काँग्रेस नेत्यांनी नागपूर-गोवा शक्तिपीठ महामार्गाला विदर्भाच्या सर्वांगीण विकासासाठी पाठिंबा दिला आहे. ज्यामुळे नागपूर-मुंबई-गोवा गोल्डन ट्रँगल तयार होईल.
महाराष्ट्रातील रस्ते वाहतूक अधिक सुसाट आणि प्रवास सोपा व्हावा यासाठी भाजप सरकारकडून मोठ्या प्रमाणावर समृद्धी महामार्गांची निर्मिती करण्यात आली होती. नागपूर ते मुंबईला थेट जोडणारा समृद्धी महामार्ग विदर्भ आणि मराठवाडा भागातील नागरी वाहतुकीत नवे जीवन उभे करत आहे. मात्र, या प्रकल्पावर विरोधकांनी तर्कसंगत आक्षेप घेतला होता. या पार्श्वभूमीवर आता नागपूर-गोवा शक्तिपीठ महामार्गाची रूपरेषा रेखाटली जात आहे. विरोधकांचा तसा जोरदार विरोध असतानाही, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी मंत्री डॉ. नितीन राऊत यांनी या महामार्गासाठी पाठिंबा व्यक्त केला आहे.
नितीन राऊत यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्राद्वारे नागपूर-मुंबई समृद्धी महामार्ग, दिल्ली-नागपूर-हैदराबाद औद्योगिक कॉरिडॉर आणि प्रस्तावित नागपूर-गोवा शक्तिपीठ मार्गाचे एकत्रीकरण करून ‘सुवर्ण त्रिकोण’ उभारण्याची संकल्पना मांडली आहे. राऊत यांच्या मते, या महामार्गामुळे नागपूरला केवळ मुंबईचाच बंदर नाही तर गोव्याचा बंदरही उपलब्ध होईल. परिणामी नागपूर – मुंबई – गोवा असा विकासाचा ‘गोल्डन ट्रँगल’ तयार होईल. हा प्रकल्प विदर्भाला आंतरराष्ट्रीय व्यापाराशी जोडण्यास महत्त्वपूर्ण ठरेल. विदर्भातील कापूस, संत्री आणि खनिज उत्पादने गोव्याच्या बंदरमार्गातून जागतिक बाजारपेठेत पोहोचू शकतील.
औद्योगिक कॉरिडॉर विस्तार
मिहान सेझ आणि ड्राय पोर्टच्या माध्यमातून नागपूर देशातील सर्वात मोठे अंतर्गत कार्गो हब बनण्याची संधी मिळवू शकेल. स्थानिक नागरिक आणि काँग्रेस पक्ष काही नेते या प्रकल्पाला विरोध करत आहेत. पश्चिम महाराष्ट्रातील सुपीक शेती जमीन अधिग्रहित होण्याची भीती, नैसर्गिक संतुलन बिघडण्याची शक्यता यामुळे विरोध वाढला आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी या महामार्गाबाबत आरोप केले आहेत, की तो फक्त अदानी पोर्टसाठी फायदेशीर आहे. मात्र नितीन राऊत यांनी या आरोपांचा निषेध करत विदर्भाच्या सर्वांगीण विकासासाठी हा महामार्ग आवश्यक असल्याचे ठामपणे सांगितले. डॉ. नितीन राऊत म्हणतात, शक्तिपीठ महामार्ग विदर्भासाठी अत्यंत आवश्यक आहे.
पक्षातील विरोधकांनी जर विरोध दर्शविला तर मी त्यांच्याशी संवाद साधून समजूत काढेन. काँग्रेस विकासाच्या विरोधात जात नाही. त्यामुळे माझ्या पाठिंब्यामुळे पक्षात कोणताही फटका बसणार नाही. राऊत यांनी सांगितले की, या महामार्गामुळे विदर्भात १ लाख कोटींपेक्षा अधिक गुंतवणूक येऊ शकते. पाच लाखांहून अधिक रोजगार निर्मिती शक्य होईल.विदर्भाला कृषी, खनिज, पर्यटन आणि सांस्कृतिक वारसा लाभलेला आहे. या उपलब्ध संसाधनांचा योग्य आर्थिक विकास आणि लॉजिस्टिक सुविधा यामुळे शेतकऱ्यांचे उत्पादन प्रक्रिया उद्योगांतून नवीन बाजारपेठ मिळवू शकते. राऊत यांच्या मते, दिल्ली-नागपूर-हैदराबाद औद्योगिक कॉरिडॉर व नागपूर-गोवा शक्तिपीठ महामार्गाला राष्ट्रीय महत्त्वाचा प्रकल्प घोषित करून मिहान व ड्राय पोर्टच्या एकात्मिक विकासासाठी जमीन व अनुदान मिळेल.
Atul Londhe : मुख्यमंत्री भाजपचे नव्हे तर निवडणूक आयोगाचे प्रवक्ते
शक्तिपीठ महामार्ग प्रकल्प फक्त रस्त्याचे जाळे नाही, तर विदर्भाची अस्मिता, स्वाभिमान आणि आर्थिक भविष्य उभे करणारा प्रकल्प ठरेल, असे राऊत यांनी स्पष्ट केले. नागपूर देशाचा केंद्रबिंदू असल्याने या महामार्गामुळे राज्याला ‘लॉजिस्टिक कॅपिटल’ बनण्याची संधी मिळेल, तर शेतकऱ्यांनाही लाभ मिळेल.
