
अकोला भाजपमध्ये सध्या बऱ्यापैकी स्पर्धा सुरू आहे. भाजपचा एक सरचिटणीस जो शहरामध्ये कार्यरत आहे. त्याने एका नेत्याच्या भरवशावर आता पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना धमकावण्यास सुरुवात केली आहे.
अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघाचे आमदार गोवर्धन शर्मा यांचे निधन झाल्यानंतर अकोल्यामध्ये भाजपची मोठी वाताहात सुरू झाली आहे. आमदार गोवर्धन शर्मा यांच्या सर्व कार्यकर्त्यांना दुधातील माशी प्रमाणे बाहेर फेकण्याचे काम आता सुरू झाले आहे. या परिस्थितीमध्ये अकोल्यात कार्यरत असलेला भाजपचा एक सरचिटणीस पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना मोठ्या प्रमाणावर धमकावत आहे.

महानगरपालिका निवडणुकीमध्ये पैसे आणि एका नेत्याच्या जोरावर आपली उमेदवारी कन्फर्म झाल्याचा दावा हा सरचिटणीस करत आहे. आपली उमेदवारी कन्फर्म झाली असून जो आपल्या हिशोबाने काम करणार नाही त्याची उमेदवारी कापण्यात येईल, अशी थेट धमकी हा सरचिटणीस सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना देत आहे. यासंदर्भामध्ये ज्या नेत्याचं नाव हा सरचिटणीस घेत आहे, त्या नेत्याला विधानसभा निवडणुकीमध्ये जबरदस्त फटका बसला होता.
नेत्याचे आश्चर्य
यासंदर्भामध्ये आपल्या नावाचा वापर होत असल्याची माहिती काल 26 एप्रिल शनिवार रोजी त्या नेत्याला मिळाली. त्या नेत्यांनी देखील यासंदर्भामध्ये आश्चर्य व्यक्त केला आहे. उर्वरित दोन सरचिटणीस प्रमाणे हा सरचिटणीस व्यवस्थित का वागत नाही, अशी भावना भाजपच्या या नेत्याने व्यक्त केली. भाजपचे कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाण अकोला दौऱ्यावर असताना संबंधित सरचिटणीसाच्या वागणुकीबद्दल असंतोष उफाळून आला आहे. या संदर्भात भाजपच्या अनेक पदाधिकाऱ्यांनी ‘द लोकहित लाईव्ह’शी संपर्क साधून या सरचिटणीसच्या आक्षेपार्ह वागणुकीबद्दल तक्रार केली.
संबंधित सरचिटणीसाची मर्जी जो कार्यकारी आणि पदाधिकारी झेलतो त्यांना नेत्यांच्या दौऱ्यामध्ये व्हीआयपी पासेस दिली जातात. मर्जी झेलणाऱ्यांना नेत्याच्या स्वागतासाठी विमानतळावर नेले जाते. प्रसंगी याच लोकांना पदे देखील दिली जातात. परंतु ज्या लोकांना ही पदे दिली जातात ते पक्षाशी एकनिष्ठ नाहीत. ऐनवेळी निवडणुकीच्या काळात हीच मंडळी प्रचार करण्यासाठी पैशांची मागणी करते. भाजपमध्ये सुरू असलेल्या या प्रकारामुळे अनेक कार्यकर्ते आणि पदाधिकारी आता नाराज झाले आहेत. अशा परिस्थितीमध्ये भाजपचे कार्याध्यक्ष भाजपचे रवींद्र चव्हाण हे अकोल्यामध्ये आलेले आहेत. तर त्यांनी चुकीच्या लोकांचे हात हातात घेऊन फिरण्यापेक्षा भाजपमधील विस्कटलेली घडी सावरण्यासाठी पुढे यावं, अशी मागणी सामान्य कार्यकर्त्यांकडून करण्यात येत आहे. ज्यांनी भाजपला मोठा करण्यासाठी रक्ताचं पाणी केलं.
विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपला मतदारांनी जागा दाखवून दिली. अकोल्यामध्ये या निवडणुकीनंतर काँग्रेसची ताकद वाढत चालली आहे. भाजपचे अनेक मतदार आणि हिंदू मतदार देखील काँग्रेसकडे वळले आहेत. भाजपच्या काही नेत्यांच्या मजुरीमुळे हा प्रकार झाल्याचे सांगण्यात येत आहे. हिंदू मतदार काँग्रेसकडे वळत असतील तर दादागिरी करणाऱ्या अशा पदाधिकाऱ्यांना वेळीच लगाम लावणे गरजेचे आहे. अन्यथा आगामी महापालिका निवडणुकीमध्ये भाजपचा मार्ग खडतर राहील, अशी भीती व्यक्त करण्यात येत आहे.