भाजप आमदार अमोल मिटकरी यांनी छत्रपती संभाजी महाराजांची प्रतिमा हाती घेऊन विधानभवनात आंदोलन केले आणि त्यांच्या इतिहासाला न्याय मिळावा म्हणून सरकारकडे विशेष मागण्या केल्या.
महाराष्ट्राच्या विधीमंडळात सध्या अर्थसंकल्पीय अधिवेशन रंगात आले आहे. अर्थसंकल्पाच्या चर्चेमध्ये राज्याच्या विकासाच्या विविध मुद्द्यांवर चर्चा सुरू असतानाच, या अधिवेशनात आणखी एका विषयाने चांगलेच लक्ष वेधून घेतले आहे. छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास आणि त्यांच्या बद्दल असलेल्या चुकीच्या गोष्टी.
भाजप आमदार अमोल मिटकरी यांनी विधानभवनात छत्रपती संभाजी महाराजांची प्रतिमा घेऊन प्रवेश केला आणि जोरदार विरोध प्रदर्शन केले. त्यांचा मुख्य आक्षेप हा होता की, शंभूराजेंबद्दल चुकीची माहिती अजूनही शालेय पुस्तकांमध्ये तसेच ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर दिसून येते. त्यामुळे या चुकीच्या माहितीवर सरकारने कारवाई करावी, अशी त्यांची मागणी होती.
Ajit Pawar : सुरू ठेवायचे की बंद दारूचे दुकान, निर्णय घेणार नागरिकांचे मतदान
मिटकरी आक्रमक
संभाजी महाराजांवर ऐतिहासिक अन्याय झाला असल्याचे अनेक अभ्यासक आणि संशोधक मानतात. त्यांच्यावर लावण्यात आलेले दूरवर्तनाचे आरोप हे निराधार असल्याचे विविध संशोधनातून समोर आले आहे. त्यामुळे इतिहास संशोधन समितीच्या अध्यक्षतेखाली ‘संभाजी महाराज चरित्र साधन समिती’ स्थापन करण्याची मागणी मिटकरी यांनी केली आहे.
संभाजी महाराजांच्या बलिदान दिनी विधीमंडळ आणि मंत्रालयात त्यांच्या प्रतिमेस अभिवादन करण्याचा कार्यक्रम निश्चित करण्यात यावा, अशीही मागणी त्यांनी केली. विशेष म्हणजे, सुप्रसिद्ध कलाकार रविंद्र मिस्त्री यांनी तयार केलेल्या संभाजी महाराजांच्या तैलचित्राला शासकीय प्रत म्हणून मान्यता देऊन, हे चित्र मंत्रालय व विधानभवन परिसरात लावण्यात यावे, असेही त्यांनी स्पष्ट केले.
नवीन धोरणांची गरज
महाराष्ट्राचा अर्थसंकल्प आणि विविध आर्थिक धोरणांवर चर्चा सुरू असतानाच, संभाजी महाराजांच्या ऐतिहासिक न्यायाचा मुद्दा अधोरेखित होत आहे. राज्याच्या भविष्याची जशी चिंता आहे, तशीच आपल्या ऐतिहासिक वारशाची देखील जपणूक महत्त्वाची असल्याचे या चर्चेतून पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे.
संभाजी महाराजांच्या बदनामीकारक कादंबऱ्या, विकिपीडिया व गुगलवरील चुकीची माहिती हटवण्याची तसेच यूट्यूब आणि अन्य प्लॅटफॉर्मवरील मानहानीकारक चित्रपटांवर बंदी घालण्याची मागणी मिटकरी यांनी केली आहे. याशिवाय, महाराष्ट्राच्या शालेय अभ्यासक्रमात आणि सीबीएसई अभ्यासक्रमात संभाजी महाराजांचा दैदिप्यमान इतिहास समाविष्ट करावा, असेही त्यांनी स्पष्ट केले. अर्थसंकल्पातील तरतुदींवर चर्चा करताना राज्याच्या विकासाच मुद्दे महत्त्वाचे ठरत आहेत. पुढील काही दिवसांत अधिवेशन अधिक रंगेल असे दिसत आहे.
