महाराष्ट्र

माओवाद्यांच्या अंताची चाहूल; Gadchiroli मध्ये नवा अध्याय 

मुख्यमंत्री Devendra Fadnavis यांचे विशेष लक्ष 

Author

गडचिरोलीतून माओवाद्यांची दहशत समाप्त होत आहे. नक्षलवाद्यांचा पूर्णपणे अंत करून गडचिरोलीच्या विकासासाठी मुख्यमंत्री विशेष लक्ष ठेवून आहेत. 

एकेकाळी माओवाद्यांचा अभेद्य गड मानला जाणारा गडचिरोली आता त्यांच्या अस्ताचा साक्षीदार ठरत आहे. राज्य सरकारच्या प्रभावी धोरणांमुळे आणि पोलिस दलाच्या अचूक रणनीतीमुळे माओवादी चळवळ हळूहळू संपुष्टात येत आहे. गेल्या अडीच वर्षांत शासनाच्या धोरणांमध्ये मोठे बदल करण्यात आले आणि आता त्याचा थेट परिणाम गडचिरोलीच्या जंगलांमध्ये दिसू लागला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस गडचिरोलीवर आता बारीक लक्ष ठेऊन आहेत.

गडचिरोली जिल्ह्यातील नक्षलविरोधी कारवायांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली होती. राज्य सरकारच्या ठोस भूमिकेमुळे नक्षलवाद्यांच्या हालचालींना आळा बसला आहे. यामध्ये विशेष उल्लेखनीय म्हणजे माजी एसपी संदीप पाटील यांची नक्षलविरोधी अभियानाच्या आयजी पदावर नियुक्ती. गडचिरोलीच्या कानाकोपऱ्यातील भौगोलिक आणि सामरिक परिस्थितींची उत्तम जाण असलेल्या पाटील यांनी गडचिरोलीत कार्यरत असताना मोठे यश मिळवले होते. आता त्यांच्या नेतृत्वाखाली नक्षलविरोधी लढ्याला आणखी धार आली आहे. याशिवाय, गडचिरोलीत उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या अंकित गोयल यांना याच परीक्षेत्राचा डीआयजी बनवण्यात आले आहे. त्यांच्या नियोजनबद्ध आणि आक्रमक धोरणांमुळे मोठ्या संख्येने माओवादी पोलिसांसमोर शरण येत आहेत.

नागपुरातील असं पोलिस ठाणं, जिथं महिला अधिकारीच नाही

नक्षलवादावर निर्णायक घाव

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा गडचिरोलीच्या परिस्थितीवर विशेष लक्ष आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली मोठ्या प्रमाणावर नक्षलविरोधी कारवाया केल्या जात आहेत. गडचिरोलीला नक्षलमुक्त करण्याचा संकल्प त्यांनी केला आहे. पोलिस दलालाही या मोहिमेत मोठे यश प्राप्त होत आहे. गेल्या काही महिन्यांत अनेक महत्त्वाच्या एन्काऊंटरमध्ये मोठ्या नक्षल नेत्यांचा खात्मा करण्यात आला आहे.

नक्षलवाद्यांचे तळ उद्ध्वस्त होत आहेत. मोठ्या प्रमाणावर शस्त्रसाठा जप्त केला जात आहे. अनेक जहाल नक्षली पोलिसांसमोर शरण येत आहेत. ज्यांनी वर्षानुवर्षे गडचिरोलीतील जंगलांमध्ये दहशत निर्माण केली होती, तेच आता पोलिसांची मदत मागत आहेत. सुरक्षादलांनी आता जंगलांमध्ये गस्त वाढवली असून, प्रत्येक हालचालीवर बारीक लक्ष ठेवले जात आहे.

गडचिरोलीच्या भविष्याचा नवा अध्याय

कधी काळी गोळीबार आणि स्फोटांनी हादरणारा गडचिरोली आता विकासाच्या दिशेने वाटचाल करत आहे. सरकारच्या विविध योजनांमुळे आदिवासी समाजाला मुख्य प्रवाहात आणण्याचा प्रयत्न सुरू आहे. शिक्षण, आरोग्य आणि रोजगाराच्या संधी वाढवून नक्षलवादाकडे वळणाऱ्या तरुणांना वेगळ्या दिशेने नेण्याचा प्रयत्न केला जात आहे.

गडचिरोलीमध्ये आता नक्षलवाद संपुष्टात येण्याच्या दिशेने मोठी पावले उचलली जात आहेत. पोलिसांच्या प्रभावी कारवाईमुळे आणि सरकारच्या धोरणांमुळे माओवादी शेवटच्या टप्प्यात पोहोचले आहेत. लवकरच गडचिरोली नक्षलमुक्त होईल आणि विकासाच्या नव्या पर्वाची सुरुवात होईल.

व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!