महाराष्ट्र

Akola BJP : पुन्हा तीच चूक प्रचंड भोवणार!!!

Corporation Elections: पदाधिकाऱ्यांनी वरपर्यंत कळविल्या भावना

Share:

Author

लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीनंतर आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे वेध लागले आहेत. आगामी निवडणुकीमध्ये पुन्हा तीच चूक करू नये, अशी प्रामाणिक आणि आक्रमक भावना भाजपच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांमधून व्यक्त करण्यात येत आहे.

अकोल्यातील भारतीय जनता पार्टीमध्ये मोठ्या प्रमाणात नाराजीचा सूर उगवला आहे. अकोल्यामध्ये आता भाजपमध्ये फूट पडण्यास सुरुवात झाली आहे. कार्यकर्त्यांचे पक्षातून आउटगोइंग सुरू झालेले आहे. नेत्यांनी दिलेल्या अपमानास्पद वागणुकीमुळे दुखावलेले अनेक जण आता भाजपपासून अंतर राखून आहेत. याचा प्रत्यय अकोला पश्चिम विधानसभा निवडणुकीत भाजपने घेतला. विरोध असताना देखील चुकीचा उमेदवार निवडल्याने अकोल्यामध्ये भाजपची पानिपत पेक्षाही वाईट परिस्थिती झाली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे आल्यानंतरही अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघात भाजपचा झालेला पराभव हा अत्यंत लाजिरवाणा आहे. मात्र त्यानंतरही काही नेत्यांकडून पदाधिकारी व कार्यकर्त्यांना धमक्या देण्याचे काम सुरूच आहे. अशा परिस्थितीत आता अकोला भाजपमध्ये अस्वस्थता मोठ्या प्रमाणात वाढली आहे. ही अस्वस्थता उग्ररूप घेत असताना भविष्यात अकोला महानगरपालिकेची निवडणूक होणार आहे.

वरिष्ठ नेत्यांची चापलुसी

महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी भाजपमधील एका नेत्याने जोरदार फील्डिंग लावली आहे. प्रदेश पातळीवरील नेत्यांची चापलूसी करून महापौर पदासाठी आपली उमेदवारी जाहीर व्हावी यासाठी हा नेता प्रयत्न करत आहे. यासाठी प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, कार्यकारी अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचे चपला पुसण्यापासून त्यांच्या पायाचे तीर्थ पिण्याचे काम हा नेता करत आहे.

Akola BJP : सरचिटणीसाकडून पदाधकारी, कार्यकर्त्यांना धमक्या 

महापौर पदाची निवडणूक यंदा थेट जनतेमधून होणार आहे. म्हणजेच सामान्य मतदार नगरसेवकासह महापौरची देखील निवड करणार आहेत. अशा परिस्थितीमध्ये ज्याला आपली इज्जत निवडणुकीमध्ये सांभाळता आली नाही, अशा नेत्यांना पुन्हा नेतृत्व बहाल करू नये, अशी मागणी करणारे संदेश राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून व भाजपकडून वरपर्यंत नेत्यांना गेला आहे.

चुकीचा उमेदवार

विधानसभा निवडणुकीनंतर अकोल्यातील चित्र पूर्णपणे बदलले आहे. भाजपमधील नाराजी मोठ्या प्रमाणावर उफाळून आली आहे. अकोल्यात काँग्रेसचे प्राबल्य दिवसेंदिवस वाढत आहे. भाजपचा पारंपारिक हिंदू मतदार देखील भाजपला सोडून काँग्रेसकडे गेला आहे. विधानसभा निवडणुकीच्या निकालावरून आणि त्याच्या आकडेवारीवरून हे दिसून येते. चुकीचा उमेदवार निवडल्यामुळे संघाच्या स्वयंसेवकांनी आणि भाजपच्या अनेक कार्यकर्त्यांनी अखेरच्या क्षणापर्यंत निवडणुकीसाठी प्रचाराचे काम केले नाही. यावरून जनतेच्या आणि कार्यकर्त्यांच्या विरोधात गेले तर काय होऊ शकते, याचा जबरदस्त धडा भाजपला मिळाला आहे.

Nagpur Police : सीएमच्या गावात वाहतुकीसाठी अर्चित चांडक उतरले मैदानात

एवढी मोठी ठोकर लागल्यावरही जर भाजपचे वरिष्ठ पातळीवरील नेते अकोल्यामध्ये शहाणे झाले नसतील तर, नाना पाटेकर आणि अजय देवगन यांच्या अपहरण या चित्रपटातिल एक डायलॉग येथे परिपूर्ण लागू होतो. जिथे अजय देवगन यांने एका व्यापाराचे अपहरण केल्यानंतर नाना पाटेकर जेलमध्ये बसलेल्या आपल्या एका प्याद्याला म्हणतात की, ‘तुम्हारे पिछवाड़ेसे लंगोटी लेकर चला गया और तुम्हें पतेही नहीं लगा’! हाच डायलॉग अकोल्यातील भाजपने शहाणपणाची भूमिका घेतली नाही तर परफेक्ट लागू पडेल.

चांगल्या व्यक्तिमत्त्वाची आवश्यकता

आत्तापर्यंत ज्या निवडणूक झाल्या मग ती लोकसभा असो किंवा विधानसभा  या निवडणुकीच्या निकालातून जनतेला काय हवं आहे? आणि जनतेच्या मनातला नेता कोण आहे? हे ओळखून किमान चांगलं व्यक्तिमत्व अकोलेकरांना महापौर म्हणून द्यावं, अशी प्रामाणिक इच्छा व्यक्त होत आहे. अन्यथा अकोलेकर भाजपचा कमळ पुन्हा एकदा अकोल्यातील मोरणा नदीच्या गटार गंगेमध्ये बुडविल्याशिवाय राहणार नाहीत, असे आता भाजपचे पदाधिकारी आणि कार्यकर्तेच बोलत आहेत.

व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!