
छत्रपती शिवाजी महाराजांचे गडकिल्ले महाराष्ट्राच्या ताब्यात द्यावेत, अशी महत्त्वपूर्ण मागणी सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी केंद्र सरकारकडे केली आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांचा पराक्रम दर्शविणारे ऐतिहासिक गडकिल्ले राज्य सरकारच्या ताब्यात द्यावेत, अशी महत्त्वपूर्ण मागणी महाराष्ट्र सरकारने केंद्र सरकारकडे केली आहे. याबाबत सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी केंद्रीय मंत्री गजेंद्रसिंह शेखावत यांना पत्र लिहून या विषयावर सविस्तर मागणी केली आहे.
महाराष्ट्राच्या राजकीय वातावरणात सध्या शिवाजी महाराज आणि ऐतिहासिक वारशाचा मुद्दा चांगलाच तापला आहे. औरंगजेबाच्या नावावरून सुरू झालेला वाद, इतिहास संशोधकांवरील आरोप-प्रत्यारोप, नागपुरातील तणाव अशा घडामोडींमुळे महाराष्ट्रातील राजकीय रणधुमाळी अधिक तीव्र झाली आहे. अशा परिस्थितीत शिवरायांचे गडकिल्ले राज्य सरकारच्या अखत्यारीत द्यावेत, ही मागणी अधिक महत्त्वाची ठरत आहे.

Rahul Gandhi : शिक्षण आरएसएसच्या ताब्यात गेलं, तर देश उद्ध्वस्त होईल
किल्ल्यांचे संवर्धन
महाराष्ट्रातील काही ऐतिहासिक किल्ले भारतीय पुरातत्व विभागाच्या (ASI) अखत्यारीत आहेत. त्यामुळे या किल्ल्यांचे जतन, संवर्धन आणि डागडुजी करण्यासाठी केंद्र सरकारच्या परवानगीची आवश्यकता असते. या प्रक्रियेमुळे किल्ल्यांच्या दुरुस्तीच्या कामात विलंब होत असल्याचे राज्य सरकारचे म्हणणे आहे. म्हणूनच सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी केंद्र सरकारला पत्र लिहून ही ऐतिहासिक स्थळे महाराष्ट्राच्या पुरातत्व विभागाकडे हस्तांतरित करण्याची मागणी केली आहे.
महाराष्ट्र राज्यात सध्या 62 किल्ले राज्य सरकारच्या अखत्यारीत आहेत. त्यातील 54 किल्ल्यांची जबाबदारी केंद्र सरकारच्या पुरातत्व विभागाकडे आहे. जर हे सर्व किल्ले राज्य सरकारच्या ताब्यात आले, तर त्यांचे संवर्धन अधिक प्रभावीपणे करता येईल, असा महाराष्ट्र राज्य सरकारचा विश्वास आहे.
Narendra Modi : गुढी पाडव्याच्या मुहूर्तावर संघ आणि दीक्षाभूमीला भेट
जागतिक स्तरावर ओळख
शिवाजी महाराजांचे किल्ले जागतिक स्तरावर ओळख मिळावी यासाठी महाराष्ट्र सरकार प्रयत्नशील आहे. या पार्श्वभूमीवर युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीत शिवरायांच्या 12 किल्ल्यांचा समावेश करण्यासाठी राज्य सरकारने प्रस्ताव सादर केला आहे. तसेच, गड-किल्ल्यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी जिल्हास्तरीय समित्यांची स्थापना करण्यात आली आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांनी घडवलेले हे किल्ले केवळ दगड-मातीचे ढीग नाहीत, ते स्वराज्याची शान, मराठा साम्राज्याच्या पराक्रमाचे प्रतीक आहेत. त्यामुळे त्यांचे योग्य प्रकारे संरक्षण आणि संवर्धन होणे ही काळाची गरज आहे. केंद्र सरकारने राज्य सरकारच्या या मागणीवर सकारात्मक पावले उचलावीत, अशी शिवप्रेमींची आणि राज्य सरकारची अपेक्षा आहे.
समिती स्थापन
संपूर्ण विषयावर बोलताना आशिष शेलार यांनी स्पष्ट केले की, ‘छत्रपती शिवाजी महाराजांचे गडकिल्ले राज्याच्या ताब्यात दिले, तर त्यांचे जतन अधिक चांगल्या प्रकारे करता येईल. राज्य सरकार या ऐतिहासिक वारशाच्या संवर्धनासाठी ठोस पावले उचलत आहे. शिवाय, गड-किल्ल्यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी विशेष समितीही स्थापन केल्या आहेत.
शिवरायांचे किल्ले हा महाराष्ट्राच्या अस्मितेचा विषय आहे. त्यामुळे या किल्ल्यांची जबाबदारी महाराष्ट्र सरकारकडे दिल्यास ते अधिक चांगल्या प्रकारे जपले जातील, असे आशिष शेलार यांनी आपल्या पत्रातून केंद्र सरकारला सुचवले आहे. आता या मागणीवर केंद्र सरकार काय भूमिका घेते, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.