
खरीप हंगामाची चाहूल लागताच शेतकरी पेरणीच्या अंतिम तयारीला लागले असून बाजारात बियाण्यांची मोठी मागणी दिसून येते. याच संधीचा गैरफायदा घेत काही बियाणे व खत माफिया शेतकऱ्यांच्या विश्वासाशी खेळ करत आहेत.
खरीप हंगामाचे ढग आता खऱ्या अर्थानं दाराशी आलेले असताना, राज्यातील शेतकरी आपली पेरणीची तयारी अंतिम टप्प्यात आणू लागले आहेत. कापूस, मका, सोयाबीनसारख्या खरीप पिकांच्या बियाण्यांची बाजारात मोठ्या प्रमाणावर मागणी वाढली आहे. अशातच काही संधीसाधू बियाणे आणि खत माफिया शेतकऱ्यांच्या विश्वासाचा गल्ला करत आहेत. हे बियाणे माफिया प्रवासी गाड्यांचा वापर करून प्रतिबंधित बियाण्यांची चोरटी तस्करी करीत असल्याचं समोर आलं आहे. या पार्श्वभूमीवर कृषी व पोलिस विभागानं यवतमाळच्या पुसद तालुक्यातील सावंगी गावात एक मोठी कारवाई केली आहे.
एका संयुक्त मोहिमेत तब्बल 211 बॅग अवैध खत जप्त करण्यात आल्या. या खताचा अंदाजे बाजारमूल्य 2 लाख 88 हजार 887 रुपये इतका असून, विक्रीसाठी कोणतीही कायदेशीर परवानगी घेण्यात आलेली नव्हती. या संपूर्ण प्रकरणामागे एक सखोल छडा लावल्यावर असे लक्षात आले की, गुजरातमधील सुरत येथून किसान गोल्ड व कृषिरत्न ब्रँडच्या खताच्या बॅगा सावंगी (पुसद) गावात आणण्यात आल्या होत्या. हे खत श्री ओम साई फर्टिलायझर कंपनीमार्फत मंगरूळ तालुक्याच्या सीमावर्ती भागातून सावंगी येथे पोहोचवले जात होते. हे खत ट्रकमधून आणून सरळ गावात खुलेआम विकले जात होते तेही विनापरवाना.

शेतकऱ्यांचे हित प्रमुख
शेतकऱ्यांच्या अज्ञानाचा फायदा घेत, शेतात वापरण्यासाठी तयार असलेल्या या खतात कोणताही वैध प्रमाणपत्र किंवा परवाना नसल्याचं उघडकीस आलं आहे. अशा प्रकारे बेकायदेशीर साठा ठेवणं आणि विकणं केवळ गंभीर गुन्हा नाही, तर शेतीसाठीही अतिशय घातक ठरू शकतं. या मोहिमेतील यशाचे श्रेय तालुका कृषी अधिकारी विजय मुकाडे, मोहीम अधिकारी प्रवीण जाधव, कृषी अधिकारी शंकर राठोड, तांत्रिक अधिकारी नितीन घाडगे, कृषी पर्यवेक्षक प्रफुल महेंद्र, कृषी सहाय्यक अंभोरे व नरवाडे यांच्या टीमला जाते.
संपूर्ण कारवाई जिल्हा कृषी अधिकारी डाबरे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. कृषी विभागाने यानंतर बियाणे माफियांना थेट इशारा दिला आहे की, शेतकऱ्यांचे हित हेच सर्वोच्च असून, कोणत्याही प्रकारच्या बेकायदेशीर विक्रीला यापुढे मोकळं रान दिलं जाणार नाही. राज्यातील अनेक भागांमध्ये मान्सून दाखल झाल्यामुळे खरीप हंगाम सुरू होतो आहे. याच काळात अशा संधीसाधू टोळ्यांकडून प्रतिबंधित बियाण्यांची तस्करी शेतकऱ्यांसाठी नुकसानदायक ठरते.