महाराष्ट्र

Chandrashekhar Bawankule : हिंदू-मुस्लिम ऐक्य अबाधित 

BJP : बावनकुळे यांच्या नेतृत्वाखाली संघटन मजबूत

Author

महाराष्ट्राचे महसूल मंत्री आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे राष्ट्रहित आणि सामाजिक एकतेच्या दृढ भूमिकेसाठी ओळखले जातात. त्यांच्या नेतृत्वाखाली भाजपचा विस्तार, समन्वय आणि विकासाची वाटचाल अधिक गतिमान झाली आहे.

महाराष्ट्राचे महसूल मंत्री आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी पक्षाच्या स्पष्ट भूमिकेचा पुनरुच्चार करताना सामाजिक एकतेला बळकटी देण्याचे आवाहन केले आहे. त्यांनी स्पष्ट केले की, भाजप कोणत्याही धर्माच्या विरोधात नसून भारताच्या सार्वभौमत्वाशी प्रतारणा करणाऱ्या प्रवृत्तींविरोधात ठाम भूमिका घेतो. त्यांच्या नेतृत्वाखाली राज्यात सर्व समाजघटकांमध्ये विश्वास निर्माण करण्याचे धोरण अवलंबले जात आहे.

भाजपच्या अल्पसंख्याक मोर्चातर्फे रमजान महिन्याच्या निमित्ताने सौगात-ए-मोदी उपक्रम हाती घेण्यात आला असून, देशभरात मुस्लिम बांधवांना भेटवस्तूंचे वाटप केले जाणार आहे. या माध्यमातून सामाजिक सौहार्द वृद्धिंगत करण्याचा पक्षाचा प्रयत्न आहे. विविध समाजघटकांना सन्मानाने जोडण्याच्या दिशेने हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरेल.

Ajit Pawar : फक्त दहा मिनिटे उपस्थित राहणाऱ्या ठाकरेंना कामकाज कसे समजेल? 

राष्ट्रहित सर्वोच्च 

बावनकुळे यांनी उद्धव ठाकरेंच्या नाशिक आणि परभणीमधील सभांमध्ये दिसलेल्या पाकिस्तानी झेंड्यांचा मुद्दा उपस्थित करत, देशाच्या अस्मितेच्या विरोधात कोणतीही कृती सहन केली जाणार नाही, हे ठाम शब्दांत सांगितले. भारतात राहून पाकिस्तानचा झेंडा फिरवणे, भारताविरोधात घोषणाबाजी करणे किंवा शत्रुराष्ट्राच्या विजयावर जल्लोष करणे हे देशविरोधी असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. त्यांनी हेही नमूद केले की, राज्यातील हिंदू-मुस्लिम एकोपा अबाधित आहे. काही समाजविघातक घटकांकडून समाजात फूट पाडण्याचा प्रयत्न होत आहे. अशा प्रवृत्ती रोखण्यासाठी सरकार कटिबद्ध असून, कायद्याचे कठोर अंमलबजावणी केली जाईल.

चंद्रशेखर बावनकुळे यांनी पक्षसंघटनेच्या बळकटीसाठी विशेष रणनीती आखली आहे. भाजपच्या कार्यकर्त्यांनी जनतेमध्ये जाऊन त्यांच्या समस्या जाणून घ्याव्यात आणि त्या सोडवण्यासाठी प्रयत्न करावेत, असा संदेश त्यांनी दिला. उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करताना त्यांनी सांगितले की, केवळ आरोप करण्यापेक्षा पक्ष संघटना वाढवण्यावर लक्ष केंद्रित करावे. त्यांनी असेही नमूद केले की, भाजपकडे स्थिर नेतृत्व आणि स्पष्ट दिशा आहे. त्यामुळे पक्षाची लोकप्रियता वाढत आहे आणि कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य संचारले आहे.

समाजाचा विश्वास

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नागपूर दौऱ्यासाठी विशेष नियोजन करण्यात आले आहे. 47 प्रमुख चौकांमध्ये त्यांचे स्वागत करण्यासाठी शेकडो कार्यकर्ते सहभागी होणार आहेत. आकर्षक वेशभूषा, भव्य सजावट, गुढी उभारणी आणि उत्साहपूर्ण वातावरण निर्माण करण्यावर भर दिला जात आहे. बावनकुळे यांनी भाजप कार्यकर्त्यांना संदेश दिला की, या स्वागत सोहळ्याच्या माध्यमातून पक्षाच्या ताकदीचे दर्शन घडवावे. नागपूर हा भाजपचा बालेकिल्ला आहे. येथील कार्यकर्त्यांचा जोश संपूर्ण देशासाठी प्रेरणादायी ठरेल.

चंद्रशेखर बावनकुळे यांनी गेल्या काही महिन्यांत विविध समाजघटकांशी संपर्क वाढवत, पक्षाचा विस्तार अधिक व्यापक केला आहे. सामाजिक एकोपा, विकास आणि राष्ट्रहित यावर भर देणारे त्यांचे नेतृत्व महाराष्ट्राच्या राजकारणात निर्णायक ठरत आहे.त्यांच्या पुढाकाराने भाजप राज्यभर मजबूत होत आहे. सरकारच्या विकासनीतीला जनतेचा मोठा पाठिंबा मिळत आहे. भविष्यातही समाजाच्या सर्व स्तरांना सोबत घेत, समृद्ध महाराष्ट्राच्या दिशेने वाटचाल करण्याचा भाजपचा संकल्प असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!