
भ्रष्टाचाराचा पर्दाफाश केल्यानंतर नागपूरच्या सावनेर तालुक्यात भाजपा कार्यकर्त्याची निर्घृण हत्या करण्यात आली. या रक्तरंजित घटनेमुळे संपूर्ण गावात तणाव निर्माण झाला असून, राजकीय सूडाचा थरार समोर आला आहे.
नागपूर जिल्ह्यातील सावनेर तालुक्यात एक अंगावर शहारे आणणारी घटना घडली आहे. भ्रष्टाचारविरोधात उघडपणे लढा देणाऱ्या आणि एका मोठ्या जमीन घोटाळ्याचा पर्दाफाश करणाऱ्या भाजपा कार्यकर्त्याची अमानुष हत्या करण्यात आली. या खुनामागे सूड, सत्तेचा दंभ आणि राजकीय कटकारस्थान यांचे काळे धागे उलगडत चालले आहेत.
पिपळा डाकबंगला गावातील ग्रामपंचायत सदस्य आणि भाजप कार्यकर्ता अतुल पाटील यांच्यावर रात्री साडेदोनच्या सुमारास त्यांच्या राहत्या घरातच धारदार शस्त्राने हल्ला करण्यात आला. या भयानक हल्ल्यात अतुल पाटील यांचा जागीच मृत्यू झाला. खापरखेडा पोलिसांनी घटनेची माहिती मिळताच तातडीने गुन्हा दाखल करत तपासाला सुरुवात केली आणि काही तासांतच खळबळजनक सत्य बाहेर आलं.

Narendra Bhondekar : एकनाथ शिंदेंच्या रॅलीत शिवसेनेची ताकद दिसणार
सत्तास्थानातून तडाखा
पोलिसांच्या तपासानुसार, हा हल्ला हिमांशू कुंभळकर या युवकाने केला असून, तो कुणाच्या तरी सांगण्यावरून हे कृत्य करत असल्याची प्राथमिक माहिती मिळाली. अधिक चौकशीनंतर पोलिसांनी उघड केलं की, हा घातकी कट माजी सरपंच विष्णू कोकडे याने आखला होता. विष्णू कोकडे हे जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा मुक्ता कोकडे यांचे पती आहेत.
हे प्रकरण केवळ खाजगी वादाचं नसून, पाटील यांनी विष्णू कोकडे यांच्याविरोधात मोठ्या जमीन घोटाळ्याची तक्रार केली होती. त्यावर पोलिसांकडून गुन्हा दाखल झाल्यानंतर कोकडे यांना गावातील सत्तास्थानातून तडाखा बसला होता. त्याच सूडातून ही रक्तरंजित योजना रचली गेल्याचं पोलिसांनी स्पष्ट केलं आहे.
Shiv Sena : राज ठाकरेंचा गुलदस्ता ‘मातोश्री’वर की ‘डीसीएम’ बंगल्यावर?
नेत्यांमध्ये हलचल
पोलिसांनी अवघ्या काही तासांत हिमांशू कुंभळकर आणि विष्णू कोकडे यांना अटक केली असून, अधिक तपास सुरू आहे. मात्र या घटनेने संपूर्ण गावात आणि तालुक्यात प्रचंड संतापाचं वातावरण आहे. ग्रामस्थांमध्ये भीतीचं सावट आहे, आणि राजकीय नेत्यांमध्येही हलचल निर्माण झाली आहे. ही घटना केवळ एका व्यक्तीचा खून नाही, तर हा त्या प्रत्येकाचा खून आहे जो अन्याय, भ्रष्टाचार आणि बेधडक सत्ताधाऱ्यांविरुद्ध आवाज उठवतो.
या हत्येमुळे काही ठळक प्रश्न समोर येतात. भ्रष्टाचार उघड करणाऱ्यांची सुरक्षा कुणाच्या हाती आहे? स्थानिक सत्ताधाऱ्यांकडून गुन्हेगारीसाठी सत्तेचा वापर का केला जातो? आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे, ही केवळ हत्या की राजकीय सूडातून घडलेली एक रचलेली राजकीय हत्या आहे? सध्या पोलीस घटनास्थळी तणाव टाळण्यासाठी बंदोबस्त वाढवला आहे.
सावनेर परिसरात राजकीय आणि सामाजिक चर्चा ताणावर पोहोचल्या आहेत. अतुल पाटील यांना न्याय मिळावा, दोषींना कडक शिक्षा व्हावी आणि भविष्यात अशा प्रकारांना रोखण्यासाठी राज्य प्रशासन काय भूमिका घेते, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. सत्ता, सूड आणि भ्रष्टाचाराचा जिथे संगम होतो, तिथे सत्याची किंमत प्राणांशी मोजावी लागते. अतुल पाटील यांच्या बलिदानाने पुन्हा एकदा हे स्पष्ट केलं आहे की, स्वच्छ राजकारणासाठी लढणाऱ्या कार्यकर्त्यांना अधिक सक्षम संरक्षण व्यवस्था हवी.