्यातील मोझरी गाव हे या आंदोलनाचं केंद्रबिंदू ठरलं असून राज्यभरातून कडू यांना पाठिंबा मिळू लागला आहे. मात्र, या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर एक नवीन वाद उसळला आहे, तो म्हणजे चंद्रशेखर बावनकुळे यांच्या फोनवरून पेटलेला.

महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी बच्चू कडू यांना काल फोन करून आंदोलनाबाबत चर्चा करण्याचा प्रयत्न केला. मात्र हा संवाद वादात परिवर्तित झाला. बच्चू कडू यांनी या फोनवर झालेल्या संभाषणावर तीव्र नाराजी व्यक्त करत सांगितले की, सरकारकडून समजूत घालण्याचा प्रयत्न नाही, तर आदेश देण्याची, दडपशाहीची भाषा वापरली गेली. त्यांनी स्पष्टपणे सांगितलं, जमलं तर उपोषण थांबवा, नसलं तर चालू ठेवा. ही सत्ताधाऱ्यांची भाषा आहे का? असा सवाल बच्चू कडू यांनी उपस्थित केला.

बोलण्याची पातळी

कडूंनी स्पष्ट केलं की बावनकुळे आमचे मित्र आहेत. पण त्यांनी जी भाषा वापरली ती अत्यंत उद्धट आणि असंवेदनशील होती. त्यांच्या आवाजात सहवेदना नव्हती, अहंकार होता. मंत्री असताना बोलण्याची काही पातळी असते. ही भाषा म्हणजे सत्तेचा फणा दाखवणं होतं. आम्ही ती सहन करणार नाही, असं बच्चू कडू म्हणाले.

या फोन संभाषणाचा तपशील देताना कडूंनी असंही म्हटलं की, जर हा कॉल रेकॉर्ड झाला असता, तर लोकांना समजलं असतं की आम्ही किती संयम ठेवून बोलत होतो आणि समोरून कशी बदमाशीची भाषा वापरली गेली. त्यांनी सरकारवर टीका करत सांगितले की, ज्या वेळी माझ्या बहिणीच्या समस्येवर मी आवाज उठवला, तेव्हा कोणतीही बैठक झाली नाही. आता मात्र मापदंड सांगितले जात आहेत. त्या वेळी का गप्प बसलात?

बच्चू कडू यांनी पुन्हा एकदा स्पष्ट केलं आहे की, हे आंदोलन मागे घेण्याचा प्रश्नच नाही. आम्ही शेतकरी, विधवा आणि वंचितांसाठी लढतो आहोत. सरकारने जर बोलण्याची भाषा बदलली नाही, तर जनता त्यांच्या सत्तेचा ‘फना’ कसा उतरवते हे दिसेल. राजकीय वर्तुळात या फोन संभाषणाची जोरदार चर्चा सुरु झाली आहे. सोशल मीडियावरही लोक प्रश्न विचारू लागले आहेत. सरकार संवाद करतंय की दबावतंत्र वापरतंय? मोजारी गावात सुरू झालेलं आंदोलन आता केवळ मागण्यांपुरतं मर्यादित नसून, सत्तेच्या भाषाशैलीविरोधातील जनक्षोभाचं प्रतीक ठरू लागलं आहे.

व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!