
2024 लोकसभा आणि विधानसभा निवडणूक जरी पार पडल्या असल्या, तरीही महाराष्ट्राच्या राजकारणात त्यांची चर्चा अजूनही कायम आहे.
2024 लोकसभा निवडणूक आता मागे पडली असली, तरी तिच्या लाटांचे हादरे अद्यापही महाराष्ट्राच्या राजकारणात जाणवतात. या पार्श्वभूमीवर बुलढाणा चिखलीच्या भाजप आमदार श्वेता महाले यांनी सडेतोड भाषेत आपली भूमिका मांडली आहे. त्यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, लोकसभा निवडणुकीत हिंदुत्वाविरोधातील एकत्रित मतांनी महायुतीला फटका बसला. पण विधानसभा निवडणुकीत हिंदू समाजाने संघटित होण्याची वेळ आली आहे. बुलढाणा लोकसभा मतदारसंघात काही विशिष्ट समाजाने जाणीवपूर्वक संघटित मतदान करून हिंदुत्वविरोधी वातावरण निर्माण केल्याचा आरोप त्यांनी केला.
याच्या तुलनेत, हिंदू समाज मात्र जातीपातींमध्ये विभागलेला राहिला आणि त्यामुळे अपेक्षित यश मिळाले नाही. ही चूक पुन्हा होऊ नये, यासाठी हिंदू समाजाने आता संघटितपणे पुढे येऊन मतदान करण्याचा संकल्प करावा, असे आवाहन त्यांनी केले. चिखली तालुक्यातील अंचरवाडी येथे नुकतीच विकसित भारत संकल्प सभा पार पडली. यावेळी श्वेता महाले यांनी केंद्र सरकारच्या २०१४ नंतरच्या कार्यकाळाचा आढावा घेतला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात हिंदुत्ववादी सरकारने देशाला विकासाच्या मार्गावर नेले, अशी त्यांनी ठाम भूमिका मांडली.

अकरा वर्षांचा गौरव
‘सबका साथ, सबका विकास’ या घोषणेनुसार केंद्र सरकारने गेल्या ११ वर्षांत लाखो कोटींच्या विकासकामांना चालना दिली आहे. देश विकसित व्हावा, यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा संकल्प किती दृढ आहे, हे त्यांनी देशवासीयांना वेळोवेळी दाखवून दिले आहे, असे महाले यांनी सांगितले. त्यांनी हेही ठासून सांगितले की, आता वेळ आली आहे हिंदू समाजाने आपल्या हितासाठी संघटित होऊन मतदान करण्याची.या सभेत माजी आमदार विजयराज शिंदे यांनीही आपल्या भाषणातून मोदी सरकारचे कौतुक केले. ते म्हणाले, आज भारत जगातील तिसऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था बनत आहे.
पाकिस्तानसारख्या शेजाऱ्यांनी भारताकडे वाकड्या नजरेने पाहिलं, तर त्यांना काय परिणाम भोगावे लागतात, हे त्यांनी अनुभवले आहे. कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि चिखली अर्बन बँकेचे अध्यक्ष सतीश गुप्त यांनी मोदी सरकारच्या अकरा वर्षांच्या कारकीर्दीला ‘देशाचा गौरव वाढवणारी’ अशी संज्ञा दिली. त्यांनीही आवाहन केलं की, गल्लीपासून दिल्लीपर्यंत हिंदू समाजाने एकत्र येऊन मतदान केले पाहिजे.या सभेची सुरुवात आणीबाणीच्या काळात तुरुंगवास भोगलेल्या आणि राम मंदिर आंदोलनात कारसेवा केलेल्या कार्यकर्त्यांच्या सपत्नीक सन्मानाने झाली. दरम्यान भाजपचे जिल्हाध्यक्ष विजयराज शिंदे, माजी जिल्हाध्यक्ष डॉ. गणेश मांटे, प्रदेश कार्यकारिणी सदस्य उल्हास देशपांडे, जिल्हा सचिव चंद्रकांत बर्दे, मंडळ अध्यक्ष शिवाजी वाघ यांचीही उपस्थिती होती.