
चंद्रशेखर बावनकुळे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर तीव्र टीका करत, त्यांच्या भूमिकेमुळे महाराष्ट्राच्या जनतेचा अपमान झाल्याचा आरोप केला. वक्फ सुधारणा विधेयकाला विरोध केल्यामुळे ठाकरे गटाला मोठा राजकीय फटका बसण्याची शक्यता आहे.
भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर तीव्र टीका केली आहे. उद्धव ठाकरेंनी महाराष्ट्रातील जनतेचा अपमान केला. त्यांच्या खासदारांना पाठिंबा देणाऱ्या मतदारांनीही याचा विचार करावा, असे आवाहन बावनकुळे यांनी केले. वक्फ सुधारणा विधेयकाच्या विरोधात मत दिल्यामुळे ठाकरे गटाला मोठा राजकीय फटका बसण्याची शक्यता त्यांनी वर्तवली आहे.

बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचा त्याग करून उद्धव ठाकरेंनी काँग्रेसचे विचार स्वीकारल्याचा आरोपही बावनकुळे यांनी केला. त्यांच्या या भूमिकेमुळे शिवसेनेतील अनेक हिंदुत्ववादी कार्यकर्ते अस्वस्थ झाले व पक्ष सोडण्याच्या तयारीत आहेत. अनेक कार्यकर्ते भाजप प्रवेश करण्यास इच्छुक असल्याचे त्यांनी सांगितले.
देशाचा अपमान
चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले की, मुंबई महापालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखालील शिवसेनेने विशिष्ट समाजाच्या मतांसाठी वक्फ सुधारणा विधेयकाला विरोध केला. हा विरोध म्हणजे केवळ राजकीय स्वार्थ आहे. त्यामुळे हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांमध्ये नाराजी पसरली आहे. याचा परिणाम आगामी निवडणुकांमध्ये शिवसेनेवर होणार असल्याचे ते म्हणाले.
वक्फ सुधारणा विधेयक हा देशहिताचा मुद्दा आहे. गरीब आणि अल्पसंख्याकांच्या जमिनींच्या चुकीच्या नोंदी सुधारण्याचा प्रयत्न आहे. हे विधेयक मंजूर झाल्यास अतिक्रमण हटवून न्याय मिळू शकतो. मात्र, उद्धव ठाकरेंच्या गटाने केवळ राजकीय लाभासाठी त्याला विरोध केला, यामुळे महाराष्ट्राच्या जनतेने आता त्यांना माफ करणार नाही, असे बावनकुळे यांनी ठामपणे सांगितले.
वक्फ सुधारणा गरजेची
वक्फच्या माध्यमातून गेल्या अनेक दशकांपासून जमिनींवर चुकीच्या पद्धतीने नियंत्रण मिळवले जात होते. अनेक ठिकाणी देवस्थानांच्या जागांवरही अतिक्रमण झाले. हे अतिक्रमण हटवून सामान्य जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी हे विधेयक आवश्यक आहे. त्यामुळेच भाजप सरकारने हा निर्णय घेतला आहे. त्याला विरोध करणारे महाराष्ट्राच्या हिताचा विचार करत नाहीत, असा आरोप बावनकुळे यांनी केला.
राज्यात डिजिटल क्रांती घडवण्यासाठी एक राज्य, एक रजिस्ट्री ही संकल्पना अमलात आणली जात आहे. यामुळे कोणत्याही भागात जमीन खरेदी करणाऱ्या नागरिकांना सोयीस्कर पद्धतीने त्यांची नोंदणी करता येणार आहे. हे धोरण महाराष्ट्राच्या विकासासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली राज्य डिजिटल युगाकडे वाटचाल करत आहे, असेही बावनकुळे यांनी सांगितले.