
उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या संभाव्य एकत्र येण्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडाली असतानाच, आता या राजकीय घडामोडींमध्ये अपक्ष आमदार बच्चू कडू यांच्या भूमिकेवरही लक्ष केंद्रित झाले आहे.
महाराष्ट्राच्या राजकारणात नवे वळण घेणाऱ्या हालचालींना वेग आला आहे. पुण्यात प्रहार जनशक्ती पक्षाचे बच्चू कडू, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी आणि राष्ट्रीय समाज पक्षाचे महादेव जानकर एकत्र येत एक नवा राजकीय प्रयोग हाती घेत असल्याची स्पष्ट चिन्हं दिसत आहेत. या मेळाव्यात बच्चू कडूंनी आपल्या विशिष्ट शैलीत भाष्य करत सत्ताधाऱ्यांवर उपरोधिक आणि आक्रमक टीका केली. गिर जाये कबूल है पर अपून नही जाना चाहिए, असं म्हणत त्यांनी आपली न झुकणारी भूमिका पुन्हा अधोरेखित केली.
नव्या आघाडीचा अजेंडा सत्तेसाठी नाही, तर गोरगरिबांसाठी असल्याचा दावा करत कडूंनी शेतकरी, कष्टकरी, शेतमजुरांच्या हक्कासाठी लढण्याची तयारी दर्शवली. महादेव जानकर यांना कशा प्रकारे रामभक्तांनी फसवलं आणि पवारसाहेबांची सत्ता कशी कमी झाली, ही उदाहरणं समाजाच्या डोळ्यांसमोर आहेत, असं सांगत त्यांनी सत्तेतील नेत्यांवर ताशेरे ओढले.

न्यायासाठी संघर्ष
बच्चू कडू यांनी आपल्या राजकीय प्रवासाचा उल्लेख करत सांगितले की, ते चार वेळा स्वतःच्या ताकदीवर निवडून आले. कोणत्याही पक्षाच्या आश्रयाशिवाय त्यांनी आपलं राजकारण उभं केलं. भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडून जागा देण्याचे प्रस्ताव आले असतानाही त्यांनी त्यांना ठाम नकार दिला. कारण, त्यांचा उद्देश केवळ निवडणूकीचा विजय नसून लोकांसाठी काम करण्याचा आहे.
बच्चू कडू यांनी म्हटलं की, आमचा अजेंडा सत्तेपर्यंत जाण्याचा नसून सत्ता गरिबांपर्यंत आणण्याचा आहे.या विधानातूनच त्यांच्या संघर्षशील आणि स्वाभिमानी राजकीय प्रवृत्तीचं प्रतिबिंब उमटलं.
मुख्यमंत्र्यांवर टोला
शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या मुद्द्यावर बच्चू कडूंनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर उपरोधिक भाष्य करत त्यांचं मौन फोडण्याची मागणी केली. मुख्यमंत्री बोलत नाहीत, त्यांना कोणत्या ब्राह्मणाकडून कर्जमाफीसाठी मुहूर्त काढायचा आहे हे त्यांनी स्पष्ट करावं, असे खवचट शब्द वापरत त्यांनी फडणवीसांची खिल्ली उडवली. सत्तेतील अनेकांशी त्यांच्या चांगल्या संबंध असूनही ते शेतकऱ्यांच्या हितासाठी कोणत्याही दबावाखाली झुकणार नाहीत. जो शेतकरीविरोधी, तो आमच्या विरोधात, ही त्यांची ठाम भूमिका असल्याचं त्यांनी पुन्हा अधोरेखित केलं.
नेत्यांनी आपले पक्षभेद बाजूला ठेवत लोकहितासाठी एकत्र येण्याचा प्रयत्न केला आहे. येत्या निवडणूकीत ही आघाडी महत्त्वाची भूमिका बजावेल, असे संकेत मिळत आहेत. बच्चू कडू यांच्या या आक्रमक भाषणाने सत्ताधाऱ्यांच्या गटात खळबळ निर्माण केली आहे. त्यांनी केलेली टोलेबाजी आणि दिलेली उदाहरणं राजकीय चर्चेला नवा रंग देत आहेत.