
नागपूर शहरात औरंगजेब कबरीवरून उसळलेल्या दंगलीमागे नियोजनबद्ध कट असल्याचा खळबळजनक खुलासा भाजप नेते माजी मंत्री आमदार डॉ. परिणय फुके यांनी केला आहे. गुन्हेगारांना माफ न करता कठोर कारवाईची मागणी मुख्यमंत्र्यांकडे डॉ. फुके यांनी केली आहे.
नागपूर शहरात औरंगजेब कबरीवरून उसळलेल्या दंगलीनंतर राज्यभरात निर्माण झालेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर भाजपचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री आमदार डॉ. परिणय फुके यांनी खळबळजनक माहिती समोर आणली आहे. डॉ. फुके यांनी ठामपणे सांगितले की, नागपूरमध्ये झालेल्या जाळपोळी, दगडफेकीसाठी एक नियोजनबद्ध कट रचण्यात आला होता. या घटनेमागे गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या फहीम खान मास्टरमाइंड असल्याचा ठोस पुरावा समोर आला आहे.
फहीम खानसारख्या व्यक्तीवर तत्काळ कठोर कारवाई करावी, अशी जोरदार मागणी आमदार डॉ. फुके यांनी अधिवेशनादरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. डॉ. फुके यांनी सांगितले की, औरंगजेब कबरीवरून करण्यात आलेल्या आंदोलनाचा आधार यासाठी घेण्यात आला. आंदोलनाच्या अनेक तासांनंतर दंगल घडविण्यात आल्याचंही डॉ. फुके यांनी लक्षात आणून दिले. नागपूर शहरात जे काही घडले, ते केवळ धार्मिक भावना भडकवण्यासाठी नव्हे, तर ठराविक गोरगरीब, कष्टकरी लोकांना लक्ष्य करण्यासाठीच रचले गेले होते, अशी टीकाही डॉ. फुके यांनी केली.

सामान्यांना फटका
नागपूर शहरातील दंगलीमध्ये सामान्य नागरिकांच्या मालमत्तेचे मोठ्या प्रमाणावर नुकसान करण्यात आले. हजारो कुटुंबांच्या उपजीविकेवर गदा आणली गेली. दंगलीच्या घटनेचा सूत्रधार फहीम खान असल्याचे प्राथमिक तपासातून समोर आले आहे. डॉ. फुके यांनी स्पष्ट केले की, फहीम खान हा केवळ या दंगलीतच नव्हे, तर यापूर्वीही अनेक गंभीर गुन्ह्यांमध्ये सामील आहे. त्याच्यावर जबरी चोरी, दहशत निर्माण करणे, मारहाण करणे, बेकायदेशीर वसुली अशा अनेक गुन्ह्यांची नोंद आहे. विशेष म्हणजे 2009, 2022 आणि 2023 या वर्षांमध्ये त्याच्यावर लैंगिक शोषणाचे गुन्हेही दाखल आहेत. गंभीर स्वरूपाचे गुन्हे खान विरोधात आहेत. तरीही त्याच्यावर कारवाई झाली नव्हती, हे धक्कादायक असल्याचे डॉ. फुके म्हणाले. आता फहीमला अटक करण्यात आली आहे. अटकेनंतर फहीमवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी डॉ. फुके यांनी केली आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना डॉ. परिणय फुके यांच्याकडे मागणी केली की, फहीम खानवर तत्काळ मोक्का आणि तडीपार सारखी कडक कारवाई झाली पाहिजे. त्याच्या विरोधातील आणखी गुन्ह्यांचा उलगडा होऊ शकतो. त्यामुळे वेळीच त्याच्या विरोधात कठोर कारवाई करावी. जो कोणी व्यक्ती समाजात अराजकता माजवून, निर्दोष आणि गोरगरीब जनतेला वेठीस धरण्याचा प्रयत्न करेल, त्याला हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या आदर्शावर चालणारे सरकार माफ करणार नाही, असा ठाम इशारा डॉ. फुके यांनी दिला.
नागपूरकर धास्तावलेले
दंगलीनंतर नागपूरची सामान्य जनता अजूनही मानसिक आघातातून सावरलेली नाही. नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. पालक आजही आपल्या मुलांना घराबाहेर पाठवताना धास्तावलेले दिसत आहेत. अशा परिस्थितीत दंगलखोरांवर तत्काळ कारवाई होऊन सामान्य जनतेला दिलासा मिळायला हवा, अशी जनभावना निर्माण झाली आहे. दंगलीसारख्या घटनांमुळे फक्त नागपूर नव्हे, तर संपूर्ण राज्यभरात अस्वस्थता पसरली आहे.
दंगल घडविणाऱ्या गुन्हेगारांना वेळीच आवर घातल्याशिवाय जनतेमध्ये सुरक्षिततेचा विश्वास निर्माण होणार नाही. महायुतीचे सरकार सर्वसामान्य जनतेच्या पाठीशी आहे. गुन्हेगारांवर कठोर कारवाई करूनच जनतेला न्याय मिळवून देईल, असा ठाम निर्धार डॉ. परिणय फुके यांनी व्यक्त केला. ही घटना केवळ नागपूरपुरती मर्यादित नाही. राज्यातील कायदा-सुव्यवस्थेच्या प्रश्नावर गंभीर प्रश्नचिन्ह या घटनेमुळे उपस्थित झाले आहेत. असे प्रश्न निर्माण व्हावे, म्हणून कटकारस्थानातून ही दंगल घडविल्याचे स्पष्टपणे दिसत आहे. सरकारला बदनाम करण्याचा हा ‘प्लान’ होता. त्यामुळे याबाबत सरकारनं कोणाचाही मुलाहिजा न बाळगता तत्काळ कारवाई करावी, अशी मागणी देखील आमदार डॉ. परिणय फुके यांनी केली.