
तुकडोजी महाराजांच्या चरणी अन्नत्यागाचा संकल्प घेत, बच्चू कडू शेतकऱ्यांच्या हक्कांसाठी मैदानात उतरले आहेत. नेता उपाशी राहील, पण शेतकरी वाचला पाहिजे, या निर्धारासह त्यांनी बेमुदत आंदोलन सुरू केलं आहे.
शेतकऱ्यांचे प्रश्न आता घोषणांच्या गजरात हरवले. राजकीय मंचांवर फक्त मतांचं राजकारण सुरू असताना एक नेता मात्र शेतकऱ्यांच्या व्यथा घेऊन तुकडोजी महाराजांच्या समाधीस्थळी अन्नत्यागाच्या भूमिकेसह आंदोलनात बसलाय. माजी मंत्री बच्चू कडू यांनी सुरू केलेल्या बेमुदत अन्नत्याग आंदोलनाने संपूर्ण राज्याचे लक्ष वेधून घेतले आहे. गुरुकुंज मोझरीच्या पवित्र मातीवर, संतांच्या चरणी, बच्चू कडू यांनी पुकारलेले हे आंदोलन केवळ मागण्यांचं नव्हे, तर व्यवस्थेच्या विरोधात एक जिवंत युद्ध ठरतंय. माझी अंत्ययात्रा निघाली तरी बेहत्तर पण मागे हटणार नाही, या जळजळीत शब्दांनी त्यांनी सरकारला थेट आव्हान दिलं आहे.
बच्चू कडू यांनी आपल्या आंदोलनाच्या माध्यमातून काही ठोस आणि लोकाभिमुख मागण्या मांडल्या आहेत. राज्यातील शेतकऱ्यांची पूर्ण कर्जमाफी व्हावी, दिव्यांग नागरिकांना दरमहा सहा हजार रुपये मानधन मिळावे. तसेच पेरणीपासून कापणीपर्यंतची सर्व शेती कामे मनरेगा (MGNREGA) अंतर्गत आणावीत, अशा त्यांच्या प्रमुख मागण्या आहेत. यासोबतच मच्छीमार, मेंढपाळ व दूध उत्पादकांसाठी स्वतंत्र धोरण लागू करावे आणि ग्रामीण भागातील घरकुल योजनेतील अनुदानाची रक्कम वाढवावी, अशीही त्यांनी मागणी केली आहे.

कडू काय म्हणाले?
माझा बाप मेला तरी चालेल, पण नेता वाचावा अशी व्यवस्था बदलावी लागेल. माझा खरा नेता म्हणजे शेतकरी राजा, तो जिवंत राहिलाच पाहिजे. या आक्रमक आणि जिव्हारी लागणाऱ्या शब्दांत बच्चू कडू यांनी व्यवस्थेचा पोकळपणा उघड केला. सोयाबीनचे दर सहा हजारांवरून चार हजारांवर आले. तुरीचे दर हजारांनी घसरले. पण कुणीही उठून बोलत नाही, कारण देशात जातीय विष पेरण्याचे षड्यंत्र सुरू आहे, असं बच्चू कडू म्हणाले.
राज्यात मराठा-ओबीसी वाद, देशात हिंदू-मुस्लिम ध्रुवीकरण, हे सगळं हेतूपुरस्सर केलं जातंय. पण खऱ्या प्रश्नांवरून लक्ष हटवण्यासाठी हा डाव खेळला जातोय. आमच्या डोक्यात विष पेरलं जातंय. या विषावर रामबाण म्हणजे हे आंदोलन, बच्चू कडू यांचा ठाम पवित्रा. सरकारने मतं मिळवण्यासाठी ‘लाडकी बहीण’ योजना आणली, पण त्याच वेळी शेतमालाचे भाव कोसळले. बहिणींची मतं विकत घेतली, पण शेतकऱ्यांचं आयुष्य मात्र गहाण टाकलं. सरकार झुकलं नाही, तर कसं झुकवायचं ते आम्हाला ठाऊक आहे, असा घणाघातही कडूंनी केला.
आंदोलनाने धरला जोर
रविवारी आंदोलनाला बसण्याआधी बच्चू कडूंनी संत गाडगेबाबांच्या समाधीला वंदन केलं. त्यानंतर ट्रॅक्टर ट्रॉलीवर स्वार होत त्यांनी शहरात भव्य मिरवणूक काढली. पंचवटी चौक, इर्विन चौक, गर्ल्स हायस्कूल चौक मार्गे जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत ही ज्वालामुखी समान मिरवणूक झाली. ज्यामध्ये शेकडो कार्यकर्ते दुचाकींवर सहभागी झाले. वेळ आली तर बलिदानही देईन, पण शेतकऱ्यांच्या जीवावर सौदेबाजी होणार नाही. हे वक्तव्य केवळ आंदोलन नाही, तर संपूर्ण व्यवस्थेला आरसा दाखवणारा हुंकार आहे.
राजकारण, घोषणा, आणि योजनांच्या पलीकडे जिथे खऱ्या भारताचा श्वास घेणारा शेतकरी उभा आहे. त्याच्या बाजूने उभं राहून आवाज उठवणारे फार थोडे नेते आहेत. बच्चू कडू यांचं हे आंदोलन म्हणजे शेतकऱ्यांच्या व्यथा, दु:ख आणि त्यांच्या अस्तित्वासाठीचा आरंभ झालेला लढा आहे. कदाचित हा लढा व्यवस्थेला हादरवून टाकणारा ठरेल!