महाराष्ट्र

Akola BJP : सत्ता नाट्याच्या एंटरटेनमेंटचा देवा भाऊ करतील दि एंड ? 

Devendra Fadnavis : भरकटलेल्यांना आता कंपास घेऊन दिशा दाखविण्याची गरज

Share:

Author

अकोल्यात सत्तेच्या राजकारणात सध्या स्फोटक नाट्य सुरू आहे, एकीकडे गटबाजीचा कलगीतुरा, तर दुसरीकडे नेत्यांची पक्षांतरांची धूम. या धुकट राजकीय वातावरणात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अकोल्यात अवतरणार आहेत. त्यांच्या दौऱ्याने अनेक समीकरणं बदलण्याच्या शक्यता निर्माण झाल्या आहेत.

अकोल्यात सध्या राजकारण उकळतंय आणि नेतेमंडळींच्या ‘इनकमिंग-आऊटगोइंग’नं नागरिकांचा राजकीय उत्सवच जणू सुरु झाला आहे. निवडणूक जवळ येताच राजकीय पक्षांच्या अंगणात वाऱ्याची दिशा बदलताना दिसत आहे. सत्ताधारी पक्षांतील अंतर्गत गटबाजी, खदखदती नाराजी, आणि मनातील उसळती अस्वस्थता, यांचं एक अनोखं नाट्य अकोल्यात रंगत आहे. स्थानिक स्वराज्य संस्थां निवडणुकीची तयारी सुरू असतानाच, भाजप व शिंदे गटात शिस्तीच्या दोऱ्या सैल झाल्याचं स्पष्ट दिसतंय.

महायुती सरकारचं राज्यात असणं हे वरकरणी स्थिर वाटत असलं, तरी त्याच्या पायथ्याला गटबाजीचे तडे बसू लागले आहेत. अकोल्यात भाजपमध्ये कार्यकर्त्यांची अस्वस्थता आता उघडपणे समोर येते आहे. पक्षातील नेत्यांकडून कार्यकर्त्यांवर दबाव आणला जात असल्याचा थेट आरोप कार्यकर्तेच करत आहेत. भाजपचे माजी आमदार नारायण गव्हाणकर यांनी पक्षाचा निरोप घेऊन थेट शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला. दुसरीकडे शिवसेना एकनाथ शिंदे गटात तर थेट संपर्कप्रमुखाचाच पुतळा जाळण्यात आला. ही फक्त घटना नाही, तर मनातील आक्रोशाची धग आहे.

संभ्रम दूर करण्याची गरज

अकोल्यामधील राजकीय समीकरणांच्या या पार्श्वभूमीवर आता अकोल्याचे माजी महापौर आणि काँग्रेस नेते मदन भरगड यांनी देखील आता काँग्रेस सोडून राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गटात) प्रवेश करण्याची तयारी केली आहे. सत्ताधाऱ्यांमध्ये सध्या ‘राजकीय पलायन’ आणि ‘स्वार्थसिद्धी’च्या स्पर्धेचं वातावरण आहे. मतदारांचं मनंही यामुळं संभ्रमित झालंय की, कोण कोणाच्या बाजूला आहे, आणि कोण खरा आहे? जिल्ह्यातील ह्या नाट्यमय राजकीय घडामोडी सध्या नागरिकांसाठी एंटरटेनमेंट चे माध्यम ठरत आहे. पक्ष जर आपसातच भांडत राहिलेत तर नागरिकांच्या समस्या कोण ऐकणार? या एंटरटेनमेंट ची शूटिंग कधी थांबणार? असेही प्रश्न आता जनतेच्या मनात घर करून आहेत.

जिल्ह्यातील घडामोडी आणि भाजपमधील अंतर्गत गटबाजीचा वाद सर्वोच्च बिंदूवर पोहोचतोय. अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघ जो काही काळापूर्वी भाजपचा बालेकिल्ला मानला जात होता, तो आता पक्षाच्या हातून निसटलेला आहे. याच पार्श्वभूमीवर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अकोल्यात 11 जूनला दौऱ्यावर येणार आहेत. या दौऱ्यात फडणवीस सुमारे तीन हजार कोटींच्या विकासकामांचे भूमिपूजन करणार आहेत. पण खरा मुद्दा आहे की, पक्षातल्या फाटलेल्या नात्यांचं डागडुजी कोण करणार?

Pravin Tayade : वीस वर्ष सभागृहात बसणाऱ्या कडूंना आता रस्त्यावर करमतय

शक्ती वाढवावी लागणार

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या या दौऱ्यात पक्षातील अंतर्गत नाराजी त्यांच्यासमोर मांडली जाणार का? कार्यकर्त्यांचे प्रश्न ते ऐकणार का? आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्यांनी दिलेले उपाय हे खरंच या भाजपच्या अकोला जिल्ह्यातील गडाला परत बळकट करू शकतील का? या प्रश्नांनी सर्वांची उत्सुकता शिगेला पोहोचवली आहे. महायुतीतील दुसऱ्या भागीदार पक्षांमध्येही काही वेगळी स्थिती नाही. शिवसेना शिंदे गटात जेव्हा संपर्कप्रमुख नेत्याचा पुतळा पेटवला जातो, तेव्हा ती केवळ निषेधाची खूण नसते, ती निवडणूक काळातली ‘लाल सिग्नल’ असते.

भाजपसमोर आज एकच मोठं आव्हान आहे. ते म्हणजे सर्वांना स्वीकारार्ह आणि विजयी नेतृत्व शोधायचं. जे पक्षाला केवळ निवडणुकीत विजय मिळवून देईल असं नाही, तर कार्यकर्त्यांचं मनं पुन्हा जिंकेल, आणि विरोधकांनाही योग्य उत्तर देईल. असा नेता भाजपला सध्या अकोल्यात सापडलेला नाही आणि म्हणूनच भाजपला सध्या ‘सर्च ऑपरेशन’ जोरदार राबवावे लागणार आहे.

या गटबाजीच्या, पक्षांतरांच्या, आणि नेत्यांच्या बदलत्या निष्ठांच्या पार्श्वभूमीवर अकोल्यातील निवडणूक केवळ निवडणूक राहिलेली नाही. ती आता सत्तेच्या तळागाळातल्या धुसफुसणाऱ्या असंतोषाचा आरसा झाली आहे. अकोल्यातले हे बदलते चित्र म्हणजे आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीची खरी पूर्वरंग आहे. इथे ठरवला जाणार आहे केवळ एक मतदारसंघ नव्हे, तर पक्षीय शिस्तीचा आणि नेतृत्वाच्या कुवतीचा कस.

व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!