
शरदचंद्र पवार गटाचे नेते अनिल देशमुख यांनी पेहलगाम दहशतवादी हल्ल्यातील पीडित कुटुंबांवर संशय व्यक्त केला आहे. त्यांच्या या वक्तव्यानंतर भाजपकडून तीव्र प्रतिक्रिया देत जोरदार हल्लाबोल करण्यात आला.
दक्षिण काश्मीरमधील अनंतनाग जिल्ह्यातील प्रसिद्ध पर्यटनस्थळ पहलगाम येथे झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्याने संपूर्ण देश हादरला आहे. या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर अनेकांनीं दावा केला आहे की, दहशतवाद्यांनी गोळीबार करण्याआधी पीडितांचा धर्म विचारला होता. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे (शरद पवार गट) नेते अनिल देशमुख यांनी या संपूर्ण प्रकरणावर संयमी भूमिका घेत हल्ल्याबाबत अद्याप कोणतीही खात्रीशीर माहिती उपलब्ध नाही. चौकशीनंतरच सत्य समोर येईल असे त्यांनी म्हटले आहे. पहलगाम येथील भ्याड दहशतवादी हल्ल्यानंतर नेते अनिल देशमुख यांनी व्यक्त केलेल्या मतांवर भाजपने जोरदार पलटवार केला आहे.

तुष्टीकरणाच्या राजकारणासाठी पवार गट अजून किती खालच्या थराला जाणार? असा थेट सवाल उपस्थित करत भाजपने आक्रमक भूमिका घेतली आहे. जनाची नाहीतर मनाची तरी लाज बाळगा, असा संतप्त टोला अनिल देशमुख यांना लगावत भाजप नेत्यांनी आरोप केला की देश हादरवणाऱ्या या हल्ल्यात निर्दोष हिंदूंना लक्ष्य करण्यात आलं तरीही देशमुख मृतांच्या कुटुंबीयांच्या कथनांवरच शंका घेत आहेत. सर्व पीडित कुटुंबीयांनी स्पष्टपणे सांगितलंय की दहशतवाद्यांनी गोळीबाराआधी नाव व धर्म विचारला. पण अनिल देशमुखसारखी वसुलीखोर व्यक्ती अशा नाजूक वेळीही व्होट जिहादचं नीच राजकारण करत आहे.
मतांसाठी दुःखाचा वापर
भाजपने दावा केला की हे कृत्य म्हणजे दहशतवाद्यांच्या क्रूरतेस अप्रत्यक्ष पाठिंबा देण्यासारखं आहे. जनता हे विसरणार नाही की जेव्हा देश रडत होता तेव्हा काहीजण मतांचं राजकारण करत होते अशा तिखट शब्दांत भाजपने हा मुद्दा अधिकच तापवला आहे. अनिल देशमुख यांनी पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर प्रतिक्रिया देताना संताप व्यक्त केला होता. मात्र एक महत्त्वाचा मुद्दाही उपस्थित केला. दहशतवाद्यांनी गोळीबार करण्याआधी पीडितांचा धर्म विचारला होता का याबाबत कोणतीही ठोस माहिती सध्या उपलब्ध नाही. या प्रकरणातील सत्य हे फक्त सखोल तपासातूनच समोर येऊ शकते असे ते म्हणाले.
देशमुख यांनी या हल्ल्याला अत्यंत दुर्दैवी ठरवत सरकार या नरसंहाराविरोधात कठोर कारवाई करत आहेत. दोषींना पाठीशी घालणारा कोणताही प्रकार सहन केला जाणार नाही असंही स्पष्ट केलं. या हल्ल्यानंतर देशभरात संतापाची लाट उसळली आहे. केंद्र सरकार आणि सुरक्षा यंत्रणांपुढे मोठं आव्हान उभं राहिलं आहे. पीडितांच्या कुटुंबीयांना न्याय देणं आणि अशा हल्ल्यांना भविष्यात आळा घालणं हे सरकारपुढील प्राथमिक उद्दिष्ट ठरणार आहे.
Parinay Fuke : कमळाचं कनेक्शन पुन्हा जमलं; काँग्रेसचे दोन धुरंधर वळले