
शेतकऱ्यांसाठी आणि कर्जमाफीसाठी नेहमीच आक्रमक असणारे शेतकऱ्यांची बच्चू कडू यांनी अमरावती येथे बेमुदत अन्नत्याग आंदोलन छेडले आहे.
गेल्या काही महिन्यांपासून शेतकऱ्यांचा कर्जमाफीचा मुद्दा महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात सतत गाजत आहे. विधानसभा निवडणुकीनंतर महायुती सरकारकडे शेतकऱ्यांनी नव्या आशेने पाहिले. कर्जमाफीसाठी अर्ज, आंदोलने, मोर्चे प्रत्येक मार्ग त्यांनी अवलंबला. मात्र, अजूनही हजारो शेतकऱ्यांना या योजनांचा प्रत्यक्ष लाभ मिळालेला नाही. त्यामुळे शेतकरी वर्गात नाराजीचा सूर अधिकच तीव्र झाला आहे. या प्रश्नावर आता प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. कर्जमाफीसह शेतमजुरांसाठी स्वतंत्र आर्थिक महामंडळ व दिव्यांगांच्या विविध मागण्यांसाठी बच्चू कडू बेमुदत अन्नत्याग आंदोलन छेडणार आहेत.
आंदोलनाची सुरुवात 8 जून मोझरी येथील राष्ट्रसंत तुकडोजी महाराज समाधी परिसरात होणार आहे. या आंदोलनाची उभारणी भव्य स्वरूपात करण्यात आली आहे. अमरावतीमधील संत गाडगेबाबा मंदिरापासून मोझरीपर्यंत एक भव्य बाईक रॅली काढण्यात येणार आहे. या रॅलीमध्ये जवळपास 20 हजार शेतकऱ्यांचा सहभाग अपेक्षित आहे. आंदोलनापूर्वी माध्यमांशी बोलताना बच्चू कडू म्हणाले, आमची अंत्ययात्रा निघाली तरी चालेल. पण मागण्या मान्य झाल्याशिवाय मागे हटायचं नाही. त्यांच्या या निर्धाराने आंदोलनाच्या तीव्रतेचा अंदाज यायला सुरुवात झाली आहे. बच्चू कडू यांनी स्पष्ट केले की, कर्जमाफी, शेतमालाला हमीभाव, दिव्यांगांचे मानधन, मच्छीमारांचे प्रश्न, मेंढपाळांचे हक्क या सर्व मुद्द्यांसाठी ते आवाज उठवत आहेत.

Devendra Fadnavis : बेगानी शादी में अब्दुल्ला दिवाना मी नाही
ईव्हीएमवर ठाम भूमिका
शासनाकडून याआधी आश्वासने मिळाली होती, मात्र प्रत्यक्ष अंमलबजावणी अद्याप झालेली नाही. आता मागे हटण्याचा प्रश्नच येत नाही, असे ठाम मत त्यांनी मांडले. शेतमालांचे भाव कोसळले आहेत, हमीभाव मिळत नाही, घरकुलाच्या यादीत अनेकांचे नाव नाही, दिव्यांग व निराधारांच्या मानधनात विलंब होतो या सर्व प्रश्नांना त्यांनी केंद्रस्थानी आणले आहे. अधिकारी आणि मंत्र्यांचे पगार वेळेवर होतात, मग दिव्यांगांचा निधी का थांबतो? असा सवाल करत त्यांनी शासनाच्या धोरणांवर टीका केली. राजकीय समीकरणांवर बोलताना बच्चू कडू म्हणाले की, राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे एका घरातील आहेत म्हणून नव्हे, तर मुद्द्यांवर एकत्र आले तर महाराष्ट्रासाठी ते चांगले ठरेल.
मुंबई वाचवणे आताची खरी गरज आहे. महाराष्ट्र निवडणुकीबाबत राहुल गांधी यांच्या लेखावर भाष्य करताना बच्चू कडू यांनी ईव्हीएमवर आपली ठाम भूमिका मांडली. ईव्हीएम हे काँग्रेसच्या चुकीच्या निर्णयाचे मूळ आहे. त्यांनी बी पेरले, त्याला भाजपने विषारी फळ दिले आहे. लोकशाहीच्या खुनाला भाजप जबाबदार आहे, असे ते म्हणाले. या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारकडून काय प्रतिसाद दिला जातो, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. सध्या मात्र बच्चू कडू यांनी निर्णायक लढ्याचा बिगुल फुंकला आहे. मोझरीतून शेतकरी पुन्हा एकदा रस्त्यावर येण्यास सज्ज झाले आहेत.