
महायुतीतील राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री माणिकराव कोकाटे वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. त्यांच्या राजीनामाची मागणी विरोधकांकडून करण्यात येत आहे. अशात माणिकराव कोकाटे यांनी मोठ विधान केलं आहे.
राज्यात महायुती सरकारमधील कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांना न्यायालयाने एका प्रकरणात दोन वर्षांचा कारावास आणि 50 हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. मुख्यमंत्री कोट्यातून मिळणाऱ्या सदनिकांच्या गैरवाटप प्रकरणात दोषी ठरल्याने त्यांची आमदारकी आणि मंत्रिपद धोक्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर विरोधक आक्रमक झाले असून, त्यांची आमदारकी तात्काळ रद्द करण्याची मागणी केली जात आहे. दरम्यान, या शिक्षेला आव्हान देण्यासाठी माणिकराव कोकाटे सत्र न्यायालयात दाद मागणार असल्याची माहिती समोर येत आहे. या संपूर्ण घडामोडींमुळे राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. अशात माणिकराव कोकाटे यांनी मोठ वक्तव्य केल आहे.
या सर्व पार्श्वभूमीवर, कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांनी केलेल्या एका वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात नवा वाद निर्माण झाला आहे. एका कार्यक्रमात बोलताना त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबाबत मोठा गौप्यस्फोट केला.

Chandrashekhar Bawankule: फुटाळा तलाव मुक्तीसाठी रणशिंग फुंकले
वक्तव्यावरुन नवा वाद
आम्हाला मुख्यमंत्र्यांनी पहिल्याच दिवशी स्पष्ट संदेश दिला. ‘जास्त मस्ती कराल, तर घरी जाल.’ त्यामुळे आम्ही शिस्तीत काम करतोय. आमचे पीएस आणि ओएसडी देखील मुख्यमंत्रीच ठरवत आहेत. त्यामुळे आमच्या हातात फारसं काही नाही. आम्हाला 100 दिवसांचा कार्यक्रमही दिला असून, त्यानुसारच आम्हाला काम करावं लागत आहे. त्यामुळे सरकारबरोबर सांगड बसवणं आमच्यासाठीही आवश्यक आहे,” असं कोकाटे यांनी सांगितलं.
त्यांच्या या वक्तव्यावरून आता मोठा राजकीय वादंग रंगला आहे. विरोधकांनी यावरून सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. कोकाटेंच्या विधानावर सत्ता पक्षातील अनेक नेतेही अस्वस्थ असल्याची चर्चा सुरू झाली आहे.
कशामुळे कारवाई झाली?
मुख्यमंत्री कोट्यातून दिल्या जाणाऱ्या सदनिकांच्या गैरवाटप प्रकरणात बनावट दस्तऐवज सादर करून लाभ घेतल्याचा आरोप माणिकराव कोकाटे आणि त्यांच्या भावावर होता. या प्रकरणात न्यायालयाने त्यांना दोषी ठरवत प्रत्येकी दोन वर्षांची शिक्षा आणि ५० हजार रुपयांचा दंड ठोठावला. न्यायालयाच्या या निकालामुळे त्यांचे आमदारकी व मंत्रिपद धोक्यात आले असून, यावर विरोधकांनी आक्रमक भूमिका घेतली आहे.
या संपूर्ण प्रकरणामुळे महायुती सरकारला अडचणीचा सामना करावा लागणार आहे. एकीकडे मंत्रिमंडळातील वरिष्ठ मंत्री दोषी ठरत आहेत, तर दुसरीकडे त्यांच्या विधानांमुळे सरकारची प्रतिमा डागळत आहे. आता कोकाटे यांना न्यायालयाकडून दिलासा मिळतो की त्यांची आमदारकी रद्द होते, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.