राज्यात सर्वत्र अनंत चतुर्दशीचा उत्साह संचारला आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही आपल्या निवासस्थानी गणपती बाप्पाला निरोप देत राज्यभर सुख-समृद्धीची प्रार्थना केली.
मुंबईच्या हृदयस्थानी, गजाननाच्या भक्तीने नटलेल्या वातावरणात, गजानना श्री गणराया, आधी वंदू तुज मोरया या गजराने अवघा महाराष्ट्र दहा दिवस गणेशोत्सवाच्या रंगात न्हाला. काही दिवसांपूर्वी बाप्पांचे स्वागत ढोल-ताशांच्या गजरात झाले आणि आता अनंत चतुर्दशीच्या शुभमुहूर्तावर बाप्पा आपल्या गावाकडे परत निघाले. हा दहा दिवसांचा सोहळा जणू काही क्षणातच उलटला आणि आता विसर्जनाच्या धामधुमीने सगळीकडे उत्साह संचारला आहे. गल्लीबोळातून ते राजकीय नेत्यांच्या निवास स्थानापर्यंत, सर्वत्र बाप्पांच्या निरोपाची तयारी जोरात सुरू आहे.
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शासकीय वर्षा बंगल्यावरही गणरायाचे आगमन मोठ्या भक्तिभावाने झाले होते. दहा दिवसांचा हा गणपती त्यांच्या कुटुंबासह वर्षा बंगल्यावर विराजमान झाला होता. अनंत चतुर्दशीच्या दिवशी, फडणवीस कुटुंबाने सहकुटुंब बाप्पाची आरती करत त्यांचा निरोप घेतला. यान्तु देवगणा: सर्वे पूजामादाय मामकीम्। इष्टकामसमृद्धयर्थं पुनरपि पुनरागमनाय च॥ या मंत्राच्या गजरात बाप्पांना निरोप देताना, पुढील वर्षी पुन्हा हसत-खेळत येण्याची प्रार्थना त्यांनी केली.गणेशोत्सव हा केवळ उत्सव नाही, तर भावनांचा, श्रद्धेचा आणि एकतेचा संगम आहे.
उत्सवाचा समृद्ध अनुभव
वर्षा बंगल्यावर गेले दहा दिवस बाप्पांच्या सान्निध्यात कसे गेले, हे कळलेच नाही, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी भावूक होत सांगितले. विसर्जनाच्या वेळी त्यांनी जनतेची सर्व चिंता-विघ्ने दूर होऊ दे आणि पुढील वर्षी बाप्पा पुन्हा आनंद घेऊन यावेत, अशी प्रार्थना केली. गणरायाच्या आशीर्वादाने महाराष्ट्राला समृद्धी आणि सुख मिळावे, हीच त्यांची इच्छा होती. मुख्यमंत्र्यांनी माध्यमांशी संवाद साधताना सांगितले, अनंत चतुर्दशीच्या शुभदिनी आम्ही वर्षा बंगल्यावर गणपती बाप्पांचे विसर्जन केले. गेले दहा दिवस गणरायाच्या आशीर्वादाने महाराष्ट्राला शक्ती मिळाली.
विसर्जनाचा सोहळा शांततेत आणि कायदा-सुव्यवस्थेच्या चौकटीत पार पडावा, ही माझी सर्वांना विनंती आहे. त्यांनी पुढे जनतेला आवाहन केले की, हा उत्सव शांततेचा आणि एकतेचा संदेश घेऊन यावा. गणेशोत्सवाच्या या पवित्र वातावरणात मुख्यमंत्री फडणवीस यांनी भारत-अमेरिका संबंधांबद्दलही भाष्य केले. ते म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारत एक नवा इतिहास घडवत आहे. हा भारत स्वतःचे परराष्ट्र धोरण ठरवतो आणि कोणत्याही बाह्य दबावाला बळी पडत नाही. आम्ही ‘श्रेष्ठ भारत’च्या दिशेने वाटचाल करत आहोत. यात गणरायाचा आशीर्वाद आमच्या सोबत आहे. गणेशोत्सवाच्या या शेवटच्या टप्प्यात, बाप्पांचा निरोप घेताना अवघा महाराष्ट्र पुन्हा एकदा भक्ती आणि उत्साहाने न्हाऊन निघाला.
Amol Mitkari : आधी चौकशीचा डोस, मग माफीनाम्याचा स्मूद यूटर्न
