महाराष्ट्र

Gadchiroli : वैनगंगेच्या कुशीतून पुन्हा उसळणार जलरूपी महाप्रवाह 

Chichdoh Barrage : चिचडोहच्या जलद्वारांनी उघडला पावसाळ्याचा पहिला अध्याय 

Author

वैनगंगा नदीवर वसलेले चिचडोह बॅरेज लवकरच आपल्या जलद्वारांचे कवाड उघडणार आहे. पावसाळ्याच्या आगमनाची चाहूल लागताच पूरनियंत्रणाच्या दृष्टीने ही महत्त्वपूर्ण कारवाई हाती घेण्यात आली आहे.

गडचिरोली जिल्ह्यातील वैनगंगा नदीवरील महत्वाचा जलस्रोत चिचडोह बॅरेज येत्या 1 जून 2025 पासून पावसाळ्याच्या आगमनानंतर टप्प्याटप्याने खुला होणार आहे. वैनगंगेच्या पात्रातील जलप्रवाह नियंत्रित ठेवण्यासाठी आणि संभाव्य पूरस्थिती टाळण्यासाठी हा निर्णय घेतल्याची माहिती जलसंपदा विभागाने दिली आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार मान्सूनने जिल्ह्याच्या सीमेला स्पर्श केल्यामुळे, बॅरेजमधील साठवलेले पाणी नियंत्रित स्वरूपात सोडण्याचे नियोजन करण्यात आले आहे.

 

गेल्या काही महिन्यांपासून बंद असलेले चिचडोह बॅरेजचे सर्व 38 दरवाजे आता उघडण्यात येणार असून, यासाठी विशेष सावधगिरी आणि नियोजनबद्ध प्रक्रिया राबवली जाणार आहे. 1 जून रोजी सकाळी 8 वाजता याची सुरुवात होणार आहे. प्रारंभी 88.04 क्युमेक्स इतका पाण्याचा विसर्ग नदीपात्रात करण्यात येणार आहे. यामुळे नदीच्या खालील भागातील पाणीपातळीत अचानक वाढ होण्याची शक्यता आहे.

 

टप्प्याटप्प्याने होणार खुले

 

चिचडोह बॅरेजचे बांधकाम जून 2018 मध्ये पूर्ण झाले असून, या बॅरेजची एकूण लांबी 691 मीटर आहे. बॅरेजमध्ये बसवलेले 15 मीटर लांब आणि नऊ मीटर उंचीचे लोखंडी उभे दरवाजे जलसंचय नियंत्रणासाठी अत्यंत महत्वाचे मानले जातात. मागील वर्षी 15 ऑक्टोबर 2024 पासून हे दरवाजे बंद ठेवण्यात आले होते, जे आता नव्या पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर टप्प्याटप्याने उघडले जाणार आहेत. सद्यस्थितीत 27 मे 2025 रोजी बॅरेजमध्ये 183.00 मीटर एवढी पाणीपातळी आहे. साठा 53.52 दशलक्ष घनमीटर इतका नोंदवला गेला आहे. त्यामुळे ही विसर्ग प्रक्रिया केवळ पाणीपुरवठा नव्हे तर सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातूनही अत्यंत आवश्यक ठरत आहे.

प्रशासनाने नदीच्या काठावर वसलेल्या सर्व गावांना आणि ग्रामपंचायतींना वेळेत सूचित केले असून, संभाव्य धोका लक्षात घेता विशेष दक्षता घेण्याचे निर्देश दिले आहेत. नागरिकांनी या काळात नदीकाठावर जाणे टाळावे, तसेच शेतकरी, मासेमार, वाळू उपसा करणारे, पशुपालक आणि विशेषतः मार्कंडा देवस्थानाजवळील यात्रेकरूंनी अत्यंत सावधगिरी बाळगावी, असे प्रशासनाने स्पष्टपणे सांगितले आहे.

जलसंचालनात संतुलन

चिचडोह बॅरेज प्रशासनाने एक अत्यंत जबाबदार पाऊल उचलले असून, या विसर्ग प्रक्रियेमुळे वैनगंगा नदीच्या जलसंचालनात संतुलन राखण्यास मदत होणार आहे. नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता अधिकृत सूचना आणि आदेशांचे पालन करावे, असेही आवाहन करण्यात आले आहे.

पाणी हे जीवन आहे, पण त्याचे नियंत्रण हे सुरक्षिततेसाठी आवश्यक, या उक्तीनुसार हा निर्णय घेतला गेला आहे. बॅरेजमधून नियोजित विसर्ग काळजीपूर्वक व टप्प्याटप्याने करण्यात येणार आहे. संपूर्ण कार्यवाहीवर चोख नजर ठेवण्यात येणार असून, नागरिकांचे सहकार्य हे या प्रक्रियेचे यशस्वीपणे पार पाडण्यासाठी अत्यावश्यक आहे.

व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!