
पाच महिन्यांच्या थांब्यानंतर अखेर बुटीबोरी उड्डाणपूल पुन्हा सुरू झाला आहे. तडे गेलेल्या पायऱ्यांच्या कहाणीला आता मजबुतीचा नवा अध्याय लाभला आहे.
नाबुटीबोरीतील नागरिकांसाठी आणि व्यापाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. पाच महिने बंद असलेला बुटीबोरी उड्डाणपूल अखेर वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे. गेल्या काही महिन्यांपासून प्रचंड वाहतूककोंडी आणि व्यापाऱ्यांच्या व्यवसायावर परिणाम होत असताना, हा पूल पुन्हा सुरू झाल्याने सर्व स्तरांतील नागपूरकरांनी सुटकेचा निश्वास घेतला आहे. विशेष म्हणजे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या नागपूर दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी पोलीस प्रशासनाने यास विशेष गती दिली.
राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (NHAI) कडून उड्डाणपुलाच्या दुरुस्तीचे काम पूर्ण झाल्यानंतर, ठेकेदाराने सादर केलेल्या लोड टेस्टिंग अहवालाची नीट छाननी करण्यात आली. त्यानंतर एनएचएआयने उड्डाणपूल पुन्हा सुरू करण्यास मान्यता दिली. या निर्णयामुळे स्थानिक रहिवासी तसेच व्यापाऱ्यांना मोठा दिलासा मिळाला असून, मागील काही महिन्यांपासून सततच्या वाहतूक कोंडीमुळे त्रस्त असलेल्या नागरिकांना अखेर मोकळा श्वास घेता आला आहे.

व्यवसायावर परिणाम
बुटीबोरी चौक हे नागपूर-चंद्रपूर महामार्गावरील महत्त्वाचे केंद्र आहे जिथे दररोज मोठ्या प्रमाणावर जड वाहने आणि प्रवासी थांबत असतात. अनेक प्रवासी इथे चहा-नाश्त्यासाठी थांबत असत, परंतु उड्डाणपूल बंद झाल्यानंतर चौकात खालच्या मार्गावर वाहतूक पूर्णपणे विस्कळीत झाली होती. वाहतूक कोंडीमुळे व्यापाऱ्यांचे व्यवहार पूर्णतः बिघडले होते. त्यांचे आर्थिक नुकसानही मोठ्या प्रमाणावर झाले होते.
उड्डाणपूल बंद झाल्यानंतर नागपूर ग्रामीण पोलिसांनी तातडीने वाहतूक व्यवस्थापनासाठी नियोजन केले. वाहतूक दिशादर्शक लावून वाहनांच्या उलटसुलट हालचालींवर मर्यादा आणल्या. परिणामी वाहतूक काही प्रमाणात शिस्तबद्ध झाली, परंतु तरीही जड वाहनांच्या साठी ही व्यवस्था अपुरी ठरत होती. इंधनाचा वाढलेला खर्च, वेळेचा अपव्यय आणि त्रासिक प्रवास यामुळे वाहनचालक त्रस्त झाले होते.
डिसेंबरपासून बंद, संरचनेवर संशय
24 डिसेंबर 2024 रोजी उड्डाणपुलाच्या एका टोकाच्या पायऱ्यांवर गंभीर तडे दिसून आल्यानंतर संपूर्ण पुल वाहतुकीसाठी बंद करण्यात आला होता. हे तडे बुटीबोरी-चंद्रपूर दिशेच्या डेक स्लॅबवर आढळून आले. सुरक्षेच्या दृष्टीने संपूर्ण उड्डाणपूल बंद करण्यात आला आणि दोन्ही टोकांना बॅरिकेड्स लावण्यात आले. पुलाच्या संरचनेतील दोषांची पाहणी करण्यासाठी VNIT (विश्वेश्वरय्या राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्था) चे तज्ञ आणि नागपूरच्या सिव्हिल इंजिनीयरिंग विभागाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले.
नमुने गोळा करून त्यांनी सखोल तपासणी केली आणि आपला अहवाल NHAI कडे सुपूर्द केला. पुलावर ‘डिफेक्ट लायबिलिटी’ लागू असल्याने ठेकेदाराला सर्व दुरुस्ती कामे करण्यास भाग पाडण्यात आले. या दरम्यान, उड्डाणपुलाला आधार देण्यासाठी स्कॅफोल्डिंग लावण्यात आले होते. दुरुस्तीच्या कामात मुख्यतः पायऱ्यांमध्ये अतिरिक्त लोखंडी रॉड्स बसवून त्यांना अधिक मजबूत करण्यात आले. त्यामुळे आता पुलाची वजन सहन करण्याची क्षमता पूर्वीपेक्षा अधिक वाढली आहे. भविष्यात अशा प्रकारचे तडे पुन्हा पडण्याची शक्यता फारच कमी आहे.
Buldhana : पानसरेंच्या थेट कृतीने गृह विभागाच्या भिंती हादरल्या
उद्घाटनानंतरचा परिणाम
शनिवारी उड्डाणपूल सुरू झाल्यानंतर लगेचच वाहतूक सुरळीत झाली. व्यापारी आनंदी झालेत, वाहनचालकांनी सुटकेचा निःश्वास घेतला आणि नागरिकांनी पोलिसांचे तसेच NHAI च्या अधिकाऱ्यांचे आभार मानले. उड्डाणपूल हा केवळ एक बांधकाम प्रकल्प नसून, नागपूरच्या विकासात एक महत्त्वाचा दुवा आहे, हे पुन्हा सिद्ध झाले आहे.
बुटीबोरी उड्डाणपूलाचे पुन्हा सुरू होणे ही नागपूरसाठी एक सकारात्मक बातमी आहे. यातून प्रशासनाच्या तत्परतेबरोबरच संरचनात्मक सुरक्षेवर दिला गेलेला भर दिसून येतो. नागपूरच्या वाढत्या नागरीकसंख्येला आणि उद्योग क्षेत्राला अशा पायाभूत सुविधांची नितांत गरज आहे. ही घटना भविष्यातील प्रकल्पांसाठीही एक प्रेरणास्त्रोत ठरेल.