
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूरमध्ये जनता दरबार भरवला. संपूर्ण विदर्भातून नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहून आपल्या समस्या मांडल्या.
महाराष्ट्रातील सत्तेचा मध्यवर्ती बालेकिल्ला असलेल्या नागपूरात २० एप्रिल रोजी एक महत्त्वाची बैठक पार पडली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी नागपूरच्या हैदराबाद हाऊस सचिवालयात जनता दरबार भरवून विदर्भातील जनतेशी थेट संवाद साधला. या दरबारात नागपूर जिल्ह्यासह संपूर्ण विदर्भातून आलेल्या हजारो नागरिकांनी आपले अर्ज सादर करून आपल्या व्यथा मुख्यमंत्र्यांसमोर मांडल्या.
महायुती सरकारच्या स्थापनेनंतर भाजपच्या नेतृत्वाने सर्व मंत्र्यांना आपल्या भागात जनता दरबार घ्यावेत, असे स्पष्ट निर्देश दिले होते. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री फडणवीसांनी स्वतः नागपुरात दरबार आयोजित करत, सत्तेच्या सर्वात जवळचा दरवाजा पुन्हा एकदा जनतेसाठी खुला केला. नागपूरकरांसह यवतमाळ, अकोला, गडचिरोली, बुलढाणा, चंद्रपूर आदी जिल्ह्यांमधून आलेल्या नागरिकांच्या उपस्थितीमुळे सचिवालय परिसर लोकांनी फुलून गेला होता.

Gondia : बोगस शिक्षक भरतीचे बीज तीन वर्षांपूर्वीच पेरले गेले
जनसंपर्काचा निर्णय
सकाळपासूनच नागपूरच्या हैदराबाद हाऊस परिसरात नागरिकांची गर्दी जमू लागली होती. दुपारी बारा वाजता दरबार सुरू होताच मुख्यमंत्री फडणवीसांनी प्रत्येक अर्ज वाचण्यास सुरुवात केली. प्रत्येक अर्जाच्या मागील वेदना समजून घेत त्यांनी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना तातडीने कारवाई करण्याचे आदेश दिले. नियमांच्या चौकटीत राहून लोकांना त्वरित न्याय मिळावा, हेच त्यांचे उद्दिष्ट असल्याचे त्यांच्या कृतीतून स्पष्ट दिसत होते.
जनता दरबारात आरोग्य विषयक गरजांपासून ते भ्रष्टाचारविरोधी तक्रारींपर्यंत असंख्य समस्या मांडण्यात आल्या. विशेषतः गडचिरोलीच्या चामोर्शी तालुक्यातील अगरबत्ती घोटाळ्याचे पीडित महिला या दरबारात दाखल झाल्या होत्या. मुख्यमंत्री फडणवीसांनी त्या महिलांची व्यथा शांतपणे ऐकून घेतली आणि या प्रकरणात दोषींवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिले.
Chandrashekhar Bawankule : रेती व्यवहारात पारदर्शकतेचा शिडकाव
लोकशाहीचा चेहरा
मुख्यमंत्री फडणवीस यांचा नागपूरातील हा दरबार म्हणजे केवळ प्रशासनाच्या गतीचा दाखला नाही, तर एक लोकशाही संस्कृतीचा झळाळता नमुना आहे. जिथे नागरिक सरळ शासनप्रमुखांपर्यंत पोहोचू शकतात, आपल्या व्यथा मांडू शकतात आणि त्यावर तातडीने निर्णय घेतले जातात अशा दरबारातून प्रशासनात पारदर्शकता आणि जनतेत विश्वास वृद्धिंगत होतो.
जनता दरबारात सहभागी झालेल्या नागरिकांच्या चेहऱ्यावर समाधान दिसत होते. त्यांच्या बोलण्यातून मुख्यमंत्री फडणवीसांच्या कार्यशैलीबाबत असलेला विश्वास ठळकपणे उमटत होता. आजचा जनता दरबार हा एक नवा प्रारंभ ठरला आहे, शासन आणि जनतेमधील नात्याला बळकट करणारा, विश्वासाचे बियाणं पेरणारा.