
खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर कृषी विभागाने बनावट खत जप्त करून मोठी कारवाई केली. बनावट बियाणे व खतांवर नियंत्रण ठेवण्यासाठी साथी पोर्टलची अंमलबजावणी सुरू करण्यात आली आहे.
नवीन खरीप हंगामाचा उत्साह शेतकऱ्यांमध्ये जोमाने वाढू लागला असतानाच, बनावट बियाणे आणि कृषी उत्पादनांच्या विक्रीचा घोटाळाही उघड झाला आहे. खरीप हंगामात शेतकरी बियाणे खरेदीस गर्दी करतात, पण अनेकदा बनावट किंवा खराब बियाण्यांमुळे त्यांना आर्थिक तोटा सहन करावा लागतो. यामुळे केंद्र शासनाने बियाणे उत्पादनापासून विक्रीपर्यंत पूर्ण नियंत्रण ठेवण्यासाठी साथी पोर्टल विकसित केले आहे. या पोर्टलवर कृषी विभागाकडून दिलेल्या सत्यप्रत बियाण्यांची नोंदणी अनिवार्य करण्यात आली आहे.
यामुळे शेतकऱ्यांना बनावट बियाण्यांपासून संरक्षण मिळेल आणि बियाण्यांच्या किमतींवरही नियंत्रण राहील. या नव्या उपाययोजनेमुळे बियाणे विक्रीतील फसवणुकीचा धोका निश्चितच कमी होईल, अशी अपेक्षा आहे. भंडाऱ्याच्या लाखनी कृषी उत्पन्न बाजार समितीतून बोगस खतांच्या विक्रीचा प्रकार समोर आल्यानंतर कृषी विभागाने तत्परतेने कारवाई करत ठोस पावले उचलली आहेत. अवैध, बनावट आणि विनापरवाना खतांची विक्री करणाऱ्यांविरुद्ध थेट कारवाई करण्यात आली आहे. कृषी विभागाच्या गुणवत्ता नियंत्रण पथकाने लाखनीतून तब्बल १२९ मेट्रिक टन ‘ब्रह्मास्त्र भू सुधारक’ नावाचं बनावट खत जप्त केलं आहे.

विदर्भात वाढले संशय
मोठ्या प्रमाणात ताब्यात घेतलेल्या खतामुळे शेतकरी वर्गात खळबळ उडाली आहे. काही दिवसांपूर्वी गुजरातच्या कंपनीसह नागपूरच्या पुरवठादारांवरही कारवाई करण्यात आली होती. या खताचे नमुने अमरावती येथील प्रयोगशाळेत तपासासाठी पाठवले गेले. अहवाल प्राप्त होताच संपूर्ण साठा ताब्यात घेऊन त्यावर विक्री बंदी घालण्यात आली. ही कारवाई खरीप हंगामात जिल्ह्यात वाढत असलेल्या बोगस कृषी उत्पादनांच्या विक्रीवर मोठा धक्का ठरली आहे.गुजरातच्या भावनगर येथील फॉर्मडील इंडिया एलएलपी या कंपनीसोबतच नागपूर येथील ‘क्रिसोलाईट प्रियांश ऍग्रो’ आणि लाखनी कृषी बाजार समितीच्या एका सचिवाविरुद्ध पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे.
तक्रार बनावट खतांच्या विक्रीचा भांडाफोड करणाऱ्या कृषी विभागाच्या पथकाने दिली आहे. सद्य परिस्थितीत या प्रकरणाची पुढील चौकशी सुरू असून, विदर्भातील इतर भागांत या प्रकारच्या खतांच्या विक्रीचा शोध घेतला जात आहे.भंडाऱ्याच्या एका तालुक्यात एवढ्या मोठ्या प्रमाणात बोगस खत सापडल्यामुळे शेतकरी वर्गात अस्वस्थता निर्माण झाली आहे. खरीप हंगामात कृषी उत्पन्नावर अवलंबून असलेल्या शेतकऱ्यांसाठी ही गोष्ट चिंताजनक ठरली आहे. या प्रकारामुळे कृषी विभागाला खतांच्या गुणवत्तेवर आणि विक्रीवर आणखी काटेकोर नियंत्रण ठेवण्याची गरज अधोरेखित झाली आहे.