
राज्यात गेल्या काही महिन्यांपासून शेतकरी कर्जमाफीचा विषय मतदान चर्चेच्या केंद्रस्थानी आहे. अशातच राज्यातील पावसाळी अधिवेशनात सुरुवातीपासूनच विरोधकांनी शेतकरी कर्जमाफीच्या मुद्द्यावर आक्रमक पवित्रा घेतला आहे.
राजकीय रंगमंचावर पुन्हा एकदा शेतकरी प्रश्नाला घेऊन संघर्षाची नवी चढाओढ सुरू झाली आहे. प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष तथा माजी राज्यमंत्री बच्चू कडू शेतकऱ्यांच्या न्यायासाठी रस्त्यावर उतरलेले आहे. आता त्यांनी सरकारला एक धोकादायक इशारा दिला आहे. अन्नत्याग आंदोलनाच्या जोरावर सरकारच्या मनोऱ्याला हादरवणाऱ्या या ठोस नेतृत्वाने आंदोलनाची नवी दिशा निश्चित केली आहे. राज्यातील शेतकरी कर्जमाफीच्या मुद्यावर तीव्र भूमिका घेतली आहे. राज्यात शेतकरी कर्जमाफीचा प्रश्न गेल्या काही महिन्यांपासून उग्र होत आहे.
अर्थसंकल्पीय अधिवेशनात कर्जमाफी बाबत कोणतीही घोषणा झालेली नव्हती. त्यानंतर हा वाद आणखीनच उफाळला. सध्या राज्यात पावसाळी अधिवेशन सुरू आहे. या पार्श्वभूमीवर बच्चू कडू पुन्हा एकदा आंदोलनाच्या रणांगणात सक्रिय झाले आहेत. पावसाळी अधिवेशनाच्या सुरूवातीपासून विरोधकांनी शेतकरी कर्जमाफीचा मुद्दा जोरदारपणे विधिमंडळात मांडला आहे.शेतकरी कर्जमाफीसाठी ठोस निर्णय न झाल्यामुळे अधिवेशनात विरोधकांनी सरकारवर दबाव आणला. माजी आमदार व प्रहार संघटनेचे कार्यकर्ते विधान भवनाच्या परिसरात अधिवेशनाच्या पाचव्या दिवशी (4 जुलै रोजी) आंदोलन करताना दिसले.

Chandrashekhar Bawankule : शेतकऱ्यांच्या अश्रूंना महसूलमंत्र्यांचा धीराचा रुमाल
आंदोलनाचे पुढील टप्पे
काही कार्यकर्त्यांनी विधान भवनाचे गेट ओलांडण्याचा प्रयत्न केला. परंतु पोलिसांनी वेळेत त्यांना ताब्यात घेतले. बच्चू कडू यांनी यापूर्वीही शेतकऱ्यांच्या हक्कांसाठी तीव्र भूमिका घेतली आहे. अमरावतीतील मोझरी येथे त्यांनी आठ दिवस अन्नत्याग उपोषण करून कर्जमाफीसाठी सरकारला दबाव आणला होता. त्या आंदोलनामुळे सरकारने लेखी आश्वासन दिले असले, तरी मागण्या अजूनही पूर्ण झालेल्या नाहीत. त्यामुळे बच्चू कडू पुन्हा एकदा पुढाकार घेऊन सात जुलैपासून पदयात्रा काढण्याची तयारी करत आहेत. सात जुलैपासून अमरावती जिल्ह्यातील पापळ येथून सुरू होणारी पदयात्रा यवतमाळच्या चिलगव्हाण येथून आंबोडा पर्यंत होईल.
आंदोलनाच्या मार्गावर चिलगव्हाण हे गाव पहिली शेतकरी आत्महत्या झालेलं म्हणून ओळखलं जातं. 138 किलोमीटरच्या या भव्य पदयात्रेत बच्चू कडू नेतृत्व करताना दिसतील. ही पदयात्रा शेतकरी कर्जमाफीसाठी आणि त्यांच्या अन्य मागण्यांसाठी एक महत्वाचा धडाका ठरणार आहे. गुरुकुंज मोझरी येथे एक आठवडा चाललेल्या अन्नत्याग आंदोलनानंतर सरकारकडून आश्वासन मिळालं होतं, पण ते केवळ कागदावरच राहिलं. शेतकऱ्यांच्या प्रश्नावर अद्यापही ठोस पाऊले उचलण्यात आली नाहीत, त्यामुळे बच्चू कडू पुन्हा आक्रमक झाले आहेत. त्यांच्या या आंदोलनामुळे राज्यातील शेतकरी प्रश्न पुन्हा केंद्रस्थानी येणार आहे.
राजकारणाच्या या नाट्यमय रंगमंचावर शेतकरी न्यायासाठी बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखालील संघर्ष कोणत्या दिशेने वळेल हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. मात्र, असा लढा शेतकरी संघटनांच्या नव्या जिवाला प्राण फुंकणार आहे हे नक्की.