
पुराणात महत्व असलेल्या गंगा दर्शनानं भंडारा-गोंदियातील भाजपचे हेवीवेट नेते आमदार डॉ. परिणय फुके यांनी काया, वाचा, मानसिक शुद्धीसह मतदारसंघातील विकासाच्या गंगेचा ओघ कायम राहावा, अशी प्रार्थना केली.
रमापती अर्थात लक्ष्मीचे पती विष्णुच्या अंगठ्यापासून उत्पन्न झालेल्या गंगेला पृथ्वीवर आणण्यासाठी भगीरथानं प्रचंड कठोर तप केला. देवेंद्राच्या स्वर्गातून धरणीवर आलेल्या गंगेच्या वेगाना सावरण्यासाठी शंकरानं तिला आपल्या जटेत धारण केलं. या गंगेनं पृथ्वीवरील सजीवसृष्टीला मोठं जीवनदान दिलं. पुराणांमध्ये हा उल्लेख आढळतो. संपूर्ण सजीवसृष्टीचं कल्याण करणाऱ्या त्याच माता गंगेपुढं भंडाऱ्यातील एका रमापुत्र नतमस्तक झाले. महाराष्ट्रात महायुतीचं सरकार आल आहे. ‘देवेंद्रपर्व’ पुन्हा सुरू झालं आहे. माझ्या मतदारसंघात तुझ्या अव्याहत प्रवाहाप्रमाणे विकासाचा ओघ असाच कायम राहू दे, अशी प्रार्थना या नेत्यानं केली.
ऐतिहासिक, पौराणिक महत्व असलेल्या गंगेचा प्रवाह ज्या भाजप सरकारनं ‘नमामी गंगे’ प्रकल्पातून पुन्हा पवित्र केला, त्याच भाजपच्या नेत्यानं ही प्रार्थना केली. योगायोगानं या नेत्याच्या मातोश्रीचं नाव रमा आणि वडिलांचे नाव रमेश ज्याचा अर्थ विष्णू. हे नेते दुसरे तिसरे कोणी नसून माजी राज्यमंत्री व विद्यमान भाजप आमदार डॉ. परिणय रमा रमेश फुके आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देखील अनेकदा तीर्थाटन करतात. मन:शांती आणि सकारात्मक ऊर्जा मिळविण्यासाठी ते नियमित योगाभ्यास करतात. ध्यानधारणा आणि वेगवेगळ्या धार्मिक स्थळांना भेटही देतात. त्याच प्रमाणे भाजपचे अनेक नेतेही सनातन धर्माप्रती जागरूक असल्याचं दिसतं.

वेगानं Development
अगदी आदीअनंत काळापासून तीर्थक्षेत्राला जाण्याचे महत्व आजही अबाधित आहेत. अशात गंगेचं दर्शन म्हणजे आपल्या आयुष्याचं सार्थकच. गंगा अनेक जन्मांच्या पापांना नष्ट करते, पितरांना मोक्ष प्रदान करते असा उल्लेख अनेक ग्रंथात आहेत. त्याच गंगेची डॉ. फुके यांनी मनोभावे पूजा करीत आरतीही केली. महाराष्ट्रात भाजप कार्यकर्त्यांच्या स्वप्नातील महायुतीचं सरकार सत्तारूढ झालं आहे. मुख्यमंत्रिपदी देवेंद्र फडणवीस यांनी आपली आणखी एक टर्म सुरू केली आहे. अशात फडणवीस यांच्या टीममधील सगळ्यात विश्वासू आदी दमदार खेळाडू असलेल्या डॉ. परिणय फुके यांचा मतदारसंघ विकासापासून वंचित राहूच शकणार नाही, याची सर्वांना खात्री आहे.
राज्यात महायुतीला भरभरून जनआशीर्वाद मिळाला आहे. त्यामुळं केंद्र आणि राज्य सरकारच्या एकत्रित निधीची गंगा महाराष्ट्रात वाहणार आहे. भगीरथानं जशी गंगा हिमालयातून कानाकोपऱ्यात पोहोचवली अगदी तशीच विकासाची गंगा भंडारा-गोंदियात यावी, यासाठी आमदार डॉ. फुके आतापर्यंत भगीरथ प्रयत्न करीत होते. मुख्यमंत्रिपदी आता देवेंद्र फडणवीस विराजमान झाल्यानं डॉ. फुके यांच्या यांची भगीरथ तपस्या आता फळाला येईल, असं चित्र आता आहे. डॉ. फुकेंनी विकासाच्या बाबतीत शब्द टाकला अन् फडणवीस यांनी तो कानावर घेतला नाही, असं आतापर्यंत झालेलं नाही. मात्र आता ‘आपलं सरकार’ आल्यानं डॉ. फुके यांचा गड असलेल्या भंडारा-गोंदियात केंद्र सरकार, राज्य सरकार यांचा निधी अन् फुकेंच्या प्रयत्नानं होणाऱ्या विकासाचा त्रिवेणी संगम दिसणार यात आता संशयच नाही.