महाराष्ट्र

Bhandara : शिक्षणासाठी आलेला निधी भ्रष्टाचाराच्या विळख्यात

Z P School : शाळा समितीचा प्रशासनावर गंभीर आरोप

Author

भंडाऱ्यातील जिल्हा परिषदेच्या शाळेत विकासाच्या नावाखाली लाखोंचा भ्रष्टाचार उघडकीस आला आहे.

भंडारा जिल्ह्यातील तुमसर तालुक्यातील मांढळ येथील जिल्हा परिषद शाळेत एक धक्कादायक प्रकार उघडकीस आलेला आहे. विकासकामांच्या नावाखाली लाखो रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचा प्रकार समोर आला आहे. शाळा व्यवस्थापन समितीने याबाबत गंभीर आरोप करत संबंधित अधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल केली आहे. शाळेच्या विकासासाठी मंजूर केलेला निधी योग्यप्रकारे खर्च झालाच नसल्याचे समितीच्या पाहणीतून स्पष्ट झाले आहे.

शाळेच्या आवारभिंतीसाठी तब्बल 1 लाख 85 हजार रुपये, वॉटर कूलरसाठी 95 हजार रुपयांचा खर्च सांगण्यात आला. सीसीटीव्ही व किचन शेडसाठी 1 लाख रुपये एवढ्या मोठ्या प्रमाणावर खर्च दाखवण्यात आला आहे. मात्र प्रत्यक्षात या कामांसाठी इतका खर्च झालाच नसल्याचे समितीचे म्हणणे आहे. वास्तविक खर्चाच्या तुलनेत बिलामध्ये मोठा तफावत असल्याचे म्हटल्या जात आहे. ज्यामुळे मोठ्या गैरव्यवहाराचा संशय निर्माण झाला आहे.

Nitin Gadkari : मागे बसले तरी बेफिकीर नको सीट बेल्ट लावा

तक्रारीकडे दुर्लक्ष

भ्रष्टाचाराविरोधात शाळा व्यवस्थापन समितीने पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱ्यांकडे (BDO) निवेदनाद्वारे तक्रार दाखल केली आहे. मात्र, या तक्रारीकडे दुर्लक्ष होत असल्यामुळे नागरिकांमध्ये प्रचंड असंतोष पसरला आहे. सात दिवसांत कोणतीही कारवाई झाली नाही, तर पंचायत समिती कार्यालयासमोर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही समितीने दिला आहे. ग्रामपंचायतीकडून या आरोपांवर उडवाउडवीची उत्तरे दिली जात आहे.

आतापर्यंत कोणत्याही अधिकाऱ्याने स्पष्टता दिलेली नाही. नागरिकांतून संतापाची लाट उसळली आहे. स्थानिकांनी यावर त्वरित चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. गेल्या काही वर्षांपासून अनेक शाळांमध्ये विकासकामांसाठी मोठ्या प्रमाणावर निधी मंजूर केला जातो. मात्र, प्रत्यक्षात विद्यार्थ्यांना याचा लाभ मिळत नाही. यामुळे शिक्षणाच्या गुणवत्तेवर परिणाम होतो आणि मूलभूत सुविधांच्या अभावामुळे विद्यार्थ्यांना अडचणींचा सामना करावा लागतो.

Bhandara Sand Mafiya : दोषींनो सामानाची पॅकिंग सुरू करा

विद्यार्थ्यांचे भविष्य धोक्यात

भंडाऱ्यातील या शाळेतील भ्रष्टाचाराचा प्रकार लक्षात घेता, प्रशासनाने त्वरित कारवाई करणे गरजेचे आहे. अन्यथा, शाळांचे आणि विद्यार्थ्यांचे भवितव्य धोक्यात येऊ शकते. स्थानिक नागरिक, पालक आणि शिक्षकांनी एकत्र येऊन या भ्रष्टाचाराविरोधात आवाज उठवण्याची वेळ आली आहे. आता पाहावे लागेल की प्रशासन या गंभीर आरोपांची दखल घेते की नाही, की पुन्हा एकदा भ्रष्टाचाराच्या सावलीत शिक्षण व्यवस्थेचा बळी जाणार.

व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!