महाराष्ट्र

BJP Vs Congress : अकोल्यात पावसाचा थैमान अन् स्पर्धेची राजकीय ढगफुटी

Akola Heavy Rain : पाणी साचलं आणि जबाबदाऱ्यांचा पूर आला

Share:

Author

अकोल्यात पावसाचा हाहाकार, पण राजकारणात वादळ उसळले आहे. मुसळधार पावसाने शहराची परीक्षा घेतली, तर राजकारणाने प्रशासनाची. पाण्याने रस्ते भरले आणि भाजप – काँग्रेसच्या आमदारांनी शब्दांचे तुफान उडवत जबाबदाऱ्यांची झडती घेतली.

अकोल्यात आलेल्या मुसळधार पावसाने फक्त रस्तेच नाही, तर संपूर्ण राजकीय वादळ निर्माण केलं. एकीकडे नाल्यांप्रमाणे वाहणारे रस्ते, घरात घुसलेलं पाणी, कोसळलेली झाडं आणि उद्ध्वस्त जनजीवन. तर दुसरीकडे दोन्ही प्रमुख राजकीय पक्षांनी प्रशासनाच्या गलथान कारभारावर धारा ओढत, एकमेकांपेक्षा पुढे जाण्याची चढाओढ सुरू केली.

अकोल्यामध्ये अचानक झालेल्या पावसामुळे केवळ निसर्गानेच नव्हे, तर प्रशासनाच्या झोपेत असलेल्या यंत्रणेनेही नागरिकांना पुरतं झोपवलं. पण, पावसाचा तडाखा बसताच काँग्रेस आणि भाजपने झोप उडवली आणि मैदानात उतरले, ते थेट प्रशासनाला ‘विकासाच्या वादळात’ खेचण्यासाठी.

जबाबदारीची स्पर्धा

अकोला शहरात पाणी साचलं, झाडं कोसळली, घरात चिखल भरला, आणि काँग्रेसचे आमदार साजिद खान पठाण थेट महापालिका आयुक्तांच्या कार्यालयात दाखल झाले. आपत्ती व्यवस्थापन समितीची आपत्कालीन बैठक बोलावून त्यांनी अधिकाऱ्यांना फटकारलं, ‘यंत्रणा आहे, पण जबाबदारी कुठं आहे?’ असा थेट सवाल करत त्यांनी प्रभागनिहाय उपाययोजनांच्या आदेशांचा भडिमार केला. दुसरीकडे, अकोल्यात पावसामुळे शेतकऱ्यांच्या जीवनात वज्राघात झाला. भाजप आमदार रणधीर सावरकर यांनी रात्रीच आपत्तीग्रस्त भागांचा दौरा केला. थेट जिल्हाधिकाऱ्यांसोबत बैठक घेत, शेतकऱ्यांचं नुकसान गंभीर आहे, तातडीने पंचनामे करा, असा आदेश देत त्यांनी कृषी व सार्वजनिक बांधकाम विभागांना झणझणीत इशारा दिला.

Akola : मुसळधार पावसाच्या ‘रण’भूमीत आमदारांनी दिला ‘धीर’

राजकीय दृश्य डोळे दिपवणारं

पाऊस म्हणजे निसर्गाचं रौद्र रूप असलं तरी अकोल्यात त्याने राजकीय रणभूमीही सजवली आहे. शहरात पठाण यांचा आवाज दुमदुमतोय, ते जनतेचा थेट आवाज बनले आहेत. मी जनतेचा सेवक आहे, अधिकारी झोपेत आहेत, अशा आक्रमक शैलीत साजिद खान पठाण यांनी मनपाची झोप उडवली. तर दुसरीकडे भाजप आमदार सावरकरांचा दबदबा पाहायला मिळाला. थेट बांधकाम विभाग, महावितरण, कृषी अधिकारी यांना ‘ताबडतोब कामाला लावा’ अशी तंबी, सावरकर यांनी दिली. रस्ते, वीज आणि मदतीसाठी सुरू असलेली त्यांची धडपड शेतकऱ्यांमध्ये आशेचा किरण देताना दिसली.

Akola : पावसाच्या तडाख्यात अडकलं शहर, प्रशासनाच्या छत्रीला छिद्र

शहर असो की गाव नागरिकांना त्रास झाल्यानंतरच प्रशासन हलतं का? हे दोन्ही आमदारांच्या कृतीतून ठळकपणे दिसून आलं. यंत्रणा सज्ज होण्याऐवजी सैरभैर झाल्याचं चित्र सर्वत्र. यावरून काँग्रेस व भाजप दोघांनीही प्रशासनाला धारेवर धरलंय. आता जनतेच्या मनात निर्माण झालंय एक वेगळंच राजकीय वादळ. एक प्रश्न मात्र अकोलावासीयांच्या मनात घर करत आहे. हे राजकीय दौरे आणि दौड ही खरी चिंता आहे की येणाऱ्या निवडणुकीसाठी जमिनीची मशागत?

काँग्रेसच्या पठाणांनी शहरी भागात झोकून दिलंय, तर भाजपचे सावरकर ग्रामीण जनतेच्या आक्रोशात आवाज बनलेत. विकास कुठं आहे? हा प्रश्न अनुत्तरित असला तरी, ‘विकासाच्या पावसासाठी’ सुरू झालेली ही काँग्रेस-भाजप स्पर्धा मात्र आता जनतेच्या चर्चेचा विषय बनली आहे.

व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!