
नागपूरमध्ये कडक उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर वारंवार वीजपुरवठा खंडित होत आहे. हेच शहर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे असूनही नागरिक अंधारात हवालदिल आहेत.
कडक उन्हाळ्याच्या झळांनी नागपूर पेटले असताना, नागरिकांना वीज खंडनाचा आणखी एक त्रास सहन करावा लागत आहे. विशेष म्हणजे हेच शहर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे असून, ते स्वतः ऊर्जा खातं सांभाळतात. तरीही नागपूरमध्ये वारंवार वीजपुरवठा खंडित होणे ही बाब राज्य प्रशासनाच्या कारभारावर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी ठरते आहे.ही परिस्थिती संपूर्ण प्रशासकीय यंत्रणेच्या अपयशाकडे निर्देश करणारी आहे.
गेल्या काही दिवसांपासून नागपूरच्या विविध भागांत दिवस असो वा रात्र, वीजपुरवठा अचानक बंद होतोय. परिणामी नागरिकांचे दैनंदिन जीवन विस्कळीत झाले आहे. नागरिकांना उष्णतेचा त्रास, अंधार, वीज उपकरणांचे नुकसान यांचा सामना करावा लागत आहे. एप्रिल महिन्याच्या सुरुवातीलाच 2 तारखेला आलेल्या वादळी पावसामुळे शहरात वीजपुरवठा पूर्णतः कोलमडला होता.

व्यवस्था ढासळलेली
अवकाळी पावसाचे संकट दरवर्षीप्रमाणे यंदाही शहरावर कोसळले, पण महावितरणच्या व्यवस्थेने कोणतीही पूर्वतयारी केलेली नव्हती. झाडांच्या फांद्या वीज तारांवर पडून वीजपुरवठा खंडित होतोय, आणि यावर उपाय म्हणून वेळेवर छाटणी केली जात नाही. परिणामी पावसाच्या अगोदरच नागरिक अंधारात ढकलले जात आहेत.दक्षिण नागपूर, पार्वती नगर, रामेश्वरी, मानेवाडा, सक्करदरा, त्रिमूर्तीनगर, महाल अशा भागांमध्ये अनेक तास वीज गेली. महावितरणकडून फक्त तांत्रिक बिघाड, फीडर फॉल्ट, आणि देखभाल कामाचे साचेबद्ध स्पष्टीकरण दिले जात आहे, पण त्या पलिकडे काहीच कृती दिसत नाही.
वादळानंतर अनेक भागांत फीडर बंद पडले, उपकेंद्रे कोसळली आणि ट्रान्सफॉर्मर अकार्यक्षम झाले. 6 एप्रिलला गिट्टीखान आणि गोरेवाडा परिसरात वीज गेल्यावर महावितरणकडून पर्यायी मार्गाने वीजपुरवठा सुरू करण्याचे प्रयत्न झाले, पण ओव्हरलोडिंगमुळे पुन्हा वीज गेली. अखेर सकाळी 6.30 वाजता अन्य फीडरवरून पुरवठा सुरळीत करण्यात आला. यावरून नागपूरमधील पायाभूत वीज व्यवस्था केवळ कागदावरच आधुनिक आहे, प्रत्यक्षात ती अपुरी, असुरक्षित आणि बेफिकीर कारभारात अडकलेली आहे.
Sandip Joshi : भाजपचा बालेकिल्ला पुन्हा मजबूत करण्याची तयारी
नियोजन नाही
मुख्यमंत्र्यांचे घर असलेले शहरच जर वारंवार अंधारात जात असेल, तर हे केवळ नागपूरकरांचं नव्हे, तर संपूर्ण राज्यातील जनतेचं दुर्दैव आहे. शहराचं नेतृत्व उच्चपदस्थांच्या हाती असताना जर नागपूरच वारंवार अंधारात जात असेल, तर यामागे कारभारातली त्रुटी, दीर्घकालीन नियोजनाचा अभाव आणि प्रशासकीय उदासीनता कारणीभूत आहे.
दीर्घकालीन नियोजन, उन्हाळ्यासाठी स्वतंत्र लोड मॅनेजमेंट, ट्रान्सफॉर्मर देखभाल, आणि झाडांची नियोजनबद्ध छाटणी, हे सर्व मुद्दे दरवर्षी चर्चेत येतात आणि पुन्हा दुर्लक्षित होतात. वीजपुरवठा ही केवळ सुविधा नसून नागरी हक्क आहे, आणि तो वारंवार खंडित होणं ही कारभारातील असमर्थतेची लक्षणं आहेत.