
नागपुरात वाघांचा हल्ला वाढला आहे. अशात शिवसेनेच्या वाघांना सोबत घेऊन चंद्रशेखर बावनकुळे यांनी वाघांच्या हल्ल्याला रोखण्यासाठी तातडीने उपाययोजना सुरू केल्या आहेत. त्यामुळे भयग्रस्त गावकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.
राज्यात महायुती सरकारचा जोरदार विजय झाला. भारतीय जनता पार्टीने महाविकास आघाडीचा पाडाव करण्यासाठी शिवसेनेच्या वाघांना सोबत घेतले. पण मंत्रिमंडळात शिवसेनेला दुसरे स्थान मिळाल्याने शिवसेनेचे अनेक वाघ नाराज आहेत. असे असताना महसूल मंत्री आणि नागपूरचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी नागपूर जिल्ह्यातील वाघांना वेसण घालण्याचा निर्धार केला आहे. पण हे वाघ शिवसेनेचे नव्हे, तर रामटेक, पारशिवणी आणि पेंच व्याघ्र प्रकल्पाच्या शेजारील जंगलातील खरेखुरे वाघ आहेत. जे सध्या ग्रामस्थांच्या जिवाला धोका निर्माण करत आहेत.
नागपूर जिल्ह्यातील रामटेक, पारशिवणी व पेंच व्याघ्र प्रकल्पाच्या शेजारील गावांमध्ये वाढत्या वाघांच्या हल्ल्यामुळे निर्माण झालेल्या भीतीच्या वातावरणावर सरकारने तातडीने उपाययोजना हाती घेतल्या आहेत. या उपाययोजनांसाठी निधीची कोणतीही कमतरता पडू दिली जाणार नाही, असा ठाम निर्धार राज्याचे महसूल मंत्री आणि नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केला. नवेगाव खैरी येथे आयोजित व्यापक बैठकीत पालकमंत्र्यांसह राज्यमंत्री ॲड. आशिष जयस्वाल व वनमंत्री गणेश नाईक यांनी ग्रामस्थांशी संवाद साधला. गणेश नाईक यांनी दूरदृष्य प्रणालीद्वारे या बैठकीत सहभाग घेतला.

Vidarbha : देवाभाऊच नव्हे; झिरवाळही करणार ‘दूध का दूध अन्..’
तंत्रज्ञानाचा वापर
सुरक्षा उपाययोजनांसाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येणार आहे. पालकमंत्री बावनकुळे यांनी वाघांच्या हल्ल्यांना आळा घालण्यासाठी एआय आधारित यंत्रणा, सौरऊर्जा प्रकल्प, संरक्षण कुंपण व उच्च क्षमतेचे सौर लाईट्स यासारख्या उपाययोजना तातडीने सुरू करण्याची घोषणा केली. ग्रामस्थांच्या सुरक्षिततेसाठी कोणत्याही निधीची कमतरता पडू दिली जाणार नाही,” असे बावनकुळे यांनी ठामपणे सांगितले.
वाघांची संख्या नियंत्रणासाठी वाघ स्थलांतर प्रस्ताव देण्यात येणार आहे. नागपूर जिल्ह्यात वाघांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. या वाघांना इतर राज्यांत स्थलांतरित करण्यासाठी केंद्र सरकारकडे प्रस्ताव पाठवण्याचे निर्देश वनमंत्री गणेश नाईक यांनी वन विभागाला दिले आहेत. ग्रामस्थांच्या सुरक्षिततेसाठी हे पाऊल अत्यंत महत्त्वाचे आहे, असे चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्पष्ट केले.
तातडीची मदत
वाघाच्या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांच्या कुटुंबीयांना त्वरीत मदत देण्याचे आदेश राज्यमंत्री ॲड. आशिष जयस्वाल यांनी दिले. वन्यप्राण्यांमुळे नुकसानग्रस्त झालेल्या शेतीच्या नुकसान भरपाईलाही प्राधान्य देण्यात येईल, असे आशिष जयस्वाल यांनी सांगितले. वाघाच्या हल्ल्यात जखमी झालेल्या ग्रामस्थांना तातडीने वैद्यकीय मदत मिळावी यासाठी पेंच परिसरातील देवलापार येथे अत्याधुनिक उपचार केंद्र उभारण्यात येणार असल्याची महत्त्वपूर्ण घोषणा बैठकीत करण्यात आली.
वाघांचा अधिवास आणि मानव वस्त्यांमधील संघर्ष हा मोठा प्रश्न आहे, परंतु सरकार गावकऱ्यांच्या सुरक्षेसाठी कटिबद्ध आहे, असे पालकमंत्री बावनकुळे यांनी स्पष्ट केले. ग्रामस्थांनीही सरकारच्या उपाययोजनांचे स्वागत केले असून, लवकरात लवकर ही कामे प्रत्यक्षात उतरावीत अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.