केवळ सत्तेसाठी महायुतीत प्रवेशास नकार. मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्यावर घणाघात.
महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीत महायुतीचा विजय विरोधकांच्या पचनी पडलेला दिसत नाही. राज्यात महायुतीचे सरकार स्थापन झाल्यानंतर विरोधकांनी राज्य सरकारवर अनेक टीका केल्या. ईव्हीएम वरून भाजप प्रणित महायुतीवर आरोप करण्यात आले. त्यानंतर सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये टीकाटिप्पणी सुरू झाल्या. अशात आता महसूल मंत्री तथा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांचा बालिश राजकारणी म्हणून उल्लेख केला आहे.
आदित्य ठाकरे यांच्याकडे पर्यटन खाते होते. तेव्हा त्यांनी केवळ पर्यटनच केले. त्यांना सरकारचा गाभा कळालाच नाही. दावोसमध्ये सर्व उद्योजक येत असतात तिथे करार होत असतात. आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अभिनंदन करायला पाहिजे. फडणवीस यांनी 17.75 लाख कोटी रुपये गुंतवणूक महाराष्ट्रात आणली आहे. परंतु बिघडलेल्या मानसिकतेमधील कारट्यांना काही सुधरत नाही. आदित्य ठाकरे हे बालिश राजकारणी आहेत, असे म्हणत आदित्य ठाकरेंवर बावनकुळे यांनी हल्ला चढविला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात महाराष्ट्र थांबणार नाही. राज्य गतीने विकसित होणार आहे. गडचिरोली ते बुलढाणापर्यंत शेती असो की, औद्योगिक क्षेत्र असो. विदर्भातील मागासलेले जिल्हे देखील आता विकसित होणार असल्याचे चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले.
हम दो, हमारे दो
चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, उद्धव ठाकरेंना शरद पवार आणि काँग्रेसने आता सोडून दिले आहे. त्यामुळे स्वबळाशिवाय दुसरा मार्ग त्यांच्याकडे उरलेला नाही. उद्धव ठाकरे हे बिनडोक नेते आहेत. आता त्यांना सर्वच जण सोडून देत आहे. एक दिवस असा येईल की उद्धव ठाकरे हे “हम दो अन् हमारे दो” राहतील, असा घणाघात बावनकुळे यांनी केला.
केवळ सत्तेसाठी सत्ताधारी पक्षांसोबत येणाऱ्या नेत्यांना महायुतीत थेट प्रवेश देण्यात येणार नाही, असे बावनकुळे यांनी स्पष्ट सांगितले. महाविकास आघाडीच्या अनेक नेते माहिती प्रवेश करण्यासाठी इच्छुक होते. परंतु बावनकुळे यांच्या या विधानामुळे महायुतीसोबत जाण्याची मनषा बाळगणाऱ्या महाविकास आघाडीतील नेत्यांना जबर झटका बसला आहे. तर सैफ अली खान याच्यावर हल्ला झाल्यानंतर लिलावती रुग्णालयातील डॉक्टरांनी त्याच्यावर उपचार केले होते. डॉक्टरांनी केलेल्या उपचारावर शंका घेण्याची आवश्यकता नाही, असेही चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटले आहे.
