
भाजपने महाराष्ट्रात संघटन बळकटीचा महत्त्वाचा टप्पा पार केला आहे. राज्यात 963 मंडळ अध्यक्षांची नियुक्ती यशस्वीरित्या पूर्ण झाली आहे.
भारतीय जनता पार्टीच्या महाराष्ट्र संघटनेत एक महत्त्वाचा संघटनात्मक टप्पा पूर्ण झाला आहे. राज्यात महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने आपल्या गडबस्ताराचा आधार भक्कम केला आहे. संघटन हेच खरे बळ, या मूलमंत्रावर विश्वास ठेवत, पक्षाने राज्यभर 1 हजार 221 मंडळे स्थापन केली आहेत. त्यापैकी 963 मंडळ अध्यक्षांची नियुक्ती यशस्वीपणे पूर्ण झाली आहे. या प्रक्रियेत भाजपचे कार्याध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी अत्यंत नियोजनबद्ध आणि गतिशील नेतृत्व करत, संपूर्ण राज्यात पक्षाच्या संघटनात्मक पायाभूत रचनेत नवसंजीवनी फुंकली आहे.
स्थानिक पातळीवरील कार्यकर्त्यांना नेतृत्वाच्या जबाबदाऱ्या देण्याचा आणि पक्षाचा विचार समाजाच्या शेवटच्या थरापर्यंत पोहोचवण्याचा हा प्रयत्न आहे. महाराष्ट्राच्या राजकीय नकाशावर आपला गड अधिक बळकट करण्यासाठी ही नियोजित संघटनात्मक रणनीती भाजपने यशस्वीरीत्या अंमलात आणली आहे.

Chandrashekhar Bawankule : रेती व्यवहारात पारदर्शकतेचा शिडकाव
विभागात भक्कम उपस्थिती
राज्यभर एकसंध बांधणी करताना भाजपने कोकण-ठाणे विभागात 184, उत्तर महाराष्ट्रात 184, पश्चिम महाराष्ट्रात 222, विदर्भात 313, मराठवाड्यात 207 आणि मुंबई विभागात 111 अशी एकूण 1221 मंडळांची स्थापना केली आहे. या प्रक्रियेत 258 नवीन मंडळांची स्थापना देखील करण्यात आली आहे. त्यातून पक्षाचा विस्तार व नवसंवेदना स्पष्ट दिसते.
संघटनात्मक दृष्टिकोनातून पाहता ही मंडळे ही केवळ गट किंवा घटक नाहीत. तर ती भारतीय जनता पार्टीच्या कार्यपद्धतीचे प्रत्यक्ष प्रतिक आहेत. यामध्ये पक्षाची विचारधारा, कार्यपद्धतीतील शिस्त, नियोजनशक्ती आणि जनतेशी थेट संवाद यांचा समतोल असलेला राजकीय आराखडा राबवला गेला आहे.
भविष्यातील निवडणुकींची पायाभरणी
भाजप कार्याध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या नेतृत्वाखालील ही संघटनात्मक मोहीम, आगामी महापालिका व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकींसाठी भक्कम पायाभरणी ठरत आहे. प्रत्येक मंडळ हा स्थानिक संपर्काचा केंद्रबिंदू असणार आहे. त्यातून मतदारांशी थेट संवाद वाढवण्याची रणनीती राबवली जाणार आहे.
राष्ट्र प्रथम, त्यानंतर पक्ष आणि शेवटी स्वतः, या विचारधारेवर आधारलेली ही संघटना, कार्यकर्त्यांमध्ये समर्पणाची भावना आणि स्थानिक नेतृत्व तयार करण्याचा दृष्टिकोन प्रभावीपणे दिसून येतो. भाजपने गावपातळीपासून महानगरांपर्यंत संघटनात्मक एकसंधता साधत, आगामी राजकीय यशाच्या दिशेने आपली वाटचाल सुरू केली आहे.