
पहलगाम हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानवर ‘ऑपरेशन सिंदूर’ अंतर्गत वज्रप्रहार केला. संपूर्ण उपखंड पुन्हा एकदा युद्धछायेत झाकोळले. या पार्श्वभूमीवर बच्चू कडूंचं आक्रमक विधान साऱ्यांचे लक्ष वेधून घेतंय.
देशात पुन्हा एकदा युद्धजन्य वातावरण निर्माण झालं. जम्मू-काश्मीरमधील पहलगाममध्ये झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर भारताने पाकिस्तानविरोधात मोठा सैनिकी कारभार हाती घेतला. ‘ऑपरेशन सिंदूर’ अंतर्गत भारतीय सैन्याने पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील अनेक दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले. तीन दिवसांच्या या तीव्र संघर्षात भारतीय सैन्याने अनेक दहशतवाद्यांना ठार मारत जबरदस्त प्रत्युत्तर दिलं. आता या संघर्षानंतर दोन्ही देशांमध्ये शस्त्रसंधी लागू झाली असली, तरी वातावरण अजूनही तणावपूर्णच आहे.
या पार्श्वभूमीवर प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी अतिशय आक्रमक प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी थेट पाकिस्तानविरुद्ध निर्णायक कारवाईची मागणी करत, ‘पाकिस्तानचे सततचे दुखणे कायमचे संपवले पाहिजे. जसे इंदिरा गांधींनी बांगलादेश वेगळा केला, तसाच पाकिस्तानही भारतात समाविष्ट करावा. त्यासाठी जर सैनिक कमी पडत असतील तर प्रहारचा कार्यकर्ता आणि मी स्वतः तयार आहे,’ असं विधान बच्चू कडू यांनी केलं आहे. त्यांच्या या वक्तव्यानं राजकीय वर्तुळात मोठी चर्चा सुरू झाली आहे.

शस्त्रसंधीनंतरही सावध
पाकिस्तानचा दहशतवाद पुरवणारा चेहरा पुन्हा एकदा उघड झाला आहे. पहलगाम हल्ल्यानंतर भारताने संयम न राखता प्रतिहल्ल्याची रणनीती स्वीकारली. ऑपरेशन सिंदूरमध्ये ड्रोन हल्ले, अचूक बॉम्बफेक आणि विशेष फौजांचा वापर करत भारताने दहशतवादी अड्ड्यांचा पाडाव केला. पाकिस्तानच्या कुरापतींना प्रत्युत्तर देण्याची ही नवी पद्धत असल्याचे संरक्षण विश्लेषक मानतात. राजकीय घडामोडींवर भाष्य करताना बच्चू कडू म्हणाले, राष्ट्रवादी काँग्रेस कधी वेगळी होतीच का? पवार साहेब आणि अजित दादा नेहमीच एकत्र होते. आता एकत्र येण्याचे नाटक जनतेला भुलवण्यासाठी आहे. त्यांनी स्पष्ट केलं की, पक्षीय राजकारणापेक्षा जनतेच्या प्रश्नांना प्राधान्य देणं गरजेचं आहे.
प्आंदोलनाचा एल्गार
बच्चू कडू यांनी पुढे जाहीर केलं की, 2 जूनपासून आमचं आंदोलन सुरू होईल आणि 3 जूनला बारामतीत पहिली सभा होईल. पंकजा मुंडे, बाळासाहेब पाटील आणि संजय राठोड यांच्या निवासस्थानासमोर आमचं आंदोलन होईल. ७ जूनला छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक दिनी नागपूरकडे कूच करून फडणवीसांच्या घरासमोर मुक्कामी आंदोलन करणार आहोत. ते म्हणाले, “कोरोना काळात सरकारने ताटे वाजवायला सांगितले होते. आता आम्हीच ताटे वाजवणार आहोत, पण आंदोलनासाठी. कारण सरकार जे वचन विसरलंय, त्याची आठवण करून देण्याची वेळ आली आहे.
Devendra Fadnavis : मुख्यमंत्र्यांच्या कमांड सेंटरमधून सुरक्षेचा नवा मंत्र
शेतकऱ्यांची कर्जमाफी
कडू यांनी सरकारवर लाडक्या बहिणी आणि शेतकऱ्यांच्या नावाखाली गाजावाजा करून फसवणूक केल्याचा आरोप केला. अजूनही एक हजार 500 रुपयांवरच अडकलंय. हे सरकार लाडक्या शब्दालाच घाबरतंय. अर्थखाते बारामतीत असूनही म्हणतात ‘अर्थ नाही’. आम्ही त्यांना दाखवणार की अर्थ कसा निर्माण करायचा. आमचेच पैसे आम्हाला परत करा, मग कर्जमाफी शक्य होईल, असे ते म्हणाले. सरकारच्या योजनांना हवा अधिकृत पैंजण घालणाऱ्यांना कडू यांनी इशारा दिला. ते म्हणाले, “वेळ आली तर आम्ही कोर्टात जाऊ, सरकारवर गुन्हे दाखल करू. आमचा संयम पाहू नये. प्रहारचा प्रत्येक कार्यकर्ता रस्त्यावर उतरण्यास तयार आहे.”