भंडारा जिल्ह्यातील बेला ग्रामपंचायतने राष्ट्रीय पातळीवरील ‘कार्बन न्यूट्रल पंचायत’ पुरस्कार मिळवला आहे. तर अप्पर मुख्य सचिव आभा शुक्ला यांनी ग्रामपंचायतीला भेट देऊन कामाचे कौतुक केले आहे.
भंडारा जिल्ह्यातील बेला ग्रामपंचायतने देशपातळीवर आपले नाव उज्वल करत ‘राष्ट्रीय कार्बन न्यूट्रल पंचायत पुरस्कार’ पटकावला आहे. पर्यावरणपूरक उपक्रम आणि शाश्वत विकासाची दिशा स्वीकारत ग्रामपंचायतीने घडवलेल्या ऐतिहासिक कार्याची दखल घेत राज्याच्या अप्पर मुख्य सचिव ऊर्जा व पालक सचिव भंडारा आभा शुक्ला यांनी बेला ग्रामपंचायतीला भेट देऊन कामाची पाहणी केली आणि कामाचे कौतुक केले.
आभा शुक्ला यांनी या भेटीदरम्यान ग्रामपंचायतीच्या विविध उपक्रमांची माहिती घेतली. स्वच्छ ऊर्जा प्रकल्प, सौरऊर्जा वापर, कचरा व्यवस्थापन, वृक्षारोपण आणि जलसंधारणासारख्या उपक्रमांमुळे ग्रामपंचायतीने कार्बन उत्सर्जन कमी करण्यासाठी महत्वपूर्ण योगदान दिले आहे. या उल्लेखनीय कार्यामुळे ग्रामपंचायतीला राष्ट्रीय कार्बन न्यूट्रल पंचायत पुरस्कार मिळाला आहे.
आदर्श कार्य
ग्रामपंचायतीने स्वच्छ ऊर्जा वापरावर भर देत घरगुती सौर ऊर्जा प्रकल्पांची स्थापना केली आहे. तसेच जैविक कचऱ्याचे कंपोस्ट खतामध्ये रूपांतर, जलसंधारणासाठी सांडपाण्याचा पुनर्वापर आणि ‘हरित ग्राम योजना’ अंतर्गत मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण करण्यात आले आहे. यामुळे गावाचा कार्बन फुटप्रिंट मोठ्या प्रमाणात कमी झाला आहे.
ग्रामपंचायतीच्या कामाची माहिती घेतल्यानंतर आभा शुक्ला यांनी ग्रामस्थांचे आणि ग्रामपंचायतीचे विशेष कौतुक केले. शुक्ला म्हणाल्या की, बेला ग्रामपंचायतीने पर्यावरणपूरक उपक्रम राबवत संपूर्ण देशासमोर एक आदर्श निर्माण केला आहे. स्वच्छ ऊर्जा, सांडपाण्याचा पुनर्वापर आणि वृक्षारोपणासारख्या उपक्रमांमुळे भविष्यातील टिकाऊ विकासासाठी हे एक प्रेरणादायी उदाहरण ठरेल.
ग्रामस्थांचा उत्साह
अप्पर मुख्य सचिवांच्या भेटीमुळे ग्रामस्थांमध्ये मोठा उत्साह दिसून आला. त्यांनी आपल्या गावासाठी मिळालेला हा पुरस्कार हा सर्व ग्रामस्थांच्या सामूहिक प्रयत्नांचा परिणाम असल्याचे सांगितले. यावेळी अनेक ग्रामस्थांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आणि पुढील काळात देखील पर्यावरणपूरक उपक्रम राबवण्याची ग्वाही दिली.
बेला ग्रामपंचायतने पर्यावरण संवर्धन आणि स्वच्छ ऊर्जेचा वापर करत संपूर्ण देशापुढे एक आदर्श निर्माण केला आहे. अप्पर मुख्य सचिव आभा शुक्ला यांची भेट ही ग्रामपंचायतीच्या कामाचा सन्मान असून भविष्यात आणखी अनेक पर्यावरणपूरक उपक्रम राबवून देशात नवा आदर्श निर्माण करण्याचा निर्धार ग्रामपंचायतीने व्यक्त केला आहे.
