
नाशिक सिंहस्थ कुंभमेळा 2027 तयारीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महत्त्वाची बैठक घेतली. मात्र, या बैठकीला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार गैरहजर राहिल्याने राजकीय चर्चा रंगल्या आहेत.
महाराष्ट्रात महायुतीचं सरकार असलं तरी, आतल्या गोटात सत्तेसाठी राडा सुरू आहे. एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यातील संघर्ष आता लपून राहिलेला नाही. मुख्यमंत्री असूनही शिंदेंच्या निर्णयांना भाजपची मंजुरी लागत नाही, तर फडणवीस आपली सत्ता घट्ट करण्यासाठी त्यांचीच चौकशी लावतात. फडणवीस यांच्या डावपेचांनी शिंदे दिवसेंदिवस अडचणीत सापडत असताना, अजित पवार मात्र नेहमीप्रमाणे गप्प आहेत. पवारांनी गुपचूप फडणवीसांची बाजू घेतलीय का? की योग्य वेळी कोणत्या गोटात उडी मारायची, याचा बारकाईने विचार सुरू आहे.
प्रयागराजमध्ये महाकुंभमेळ्याचा समारोप झालेलं आहे. महाराष्ट्रात 2027 मध्ये नाशिक-त्र्यंबकेश्वर येथे सिंहस्थ कुंभमेळा भरणार आहे. या महाकुंभमेळ्यासाठी महाराष्ट्र सरकार तयारी करत असल्याचे सांगितले जात असले तरी, प्रत्यक्षात राजकीय पक्षांतर्गत तणाव शिगेला पोहोचलेला आहे. महायुतीतील तणाव आता लपून राहिलेला नाही. देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील बैठकीला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार अनुपस्थित राहिल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

Devendra Fadnavis: फिक्सरला ‘एग्झिट’… आता मंत्रालयात खेळ कोण मांडणार
सह्याद्रीवर बैठक
याआधी 2015-16 मध्ये नाशिकमध्ये कुंभमेळा आयोजित करण्यात आला होता. आता 2027 साठी सरकार तयारी करत आहे. मात्र, त्याआधीच या तयारीवरून सत्ताधाऱ्यांमध्ये राजकीय कुरघोडी सुरू झाल्याचे दिसते.
सह्याद्री अतिथीगृहावर झालेल्या महत्त्वाच्या बैठकीत मुख्यमंत्री फडणवीसांसह मंत्री गिरीश महाजन, मुख्य सचिव सुजाता सौनिक आणि नगरविकास तसेच रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. मात्र, दोन्ही उपमुख्यमंत्री गैरहजर राहिल्याने याचे वेगळेच अर्थ काढले जात आहेत.
साहेब नाराज
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नाराजीची चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू आहे. त्यांनी स्वतःहून यापूर्वी कुंभमेळ्याच्या तयारीसाठी बैठक घेतली होती, पण फडणवीस यांनी स्वतंत्र बैठक बोलावल्याने शिंदे समर्थकांमध्ये अस्वस्थता आहे. विशेषतः, शिंदे मुख्यमंत्री असताना मंजूर केलेल्या प्रकल्पांवर चौकशीचे आदेश दिल्याने त्यांचे पंख छाटण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप त्यांच्या गोटातून केला जात आहे.
महायुतीत भाजप विरुद्ध शिंदे गट अशी झुंज सुरू असल्याचे स्पष्टपणे दिसत आहे. मंत्रालयाच्या एका महत्त्वाच्या बैठकीत शिंदे ऑनलाइन सहभागी झाले होते, प्रत्यक्ष हजर राहिले नाहीत. हा प्रकार देखील नाराजीचा भाग असल्याचे मानले जात आहे. नाशिक आणि रायगड जिल्ह्यांच्या पालकमंत्रीपदावरून सुरू असलेल्या मतभेदांमुळे देखील शिंदे नाराज असल्याचे वारंवार चर्चेत आले आहे. आता कुंभमेळ्याच्या बैठकीला गैरहजर राहिल्याने हा संघर्ष आणखी चिघळला आहे.
https://thelokhitlive.com/unique-ceremony-was-held-after-the-mahakumbh-mela-bringing-water-from-the-ganga-in-prayagraj-by-tanker-in-bhandara/
कुंभमेळा निमित्त ठिणगी
काही दिवसांपूर्वी मंत्री गिरीश महाजन यांनी कुंभमेळ्यासंदर्भात बैठक घेतली होती. त्यावेळी मंत्री दादा भुसे अनुपस्थित होते. यानंतर 14 फेब्रुवारीला शिंदे यांनी बैठक घेतली, तेव्हा गिरीश महाजन गैरहजर राहिले. महाजन यांनी भाजपच्या बैठकीसाठी गैरहजेरीचे कारण दिले असले तरी, ही बैठकच टाळण्याचा प्रयत्न होता का, असा प्रश्न उपस्थित होतो.
एकनाथ शिंदे यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप होत असताना, फडणवीस त्यांच्यावर दबाव टाकण्याचा प्रयत्न करत आहेत, अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे. विशेषतः, मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले होते की, तुम्हाला पाहिजे ती नावं पाठवा, पण ज्यांची नावं फिक्सर म्हणून ओळखली जातात त्यांना मान्यता देणार नाही. हे विधान फक्त प्रशासनासाठी नव्हे, तर काही नेत्यांसाठी इशारा असल्याचे मानले जात आहे.
महायुती तुटणार?
मुख्यमंत्री फडणवीस यांनी शिंदे यांची राजकीय ताकद कमी करण्यासाठी पावले टाकायला सुरुवात केली आहे. शिंदे मुख्यमंत्री असताना मंजूर झालेल्या प्रकल्पांमध्ये भ्रष्टाचाराच्या आरोपांची चौकशी फडणवीस यांनी लावून धरली आहे. शिवाय, अजित पवार गटाचे मंत्री माणिकराव कोकाटे यांनी सांगितल्याप्रमाणे, मुख्यमंत्र्यांनी पहिल्याच दिवशी सांगितलं की कोणाच्या जाण्यामुळे सरकारला फरक पडणार नाही. यावरूनच भाजप आणि इतर घटक पक्षांतील संघर्ष उघड झाला आहे.
महायुतीतील नेत्यांच्या बैठकीतून एकमेकांना दूर ठेवण्याचे हे धोरण म्हणजे येत्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेला राजकीय खेळ आहे का, याबाबत तर्क लावले जात आहेत. कुंभमेळा हा एक धार्मिक आणि सांस्कृतिक सोहळा असताना, तो आता सत्तासंघर्षाचा केंद्रबिंदू ठरताना दिसत आहे. यामुळेच, 2027 मध्ये होणाऱ्या कुंभमेळ्यापूर्वीच महायुतीत मोठा भूकंप होण्याची शक्यता नाकारता येत नाही.