
विधानसभा निवडणुकीत पराभूत झालेले बच्चू कडू यांनी दिव्यांग कल्याण अभियानाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. या मंत्रालयाचा काहीच फायदा नसल्याचं ते म्हणाले.
महायुतीवर नाराज असलेले प्रहार जनशक्ती पार्टीचे नेते बच्चू कडू विधानसभा निवडणूक हरले आहेत. आता हे सत्तेपासून दूर झाले आहेत. पराभवानंतर बच्चू कडू यांनी दिव्यांग कल्याण अभियानाच्या अध्यक्षपदाचा राजीनामाही दिला आहे. दिव्यांग कल्याण मंत्रालय स्थापन झालं. परंतु त्याचा काहीच फायदा नसल्याची टीका त्यांनी यावेळी केली. राजीनामा दिल्यानंतर कडू यांनी आपल्यादा प्रदान केलेली सुरक्षा काढण्यात यावी, अशी मागणी केली आहे. यासंदर्भातील पत्रही त्यांनी दिलं आहे.
राजीनाम्याबाबत बच्चू कडू यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिलं आहे. या पत्रात त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. राजीनामा दिल्यानंतर असलेली सुरक्षा सुद्धा काढावी असं त्यांनी पत्रात नमूद केलं आहे. दिव्यांगांशी बेईमानी कदापी शक्य नसल्याचं त्यांनी पत्रात म्हटलं आहे. दिव्यांग मंत्रालय निर्मितीनंतर आवश्यक असणाऱ्या सोयी सुविधा मिळाल्या नाहीत. त्यामुळं आपण नाराज असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. इतर राज्यांपेक्षा दिव्यांगांना महाराष्ट्रामध्ये कमी मानधन मिळतं. मानधन वेळेवर मिळत नाही. स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये पाच टक्के निधी खर्च केला जात नाही, असंही कडू यांनी म्हटलं आहे.

सरकारकडून Facility नाहीत
दिव्यांग कल्याण विभागासाठी स्वतंत्र मंत्री आणि सचिव पद नेमण्यात आलेलं नाही. जिल्ह्याच्या ठिकाणी स्वतंत्र कार्यालय सुद्धा नाही. पदभरती सुद्धा करण्यात आलेली नाही. दिव्यांग विभागाच्या समस्या आजही कायम आहेत. मूलभूत सुविधा देखील दिव्यांग मंत्रालयाला नव्हत्या. पदावर राहून ते होणार अशी शक्यता मावळली आहे. त्यामुळं आपण राजीनामा देत असल्याचं त्यांनी मुख्यमंत्र्यांना पाठविलेल्या पत्रात म्हटलं आहे. दिव्यांगांच्या सर्वांगीण विकासासाठी भविष्यात आंदोलन करावे लागणार आहे. त्यामुळं पदावर राहात हे आंदोलन करणं शक्य नाही. त्यासाठी राजीनामा देत असल्याचं बच्चू कडू यांनी नमूद केलं आहे.
दिव्यांगांच्या सर्वांगिण विकासाठी मंत्रालयाचं काम अद्यापही सुरू झालेलं नाही. त्यामुळं आता पदावर राहूनही काम होणार नसल्याचा दावा कडू यांनी केला आहे. राजीनाम्याची प्रत बच्चू कडू यांनी मुंबईत सह्याद्री अतिथी गृह इथं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सादर केली. देशातील पहिले दिव्यांग मंत्रालय महाराष्ट्रात स्थापन करण्यात आले होते. त्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे बच्चू कडू यांनी आभार मानले.
24 मे 2023 रोजी बच्चू कडू यांची दिव्यांग कल्याण विभागाच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली होती. अचलपूर मतदार संघाचे नवे आमदार प्रवीण तायडे यांनी बच्चू कडू यांना दिव्यांग कल्याण मंडळाच्या अध्यक्ष पदावरून कडून टाकावं, अशी मागणी शासनाकडं केली होती. गेल्या काही दिवसांपासून अचलपूर मतदारसंघात बच्चू कडू आणि आमदार प्रवीण तायडे यांच्या वाद पेटला आहे. आता स्वत: बच्चू कडू यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. यानंतर 7 जानेवारीला ते मेंढपाळ, शेतकऱ्यांसाठी आंदोलन करणार आहेत. विधानसभा निवडणुकीतही बच्चू कडू यांनी तिसऱ्या आघाडीची घोषणा राज्यात केली होती. मात्र त्यांच्या आघाडीचा सपाटुन पराभव झाला.