
विधानसभा निवडणुकीनंतर अनेक नेते महायुतीत प्रवेश घेत आहेत. त्यामुळे आता महाविकास आघाडीला लवकरच गळती लागल्याचे आपल्याला पाहायला मिळणार, असा दावा गिरीश महाजन यांनी केला आहे.
वर्तमान स्थितीत राज्यात ‘ऑपरेशन टायगर’ची जोरदार चर्चा रंगली आहे. शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे अनेक नेते आणि खासदार लवकरच महायुतीत प्रवेश करणार आहेत, असे बोलले जात आहे. यामध्ये किती तथ्य आहे, हे कोणाला ठावूक ? तर संबंधित खासदारांनी देखील आपली भूमिका अद्याप स्पष्ट केलेली नाही. परंतु याबाबात राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी पुढील काही दिवसांत महाविकास आघाडीला गळती लागताना आपल्याला दिसणार, असे सांगून ‘ऑपरेशन टायगर’बाबत मोठे वक्तव्य केले आहे.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट, काँग्रेस असो किंवा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे आमदार, खासदार, पदाधिकाऱ्यांसह अनेक येथे महायुतीच्या संपर्कात आहेत. ते सर्व महायुतीत यायला इच्छुक आहेत. त्यांच्याशी आमचा दररोज संपर्क सुरू आहे. नगरसेवकांना मुख्य प्रवाहात यायचे आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर त्यांचा विश्वास आहे. आगामी काळात याची सर्वांना प्रचीती होणार आहे, असा इशाराही गिरीश महाजन यांनी विरोधकांना दिला आहे.

तिन्ही पक्षांच्या संमतीने निर्णय
नाशिक जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदावरून सध्या मोठा वाद सुरू आहे. भाजपने गिरीश महाजन यांना पालकमंत्री केले होते. राष्ट्रवादी काँग्रेसने या जिल्ह्यावर दावा केला आहे. तर रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री पदासाठी शिवसेना एकनाथ शिंदे गट आग्रही आहे. यावरून वाद उद्भवल्यानंतर मात्र नाशिक आणि रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्थगिती दिली आहे. महायुतीमधील तीनही पक्षांनी आमचा पालकमंत्री करण्याची मागणी केली आहे. यावर लवकरच तोडगा काढण्यात येणार, असेही गिरीश महाजन यांनी सांगितले आहे.
महाविकास आघाडीला धक्का; Pen Drive Bomb प्रकरणात चौकशीचा आदेश
महायुतीतील तीनही पक्ष तोलामोलाचे आहेत. म्हणून प्रत्येकाला आपल्या पक्षाचा पालकमंत्री व्हावे, असे वाटत आहे. नाशिक किल्ल्यात यापूर्वी कुंभमेळा झाला तेव्हा मी पालकमंत्रीपद सांभाळले होते. आता पुन्हा दीड दोन वर्षांनी नाशिक कुंभ भरणार आहे. म्हणूणच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मला पालकमंत्री केले होते. कुंभाचे नियोजन सुरळीत झाले पाहिजे, अशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची इच्छा असल्याचे मंत्री गिरीश महाजन यांनी म्हटले आहे.
गेल्या वेळेपेक्षा दुप्पट संख्येने भाविक कुंभमेळ्यात सामील होणार, असा अंदाज आहे. यंदा कुंभमेळ्याचे मोठे चॅलेंज आहे. गेल्यावेळी स्वच्छ सुंदर कुंभमेळा आयोजित करण्यात आला होता. त्यामुळे नाशिक जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदी मला नियुक्त करण्यात आले होते. हा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा होता. आता नाशिक असो वा रायगड, या दोन्ही जिल्ह्याचा पालकमंत्री तीनही पक्षाच्या संमतीनेच होणार, असा दावाही गिरीश महाजन यांनी केला आहे.