
नागपूरमध्ये उसळलेल्या दंगलीमागे अर्बन नक्षल्यांचा हात असल्याचा गौप्यस्फोट भाजपचे माजी मंत्री आमदार डॉ. परिणय फुके यांनी विधान परिषदेत केला. त्यांनी या कटकारस्थानाच्या पार्श्वभूमीवर शहरी माओवादाविरुद्ध कठोर कारवाईची मागणी केली आहे.
महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या अर्थसंकल्पीय अधिवेशन गाजत आहे. अधिवेशनात नागपूरमधील हिंसाचाराच्या घटनेने राज्यात खळबळ उडवून दिली आहे. या घटनेच्या पार्श्वभूमीवर भाजपचे माजी मंत्री आमदार डॉ. परिणय फुके यांनी विधान परिषदेच्या सभागृहात एक धक्कादायक आरोप केला आहे. डॉ. फुके यांनी नागपूरमध्ये उसळलेल्या दंगलीच्या मुळाशी अर्बन माओवाद असल्याचा दावा केला आहे.
डॉ. फुके यांच्या म्हणण्यानुसार शहरातील काही कट्टरवादी गट आणि एनजीओंच्या माध्यमातून अर्बन माओवादाचे जाळे पसरले आहे, ते समाजात विद्वेष पसरवण्याचे काम करत आहेत. डॉ. परिणय फुके यांनी स्पष्ट केले की, भारतासमोर उभी असलेली सर्वांत मोठी समस्या म्हणजे अर्बन माओवाद आहे. पूर्वी माओवाद जंगलांपुरती मर्यादित होता. आता मात्र हा माओवाद शहरी भागात पसरला आहे.

Parinay Fuke : ‘पचास.. पचास.. कोस दूर जब कोई समस्या होती है तब..’
धमकविण्याचा प्रयत्न
बंदुकीच्या धाकावर सरकारला धमकावणाऱ्या माओवाद्यांना महायुती सरकारने मोठ्या प्रमाणात निष्प्रभ केले आहे. तरीकाही शहरी भागांमध्ये कटकारस्थान रचणाऱ्या अर्बन माओवादी गटांचा प्रभाव अजूनही कायम आहे. डॉ. फुके म्हणाले की, अर्बन माओवादी हे वेगवेगळ्या कामगार संघटनांमध्ये घुसखोरी करीत आहेत. समाजातील असंतोष वाढवण्याचा प्रयत्न होत आहे.
सरकारी योजनांच्या विरोधात लोकांना भडकविणे सुरू आहे. यातून विकास प्रकल्पांमध्ये अडथळा आणला जात आहे. समाजात अशांतता निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. यामागे अर्बन माओवाद्यांचा हात आहे. अनेक ठिकाणी दंगली घडविण्याचे कटकारस्थान देखील हे अर्बन माओवादीच करीत आहेत. यासाठी समाजातील वेगवेगळ्या जातीधर्माच्या लोकांना भडकाविण्याचं काम करण्यात येत असल्याचं आमदार डॉ. फुके म्हणाले.
Prainay Fuke : आक्रमक भूमिका.. एलएक्यु धमकीचा पर्दाफाश अन् शायरीही
नागपूरमध्ये उसळलेल्या हिंसाचारात मोठ्या प्रमाणावर दगडफेक झाली. वाहनांची जाळपोळ आणि तोडफोड करण्यात आली होती. या दंगलीत अनेक पोलिस जखमी झालेत. हिंदुत्ववादी संघटनांनी औरंगजेबाची प्रतिकात्मक कबर जाळल्याने हा हिंसाचार उसळल्याचे सांगण्यात येते. मात्र या घटनाक्रम सुनियोजित कट असल्याचंही आता सांगण्यात येत आहे. आमदार डॉ. फुके यांनी या संपूर्ण प्रकरणाची नि:पक्ष आणि निष्पक्ष चौकशीची मागणी केली.
नागपुरातील दंगलीच्या घटनेच्या मागे अर्बन माओवाद्यांचा हात असल्याचा गंभीर आरोपही त्यांनी केला. मुस्लिम समाजातील काही घटकांना योजनाबद्ध पद्धतीने भडकविण्यात आले. या हिंसाचाराच्या माध्यमातून राज्यात अस्थिरता निर्माण करण्याचा प्रयत्न झाला. महाल भागात आजपर्यंत कधीही अशी परिस्थिती निर्माण झाली नव्हती. हा भाग संमिश्र वस्तीचा आहे. आजपर्यंत इतिहासात जिथे दंगल झाली नाही, तिथे इतक्या मोठ्या प्रमाणात हिंसाचार होऊच कसा शकतो, असा प्रश्नही डॉ. परिणय फुके यांनी व्यक्त केला.
महाराष्ट्राची संख्या जास्त
देवेंद्र फडणवीस यांनी जेव्हापासून गृहमंत्री पदाची जबाबदारी स्वीकारली आहे, तेव्हापासून अर्बन माओवादात लक्षणीय घट झाली आहे. महायुती सरकारच्या कठोर धोरणांमुळे आता अर्बन माओवाद बोटावर मोजण्याइतका उरला आहे. फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली त्याला ठेचण्यात आले आहे, असेही डॉ. फुके म्हणाले.
डॉ. फुके यांनी विधानपरिषदेत बोलताना मागणी केली की, राज्य सरकारने महाराष्ट्र शहरी नक्षलवादविरोधी कायदा अमलात आणावा. त्यांनी ठामपणे सांगितले की, या कायद्याच्या मदतीने अर्बन माओवादी गट आणि त्यांच्याशी संबंधित एनजीओंवर कठोर कारवाई करणे शक्य होईल. विशेषतः, महाराष्ट्रात देशातील इतर राज्यांच्या तुलनेत अर्बन माओवादी संघटनांची संख्या अधिक असल्यामुळे, हा कायदा अमलात आणणे अत्यंत गरजेचे आहे, असेही आमदार डॉ. परिणय फुके म्हणाले.