
संदीप जोशी यांना येत्या विधान परिषदेच्या निवडणुकीत भाजपकडून संधी देण्यात आली आहे. गडकरींच्या पाठिंब्याविना झालेल्या पराभवानंतर आता फडणवीसांच्या समर्थनाने त्यांचे पुनरागमन निश्चित झाले आहे.
महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात सध्या अर्थसंकल्पीय अधिवेशन जोरात सुरू आहे. याच अधिवेशनात विधान परिषदेच्या निवडणुकीची मोठी राजकीय रंगत दिसून येत आहे. यापूर्वी विधान परिषदेच्या निवडणुकीबाबत वेगवेगळ्या चर्चा सुरू होत्या, मात्र आता त्यावर शिक्कामोर्तब झाले आहे. भाजपकडून संदीप जोशी यांचे नाव निश्चित करण्यात आले आहे.
महाराष्ट्रातील सत्ताधारी भाजप नेतृत्वाखालील महायुतीसाठी विधान परिषदेच्या पाचही रिक्त जागांवर विजय मिळवण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. निवडणूक आयोगाने सोमवारी या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला असून, 27 मार्च रोजी या जागांसाठी मतदान होणार आहे. 2024 च्या विधानसभा निवडणुकीत पाच आमदारांनी विजय मिळवल्याने या जागा रिक्त झाल्या, त्यामुळे या पोटनिवडणुकीची गरज भासली आहे.

भाजपची भरपाई
विधानसभा निवडणुकीत विजयी ठरलेल्या पाच विधान परिषद सदस्यांपैकी तीन भाजपचे, तर प्रत्येकी एक शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (राकांपा) होते. ही तिन्ही पक्ष महायुतीचा भाग असल्यामुळे या निवडणुकीत त्यांच्या विजयाची शक्यता आणखी बळावली आहे. 288 सदस्यीय विधानसभेत भाजपकडे 132, शिवसेनेकडे 57, आणि राष्ट्रवादीकडे 41 आमदार आहेत. या भक्कम संख्याबळाच्या जोरावर महायुती पाचही जागा सहज जिंकू शकणार आहे.
नागपूर विभागीय पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने संदीप जोशी यांना उमेदवारी दिली होती. मात्र, या निवडणुकीत भाजपला धक्का बसला आणि काँग्रेसच्या अभिजीत वंजारी यांनी ऐतिहासिक विजय मिळवला. नागपूर विभागीय पदवीधर मतदारसंघाच्या स्थापनेपासूनच भाजपचे निर्विवाद वर्चस्व होते. मात्र, संदीप जोशी यांच्या पराभवामुळे प्रथमच काँग्रेसला हा मतदारसंघ काबीज करता आला. हा विजय काँग्रेससाठी मोठा टर्निंग पॉईंट ठरला.
पराभवानंतर नवी संधी
राजकीय वर्तुळात चर्चा आहे की या पराभवामागे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा संदीप जोशी यांना पूर्णपणे पाठिंबा नसल्याचा परिणाम झाला. गडकरी यांच्या आशीर्वादाविना लढलेल्या जोशी यांना अपेक्षित साथ मिळाली नाही, आणि त्यामुळेच भाजपला मोठा धक्का बसला. मात्र, भाजपने तात्काळ पुढची रणनीती आखत संदीप जोशी यांना विधान परिषदेच्या निवडणुकीत संधी देण्याचा निर्णय घेतला आहे.
संदीप जोशी यांना विधान परिषदेच्या तिकीटाची संधी देण्यामागे भाजपची मोठी रणनीती आहे. नागपूरमध्ये माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या राजकीय डावपेचांमध्ये संदीप जोशी यांना विधान परिषदेचा उमेदवार करण्याचा विचार केला आहे. त्यामुळे नागपुरातून संदीप जोशी आणि प्रवीण दटके, तसेच भंडाऱ्यातून माजी मंत्री डॉ. परिणय फुके असे तीन महत्त्वाचे आमदार विधिमंडळात भाजपकडून असतील.
नागपुरातील राजकीय समीकरण
नागपूर शहरात नितीन गडकरी आणि देवेंद्र फडणवीस यांच्या गटांमध्ये नेहमीच अंतर्गत राजकारण सुरू असते. संदीप जोशी यांच्या पराभवानंतर भाजपने त्यांना विधान परिषदेची उमेदवारी दिल्याने, हे समीकरण आणखी चर्चेचा विषय ठरणार आहे.
यापूर्वी नागपूरमध्ये भाजपची मजबूत पकड होती, मात्र अभिजीत वंजारी यांच्या विजयामुळे काँग्रेसला नवी उमेद मिळाली आहे. त्यामुळे आगामी निवडणुकांमध्ये नागपूरसह विदर्भातील राजकीय समीकरणांमध्ये मोठा बदल होण्याची शक्यता आहे. विधान परिषदेच्या निवडणुकीत भाजपचा विजय होईल का, हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.