
राज्यातील विमानतळांचा कायापालट करण्याचा प्रकल्प सुरू करण्यात आला आहे. त्यानुसार नागपूर, नवी मुंबई आणि शिर्डी विमानतळाच्या नूतनीकरणाचं काम वेगानं सुरू आहे.
विमान वाहतूक हे सर्वात वेगाने वाढणारे क्षेत्र आहे. नागपूर, नवी मुंबई आणि शिर्डी येथे वेगानं विकास होत आहे. त्यामुळं या विमानतळांचं काम वेगानं पूर्ण करावं, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. सह्याद्री अतिथीगृह येथे आयोजित राज्यातील सर्व विमानतळाच्या बांधकाम प्रगतीच्या कामासंदर्भात आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी केंद्रीय सहकार आणि नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ उपस्थित होते. केंद्र सरकार आणि राज्य शासनाला आवश्यक त्या पायाभूत सुविधा निर्माण करणे फार गरजेचे आहे.
देश पाच ट्रिलीयन अर्थव्यवस्थेकडे वाटचाल करत आहे. त्यामुळं विमान वाहतुकीचं क्षेत्र फार महत्त्वाचं आहे. महाराष्ट्र देशाचे ग्रोथ इंजिन आहे. या क्षेत्रातील बारीक सारीक गोष्टीवर देश आणि राज्याला काम करावे लागणार आहे. या क्षेत्रातील वाढती संख्या विचारात घेऊन पायाभूत सुविधांचा विस्तार करावा लागणार आहे. सोलापूर आणि कोल्हापूर येथे ‘नाइट लॅन्डिंग’ होईल, असे नियोजन करण्याचे निर्देश फडणवीस यांनी दिले. त्यामुळं नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळासह नागपूर, शिर्डी विमानतळाचे काम गतीने करण्याची सूचना त्यांनी केली.

वेगानं Development
विमान वाहतूक व्यवस्थेचा विकास झाल्यास राज्याचा विकास झपाट्यानं होईल. शिर्डी विमानतळ येथे ‘नाइट लॅन्डिंग’ सुविधा लगेच सुरू करण्याबाबतही मुख्यमंत्र्यांनी सूचना दिली. नागपूर आणि शिर्डी विमानतळाबाबत काही मुद्दे अडकले आहेत. मार्च अखेरपर्यंत यावर तोडगा काढण्याचे आदेश देण्यात आलेत. जळगाव येथील नवीन टर्मिनल इमारत लवकर उभी करण्यात येणर आहे. त्याचं काम वेगानं करावं. पुरंदर विमानतळ जागा अधिग्रहण प्रक्रिया लवकर करावी लागणार आहे. पालघर विमानतळ उभारणीसाठी प्रक्रिया सुरू करण्याची सूचनाही फडणवीस यांनी केली.
वाढवण बंदर हे केंद्र आणि राज्य शासनाचा महत्त्वाचा प्रकल्प होणार आहे. जगातील दहा सर्वांत मोठ्या बंदरांपैकी हे बंदर एक राहणार आहे. त्यामुळं यासंदर्भातील कामाकडंही लक्ष देण्याची सूचना फडणवीस यांनी केले. वाढवण भागातून बुलेट ट्रेन आणि कोस्टल रोड प्रकल्प होणार आहे. त्यामुळं या भागात देशातील सर्वांत मोठी व्यापारी वाहतूक होणार आहे. त्यासाठी वाढवण येथे विमानतळाचा निर्णय घेण्यात येणार असल्याचंही मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितलं. नवी मुंबई विमानतळाची क्षमता मुंबई विमानतळापेक्षा दुप्पट असणार आहे. सर्व विमानतळांची कामं वेळेत पूर्ण करण्याचे सक्त आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.