महाराष्ट्र

गणेशोत्सवातील अडथळे होणार दूर? Devendra Fadnavis सरकारकडून नवीन आशा

मुख्यमंत्र्यांच्या बदलानंतर गणेश मंडळांच्या अपेक्षा वाढल्या

Author

महाराष्ट्रातील सर्वात मोठा सण म्हणजे गणेशोत्सव. गणेश उत्सवा दरम्यान गणेश मंडळांना प्रशासनाच्या त्रासाला सामोरे जावं लागतं. त्यामुळे देवेंद्र फडणवीस गणेश मंडळाच्या अडचणी दूर करतील, अशी अपेक्षा गणेश भक्तांना आहे.

महाराष्ट्रात गणेशोत्सव हा केवळ धार्मिक उत्सव नसून सांस्कृतिक आणि सामाजिक एकतेचं प्रतीक मानला जातो. प्रत्येक वर्षी हजारो गणेश भक्त मोठ्या उत्साहाने हा उत्सव साजरा करतात. गणेश मंडळे आपल्या परंपरा आणि सामाजिक कार्यातून समाजात महत्त्वाची भूमिका बजावतात. मात्र, गणेशोत्सवाच्या काळात पोलिसांकडून विविध अटी, परवानग्या आणि निर्बंधांमुळे अनेक मंडळांना त्रास सहन करावा लागतो.

एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना गणेश मंडळांना प्रशासनाकडून कोणताही त्रास होणार नाही, असे आश्वासन देण्यात आले होते. त्यांनी गणेश भक्तांसाठी काही महत्त्वाचे निर्णय घेतले आणि मंडळांना सहकार्य करण्याचे आदेश प्रशासनाला दिले. तरीही, अनेक ठिकाणी मंडळांच्या कार्यकर्त्यांनी पोलिसांच्या अटी आणि निर्बंधांमुळे अडचणीचा सामना केल्याचे समोर आले. ध्वनीप्रदूषणाचे नियम, विसर्जनासाठी ठिकाणांवरील बंधने आणि मंडप उभारणीसाठी परवानग्यांबाबत काही समस्या उद्भवल्या.

महाराष्ट्रात Mahayuti सरकारचा पुढाकार; तीन गावांना नगरपरिषदेचा दर्जा

नवीन आशा

आता महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदी पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीस विराजमान झाले आहेत. फडणवीस यांच्या मागील कार्यकाळातही गणेश मंडळांनी मोठ्या प्रमाणावर गणेशोत्सव साजरा केला होता. तेव्हा मंडळांना काही प्रमाणात शिथिलता देण्यात आली होती, तसेच विसर्जनासाठी आवश्यक व्यवस्था पुरवण्यास प्रशासन सज्ज होते.

गणेश मंडळांमधील कार्यकर्त्यांना आशा आहे की, यावेळीही फडणवीस सरकार मंडळांच्या समस्या सोडवेल. अनेक कार्यकर्त्यांनी सरकारकडे विनंती केली आहे की, गणेशोत्सव साजरा करताना नियमांचे पालन करताना प्रशासनाचा दृष्टिकोन सहकार्याचा असावा.

प्रमुख अडचणी

मंडप उभारणी, ध्वनीप्रदूषण नियंत्रण, आणि विसर्जन यासाठी अनेक परवानग्या घ्याव्या लागतात. या प्रक्रियेत विलंब झाल्यास उत्सवाच्या तयारीला अडथळा येतो. स्पीकर आणि डॉल्बी साऊंडसंदर्भात नेहमीच तणाव असतो. काही मंडळांना विनाकारण नोटिसा दिल्या जातात, असा आरोप अनेक कार्यकर्ते करतात. काही ठिकाणी विसर्जनासाठी प्रशासनाने मर्यादा घातल्यामुळे भक्तांना अडचणींचा सामना करावा लागतो. मोठ्या उत्सवासाठी निधी उभारण्याच्या प्रक्रियेत काही अडथळे येतात, कारण काही ठिकाणी निधी गोळा करण्यावर निर्बंध असतात.

गणेशोत्सव हा महाराष्ट्राच्या सांस्कृतिक ओळखीचा एक अविभाज्य भाग आहे. त्यामुळे सरकारने उपाययोजना कराव्यात अशी गणेश मंडळांची मागणी आहे. यामध्ये परवानग्यांची प्रक्रिया सुलभ करावी आणि ऑनलाईन प्रणाली अधिक कार्यक्षम करावी. ध्वनीप्रदूषण नियमांची अंमलबजावणी करताना गणेश मंडळांशी संवाद साधून निर्णय घ्यावेत. विसर्जनासाठी पुरेशी सोय आणि सुविधा उपलब्ध करून द्याव्यात.गणेशोत्सवाच्या तयारीसाठी स्थानिक प्रशासनाने अधिक सहकार्य करावे, अशी गणेश मंडळांची मागणी आहे.

सकारात्मक प्रतिसादाची अपेक्षा

गणेशोत्सव हा जनतेच्या भावनांशी जोडलेला असल्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या नेतृत्वाखालील सरकार गणेश मंडळांच्या अडचणींवर सकारात्मक निर्णय घेईल, अशी भावना गणेश भक्तांमध्ये आहे. आगामी काही महिन्यांत प्रशासन आणि सरकारकडून कोणते निर्णय घेतले जातात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!